December 17, 2010

पाककृत्या, मी आणि ब्लॉगपोस्ट

आपलाच ब्लॉग असल्यामुळे मी अक्षरश: काहीही लिहू शकते, नाही का? :P

तर मध्यंतरी मी काही रेसिपीज मायबोलीवर लिहिल्या. स्वयंपाक करायला मला मनापासून आवडतं. कोणत्याही पद्धतीचा - शाकाहारी, मांसाहारी. भारतीय प्रकारचा, विदेशी प्रकारचा. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या सारस्वती रेसिपी तर लाजवाब! कोंड्याचा चविष्ट मांडा करायची कला सारस्वत बायकांकडून शिकावी - आज्जी, पणजी आणि थोडेफार आई, आत्या, मावशी ह्या कॅटेगरीमधल्या बायकांविषयी मी बोलतेय. तितकं तर नाही जमणार, पण जितकं काही शिकता येईल, बनवता येईल, तसं बनवायचं, खायचं - खिलवायचं ह्या गोष्टी मला आवडतात. आपल्या मायेच्या मंडळींची गर्दी जमलेय, मजेत, गप्पा टप्पा करत, जेवणं चालली आहेत आणि गप्पांमध्ये रंगून गेल्याने हातही नळाखाली धरुन त्यावर पाणी घेण्याआधी वाळून गेलाय... हे असलं काही अनुभवायला पुण्य लागतं...

नातेवाईक, मित्र - मैत्रिणी घरी याव्यात आणि आपण मायेनं रांधलेलं त्यांनी तितक्याच प्रेमाने खाऊन तृप्त व्हावं आणि आपल्यालाही दाद द्यावी, ह्यासारखं सुख नाही!

... तर काय सांगत होते, ठरवलं की आपण लिहित असलेल्या रेसिपीज एकत्र कराव्यात. आहे त्याच ब्लॉगवर. नाहीतरी ब्लॉग म्हजे काय हो? आपल्या मनातलं बोलायची जागाच ना? :)


ओल्या काजूंची उसळ

लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
पाव किलो ओले काजू, २ हिरव्या मिरच्या, १० -१५ काळी मिरी, २ टेस्पू ओलं खोबरं
फोडणी साठी - हिंग, हळद आणि मोहरी
चवीसाठी मीठ आणि साखर
वरुन घालण्यासाठी बारीक चिरुन कोथिंबिर

क्रमवार पाककृती:
काजू सोलून घ्यावेत.

कढईत तेल तापवून, त्यात हिंग, हळद आणि मोहरी यांची फोडणी करुन, वर काजू घालावेत. अर्धा वाटी पाणी घालून मंद गॅसवर मऊसर शिजू द्यावेत. काजू शिजत असताना, मिरी, हिरव्या मिरच्या व खोबरे एकत्र जाडसर वाटून घ्यावे.

काजू शिजल्यावर त्यात हे वाटण घालून,चवीपुरते मीठ व साखर घालून एकत्र करावे व ५ -१० मिनिटांनी गॅस बंद करावा. उसळ जरा ओलसरच ठेवावी.

सर्वात शेवटी वरुन चिरलेली कोथिंबिर घालावी.

वाढणी/प्रमाण:
२-३ जण
अधिक टिपा:
ओले काजू साधारण फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान मिळतात. सुकवलेले ओले काजूही मिळतात, ते वापरायचे असतील तर आदल्या रात्री पाण्यात भिजत घालून, दुसर्‍या दिवशी सोलावेत.

हीच उसळ, हिरव्या मिरची ऐवजी अर्धा चमचा तिखट व गरम मसाला प्रत्येकी, वापरुनही करता येते. बाकी कृती वर दिल्याप्रमाणेच.





उसळीचा फोटो मी काढलेला नाही.



खतखते


लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: अर्धी वाटी तूरडाळ.
भाज्या: पाव किलो लाल भोपळा, सुरण - थोडे कमीही चालेल, १ रताळे, २ मध्यम बटाटे, १ कच्चे केळे, उसाच्या करव्याचे ९- १० तुकडे, कच्च्या पपईचे तुकडे, नीरफणसाचे तुकडे, करांदे, कणग्या.

वाटण : पाव ते अर्धी वाटी खवलेले खोबरे व ४-५ तिरफळे.

इतरः हळद, तिखट, चिंच, गूळ, मीठ.

कृती: डाळ चांगली शिजवून घ्यावी व घोटावी .
फळभाज्यांच्या साली काढून त्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करावेत.
डाळीमध्ये सर्व भाज्या जरुरी पुरते पाणी घालून शिजवून घ्याव्या. भाज्या शिजत असतानाच त्यात तिरफळे ठेचून घालावीत.
१ चमचा तिखट व हळद प्रत्येकी आणि छोट्या सुपारीएवढा गूळ घालावा. थोडा चिंचेचा कोळ घालावा.
खोबरे वाटून घेतानाही त्यात तिरफळे घालावीत.
सर्व भाज्या शिजल्यावर वरुन खोबर्‍याचे वाटण घालावे व ही भाजी चांगली खदखदू द्यावी. चवीपुरते मीठ घालायचे.
भाजी फार पातळ वा सुकी करावयाची नाही.

अधिक टिपा:
डाळ न वापरताही ही भाजी करता येते.
तिरफळे ताजी असली तर कमी वापरावी कारण त्यांना अधिक वास असतो. मग वाटणात २-३ आणि ठेचण्यासाठी २-३ चालतील. सुकी असतील तर जास्त घ्यायची. ५-६ प्रत्येकी. त्याची बी काढून टाकायची वापरण्याआधी. ह्यात अळू वापरतात का, तर नाही. ही ऋषीची भाजी नव्हे. ह्यात कांदा, लसूण, आले, धणे वगैरे घालत नाही आम्ही.


मुडदुशांचे (नगली) कालवण

लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
६ ताज्या नगली, मोठ्या मिळाल्या तर मज्जाच!नाहीतर जरा मध्यम आकाराच्या चालतील. काय करणार?
वाटपासाठी : २ टीस्पून धणे, १ छोटा चमचा हळद, १ छोटा चमचा तिखट, छोट्या आकाराचा एक कांदा - चिरुन, ५-६ मिरी, १ नारळाचे खोबरे (कोकणी/मालवणी पद्धतीमध्ये नारळाचा सढळ हस्ते वापर असतो, तुम्हाला कमी वापरायचा असल्यास, त्याप्रमाणे घ्या. चवीत मात्र फरक पडेल. )
इतर: किंचितसे आले - छोटा तुकडा अगदी बारीक चिरुन, १ टेबलस्पून तेल.
मीठ, थोडासा चिंचेचा कोळ.

क्रमवार पाककृती:
ताज्या नगल्या ओळखायची खूण म्हणजे त्या अगदी चकचकीत दिसतात. अतिशय देखणी आणि स्वच्छ अशी ही मासळी आहे. साफ करण्यासाठीही अधिक कष्ट घ्यावे लागत नाहीत.

खवले काढून टाकून नगल्या साफ करुन घ्याव्यात. दुकानातूनच माशांचे खवले साफ करुन, कल्ले काढून आणि मासे कापून देतात, पण घरी साफ करायचे असतील, तर सुरीची बिनाधारीची बाजू, खवल्यांच्या विरुद्ध दिशेने फिरवली असता खवले निघतील. विळीच्या पात्यावर जमिनीला समांतर असे मासे फिरवले असताही खवले निघतात, पण ह्याला प्रॅक्टीस लागेल. डोके व पोटात काही घाण असेल तर काढून टाकावी. कल्लेही काढावेत. नगलीचे २ वा ३ तुकडे करावेत व थोडा वेळ मीठ लावून ठेवून द्यावे. चिंचेचा कोळ वगैरे लावायची गरज नाही, कारण नगलीला उग्र वास नसतो.

१ वाटी खोबरे, चिरलेला अर्धा कांदा, मिरी, धणे हळद व तिखट ह्यांचे वाटप करुन घ्यावे.
उरलेल्या खोबर्‍याचा पहिला जाड रस काढून घ्यावा. पुन्हा एकदा वाटून अजून रस काढून घ्यावा. हा दुसर्‍यांदा काढलेला रस जरा पातळ असतो.

हे झाले की नगल्या व्यवस्थित धुवून घ्याव्यात.

१ टेबलस्पून तेल तापवून त्यात थोडा बारीक कांदा व बारीक चिरलेले आले टाकून चांगले नरम गुलाबी रंगावर परतावे. त्यवर धुतलेल्या नगल्या टाकाव्यात. वाटप व नारळाचा रस घालावा. चवीनुसार मीठ घालावे. अर्धा टीस्पून चिंचेचा कोळ घालून व नारळाचा रस व वाटप ह्यांचे मिश्रण अगदीच जाडसर झाले असेल, तर थोडे पाणी घालून मंद विस्तवावर व्यवस्थित उकळी आली, की गॅस बंद करायला हरकत नाही.


कैरीची उडदमेथी

लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
४ कोवळ्या कैर्‍या - बाठे नसलेल्या उत्तम.
१ वाटी खोबरे
२- ३ लाल सुक्या मिरच्या
मसाल्यातल्या छोट्या चमच्याचे माप - १ चमचा तांदूळ, १ चमचा उडीद डाळ, १ चमचा मेथी, १ चमचा धणे, १ चमचा मोहरी, १ चमचा हळद. मीठ, फोडणीसाठी हिंग अणि मोहरी, १ चमचा तेल.
किंचितसा गूळ.

क्रमवार पाककृती:
१. कैरीची साले काढून्, मध्यम आकाराचे तुकडे करुन वाफवून घ्यावी. कोवळी कैरी असेल तर लगेच शिजते, तेह्वा वेगळी वाफवायचीही गरज पडत नाही. कैरीच्या सालांची मस्त चटणी होते, फेकायला नकोत. : )
२. वाटण - खोबरे, लाल सुक्या मिरच्या, धणे व हळदीचे वाटण करुन घ्यावे.
३. तांदूळ, उडीद डाळ्,मेथी आणि मोहरी किंचित तेलात परतून घ्यावी, व वरील वाटणात घालून पुन्हा वाटून घ्यावे.
४. पातेल्यात हिंग मोहरीची तेलावर फोडणी करुन त्यावर वाफवलेले कैर्‍यांचे तुकडे घालावेत. कोवळ्या न वाफवलेल्या कैर्‍यांचे तुकडे घतले तर त्यांबरोबर थोडेसे पाणी घालून जरा शिजू द्यावे. कैरी गोळा होईपर्यंत शिजवायची नाही.
५. कैरी जरा बोटचेपी शिजली की त्यावर वाटण घालून बेताने आमटीसारखी कन्सिस्टन्सी होईल असे, इतपत पाणी घालायचे व जरा उकळी फुटू लागली की गूळ घालायचा.
६. चवीनुसार मीठ घालायचे. खूप उकळी काढायची नाही, एका उकळीनंतर गॅस बंद करायचा.


कोलंबीची उडदमेथी

लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
अर्धा किलो कोलंबी, २ कांदे, २ वाटी खोबरे, ७ -८ लाल सुक्या मिरच्या, १ चमचा उडीद डाळ, १ चमचा मेथी, १ चमचा तांदूळ, १ चमचा धने, ७- ८ काळे मिरे, १ चमचा मोहरी, सुपारीएवढी चिंच, मीठ, साधारण २ -३ चमचे हळद, २ मोठे चमचे तेल.

क्रमवार पाककृती:
कोलंबी विकत घेताना शिळी वा खूप वास येणारी अशी घेऊ नये, शिळी कोलंबी निस्तेज दिसते आणि मऊ पडलेलीही असते. कोलंबीचे वरील कवच काढून, डोके व मधील काळा दोरा काढून ती साफ करुन घ्यावी, व तिला मीठ लावून ठेवावे. कवच काढून टाकल्यावर, अगोदर भरपूर वाटणारी कोलंबी, अगदी एवढीशी दिसायला लागते! जरी कवच काढलेली विकत आणली, तरी घरी आणल्यावर तिच्यातील दोरा मात्र काढायला विसरु नये.

कांदे कापून घ्यावेत. ह्यातील थोडासा चिरलेला कांदा बाजूला काढून ठेवावा व उरलेल्या चिरलेल्या कांद्याचे २ भाग करावेत.

वाटण १: १ भाग चिरलेला कांदा व १ वाटी खोबरे, लाल मिरच्या, २ चमचे हळद व चिंच हे एकत्र करुन वाटावे.

वाटण २: उरलेला भाग चिरलेला कांदा, उरलेल्या खोबर्‍या आणि धण्यांसकट तेलावर परतून घ्यावा. हे बाजूला उतरवून, त्याच तव्यावर थोड्या तेलात १ चमचा उडीद डाळ, १ चमचा मेथी, १ चमचा तांदूळ, १ चमचा धने, ७- ८ काळे मिरे, १ चमचा मोहरी हे सारे एकत्र परतून घ्यावे. हे सारे एकत्र वाटावे. वाटण बा़जूला काढून, मिक्सरमध्ये थोडे पाणी घालावे व हे वाटणाचे राहिलेले पाणी उडदामेथीत घालण्याकरता ठेवावे.

मीठ लावलेली कोलंबी स्वच्छ धुवून घ्यावी.

एका पातेल्यात राहिलेला कांदा तेलावर परतून घ्यावा व परतताना त्यावर ४ -४ उडीद डाळीचे व मेथीचे दाणे घालावेत. परतून झाले की त्यावर वाटण क्र १ घालावे.

उकळी आली की त्यात कोलंबी घालावी. कोलंबी शिजली की वाटण क्र २ घालावे व चवीनुसार मीठ घालावे. वाटण क्र २ चे पाणीही ह्या उडदामेथीत घालावे, चांगली उकळी काढावी व उकळी आल्यावर गॅस बंद करावा.

कर्ली ह्या माशाचीही अशाच प्रकारे उडदमेथी बनवता येते.



नंतर पुन्हा अजूनही लिहीन. ह्या इथे लिहिलेल्या, मला बनवता येतात बरं! :P

December 6, 2010

अक्षय कविता

तुला कसे कळत नाही?
फुलत्या वेलीस वय नाही!
क्षितिज ज्याचे थांबले नाही,
त्याला कसलेच भय नाही,
त्याला कसलाच क्षय नाही....

असाच काहीसा अक्षय जिवंतपणाचा स्पर्श लाभलेली बोरकरांची लख्ख आरस्पानी कविता. लयीत उलगडणारी आणि शब्दचित्रांचा उत्कट अनुभव वाचकांसमोर अलगद आणून ठेवणारी, अशी. कवितेची जातकुळीच अर्थगर्भित. चित्रवाही शब्दकळेचे लेणे ल्यालेली. आयुष्यातल्या प्रत्येक अनुभवाला तितक्याच समरसतेने आपलंसं करुन, अनुभवून आपल्या अवधूती मस्तीत धुंद होताना, त्या अनुभवांचा मुक्त उद्घोष करणारी, शुद्ध अभिजात अशी ही कविता. आत्मनिष्ठ.

बोरकरांनीच म्हटल्याप्रमाणे, त्यांनी कधी कविता केल्या नाहीत, बोरकरांना कविता झाल्या. त्यांचे शब्दही शब्दवतीचा साज धारण करुन आलेले आणि चराचराच्या रंगागंधांमध्ये नाहून निघालेले. भोवतालच्या सृष्टीला हाक घालणारे, पण ती कशी? नुसतीच नव्हे, तर नादवेडात रंगून आणि गंधाटून!

मी रंगवतीचा भुलवा
मी गंधवतीचा फुलवा
मी शब्दवतीचा झुलवा
तुज बाहतसे....

असं म्हणत. रंगांची भुलावणी शब्दांच्या फुलोर्‍यात पेरुन, त्यांचे झुलवे गात मारलेली हाक.

कवींचा मूळ पिंडच सौंदर्योपासकाचा. हिरवळ आणिक पाणी, तेथे स्फुरती मजला गाणी अशी भाववेडी अवस्था. इतर कोणत्याही ओळखीपेक्षा, पोएट बोरकर हीच त्यांची स्वतःशीही असलेली खरी ओळख. मनातून आणि शब्दांतून ओसंडत असलेले कवीवृत्तीचे इमान. "मी प्रतिभावंत आहेच, पण प्रज्ञावंतही आहे" हे सांगण्याची आणि ओळखण्याची शक्ती. जोपासलेला निगर्वी अभिमान. स्वतः सरस्वतीपुत्र असल्याची सतत जागती जाणीव.

कवितांविषयी बोरकरांची धारणा मुळातूनच वाचण्यासारखी आहे. बोरकरांच्या मते काव्य ही अध्यात्मिक साधना.

"लौकिक जीवनात राहणार्‍या कवीला जेव्हा अलौकिकाची जाणीव प्राप्त होते, तेह्वा तो केवळ कवी रहात नाही, पण संतही होतो. आपल्या देशात तरी वारंवार असे घडत आले आहे. कवी जगात इतर ठिकाणीही झाले आहेत, पण त्यातले संत झाले, असे फारच थोडे. असे का व्हावे? मला वाटते, हा फरक काव्याकडे पाहण्याच्या दृष्टीमुळे पडतो. काव्य ही एक अध्यात्मिक साधना आहे. आत्मविद्येचा हा एक आगळा आणि लोभसवाणा अविष्कार आहे. लय, योगाची ही एक हृदयंगम कला आहे, असे ज्यांनी मनापासून मानले आणि या साधनेची वाट जे शोधीत, चोखाळीत राहिले, ते संत झाले आणि ज्यांनी काव्य, कला हा एक शौक किंवा छंद मानला ते कवीच राहिले किंवा कवी म्हणून देखील फार लवकर संपले, असे आढळून येईल..."

कवितेची चाहूल घेता घेता लौकिकातून अलौकिकाच्या जगात मुशाफिरी करणारं कवीमन, आणि अशा ह्या कवीची आयुष्याकडे पाहताना, ते अनुभवताना आणि चराचराला न्याहाळताना, सहजरीत्या त्यातल्या सौंदर्यठश्यांचा वेध घेत, त्यांचे सौंदर्यसुभग तराणे बनवत, नाद, सूर, लय आणि शब्द ह्यांना सांगाती घेऊन जन्माला आलेली, चिरंतनाचे गाणे बनून गेलेली अशी कविता.

छंद माझा दिवाणा,
नकळत मन्मुखी सुंदरतेचा तरळे तरल तराणा..
स्वसुखास्तव जरी गुणगुणतो मी
हर्ष कणकणी उधळी स्वामी
प्रकाश पाहूनी अंतर्यामी
सोडवी गहन उखाणा....

ह्या कवितेला आतूनच जीवनाची ओढ आहे. सुख, दु:ख, एखादा निरव नि:स्तब्धतेचा वा सुखावणारा समाधानाचा क्षण, ह्या सार्‍याला ही कविता शब्दाशब्दांने आपलं म्हणते, आतल्या खुणा उकलू पाहते आणि ज्ञानियाच्या अमृत ओवींच्या संगतीने मनातलं द्वैत उजळत, स्नेहभावाने सामोरी येते.

गोव्याच्या भूमीचं सौंदर्य आणि हिरवा निसर्ग, तिथल्या मातीचा गंध, समुद्राची गाज, पोफळी, माडांच्या झावळ्यांची सळसळ... गोव्याच्या भूमीचं सारं सारं ताजेपण बोरकरांच्या कवितेतून उमलून येतं आणि मग तिथल्या नारळाची चव मधाची होते आणि दर्‍यां कपार्‍यांतून नाचत, खळाळत उतरणारं पाणीही दुधासारखं भासतं. जगाला आपल्या सौम्य रुपाने आल्हाद देणार्‍या चांदण्याला माहेरी आल्याचं समाधान इथेच मिळतं, आणि अबोल, शालीन अशा चाफ्याच्या साक्षीने निळ्या नभाशी समुद्र गळाभेठी इथेच करतो. गोव्याच्या निसर्गाची घडोघडी दिसणारी वेगवेगळी रुपं, बोरकरांच्या कवितेत वेगवेगळ्या भावनांना चित्ररुप देतात...

ही कविता, मराठी सारस्वताचे, लावण्यमयी लेणे आहे. संतवाङमयासारखी प्रासादिकता, संस्कारक्षम मनाची शुचिता त्या कवितेत आहे हे खरेच. पण, म्हणून त्या कवितेला विमुक्त मनाच्या रसरंगाचे वावडे नाही...उलट तिला तर सौंदर्याची, जीवननिष्ठेची अनादि, अनंत अशी धुंद भुरळ पडलेली! मनाच्या गाभ्यात उत्कट आनंदाचा आणि चैतन्याचा लामणदिवा सतत तेवता! गाढ सुखांनी भरुन येणारी आणि मुक्तपणे आपल्या भावना व्यक्त करणारी ही कविता. ती प्रीती व्यक्त करताना तरी संकोच का बाळगेल? आणि प्रीतीतून उमलणार्‍या रतीचे आदिम आकर्षण नाकारण्याचा करंटेपणा तरी का करेल? प्रीती आणि रती तितक्याच ताकदीने, तरलतेने आणि संवेदनक्षमतेने उलगडत नेणारी, आणि इंद्रियानुभवांमध्ये समरसणारी ही कविता. तिने अनुभवलेल्या इंद्रदिनांचा प्रभाव तिच्या मनपटलावरुन पुसून जायलाच तयार नाही!

इंद्रदिनांचा असर सरेना
विसरु म्हटल्या विसरेना
चंद्रमदिर जरी सरल्या घडी त्या
स्वप्नांची लय उतरेना...

जीवनाबद्दलची आसक्ती, ऐहिकाबद्दलचे प्रेम व्यक्त करताना संकोच कसला? ह्या कवितेला रतीभावना प्रिय आहे आणि प्रीतीभावना हा तर तिचा प्राण आहे... आणि तरीही, ह्या रती प्रीतीत गुरफटून जात असतानाही, जीवनाच्या क्षणभंगुरतेची जाणीवही सुटलेली नाही. तेही शाश्वत बनवायचे आहे, तेही ह्या रती प्रीतीच्या साक्षीनेच!

क्षणभंगूर जरी जीवन सखे
सुखसुंदर करु आपण
सखे गऽ शाश्वत करु आपण....

शरीराची असक्ती, शृंगार नि:संकोचरीत्या व्यक्त करताना ही कविता धुंद शब्दकळेने नटते, पण तरीही तिचा कुठे तोल सुटत नाही की कुठे शब्द वाकुडा जात नाही. मनापासून, हृदयातून उमटलेल्या शब्दांमधे नावालादेखील हीण सापडत नाही...

तुझे वीजेचे चांदपाखरु दीपराग गात
रचीत होते शयनमहाली निळी चांदरात..

किंवा,

केळीचे पान पहा उजळ किती, नितळ किती
वाळ्याने भिजलेले उर्वशीचे वस्त्र उडे,पौषातील उन गडे....

हृदयातून उमाळत, उसासत येणार्‍या उत्कट भावना आणि इंद्रियाधिष्ठित संवेदना शब्दांतून अलगद जिवंत करणारी ही प्रत्ययकारी कविता.

हृदय मदाचे मोहळ झाले जडावली दृष्टी
पोहू लागले तुझ्या रेशमी अलकातील मासे
हवा जाहली जड पार्‍यासम अंगातील वासें
आणि तरंगत डुलू लागली नौकेपरी शेज
तो कांतीतूनी तुझ्या झळकले फेनाचे तेज
नखें लाखिया, दांत मोतिया, वैदूर्यी नेत्र
अवयव गमले चपल चिवट की मयवनीचे वेत्र
कात सोडिल्या नागिणीचे ते नवयौवन होतें
विलख्याविळख्यातुनी आलापित ज्वालांची गीतें
गरळ तनूतील गोठूनी झाले अंतरांत गोड
कळले का मज जडते देवां नरकाची ओढ

आणि तरीही केवळ शृंगार भोगात आणि इंद्रियाधिष्ठित अनुभवांच्या आसक्तीत गुंतून राहणारी ही कविता नव्हे. तिची अनुरक्ती केवळ भोगविलासापुरती मर्यादित नाही. त्यापलिकडे जाणार्‍या चिरंतन सहजीवनाची आणि स्निग्ध, समंजस अशा समर्पित नात्याची तिला जाणीव आहे. भान आहे, मोह आणि आकर्षणदेखील आहे.

तुला मला उमगला जिव्हाळा जन्माचा पट फिटला गं,
अन् शब्दांचा प्रपंच सगळा कमळासम हा मिटला गं...

तिच्या अंतरंगात प्रीतीचा अमृतझरा सतत झुळझुळत वाहता आहे..

प्रीत वहावी संथ ध्वनीविण या तटिनीसारखी
नकळत बहरावी या हिरव्या तृणसटिनीसारखी
स्पर्शकुशल झुळुकेसम असूनी कधी न दिसावी कुणा
तिल असावा या घंटेचा सूचक शीतलपणा
तिने फिरावे या खारीसम सहजपणे सावध
ऊनसावलीमधून चुकवीत डोळ्यांची पारध...

तिने अंतरंगातली माया, प्रेम जाणले आहे. शरीराच्या तृष्णेवीण रस कुठला प्रीतीला हे सांगणारी ही कविता, आयुष्याच्या शेवटीही आपले चिरतारुण्य जपते, आपल्या सखीच्या लावण्याला ती चिरवश आहे.. सखीच्याच हाताची सोबत घेऊन ह्या कवितेला गतायुष्याच्या आठवणींत रमायचे आहे. तिच्याबद्दलची कृतज्ञता आणि मनातून ओसंडून जाणारे प्रेम व्यक्त करायचे आहे...

शरदातील ओढ्यासम निर्मल
तुझा नि माझा ओढा
चार तपांनंतरही तू मज
सोळाचीच नवोढा...

सखीचा हात कधी मधेच सोडून द्यावा लागेल की काय किंवा सुटला तर ह्या भावनेने ती हुरहुरतेही, पण कधीतरी निसर्गनियमाप्रमाणे ताटातूट होणार हे सत्यदेखील ही कविता जाणते. असं असलं तरीसुद्धा आता सखीच्या अस्तित्वाने तिचे भावविश्व अष्टौप्रहर, अंतर्बाह्य असे काही व्यापले गेले आहे, की आता ताटातूट तरी होईलच कशी?

तशी आठवण येत नाही... भेटीचीही काय जरुर?
सूर वाहे ऊर भरुन, घरातदेखील चांदणे टिपूर
इतके दिवस हसतरुसत वाटले सृष्टीत नटली आहेस
आता कळले खोल खोल माझ्याच दृष्टीत मिटली आहेस
अंध होऊन हुलकावण्यांनी अवतीभवती राहिलीस खेळत
आता माझ्यात श्वास होऊन वहात असतेस सहज नकळत
कधी कामात, कधी गाण्यात फुलता फळता भानात नसतो
तुला विसरुन अष्टौप्रहर.... अष्टौप्रहर तुझ्यात असतो...

आणि तरीही, रसरंगात आणि प्रीतीत गुरफटून जाणार्‍या ह्या कवितेने मनात एक गोसावीपणही जपले आहे.


क्रमशः