July 27, 2008

बंगलोर आणि २५ जुलै २००८

शुक्रवार, २५जुलै, २००८. नेहमीप्रमाणेच बंगलोर सकाळी सकाळी आळोखे पिळोखे देत जागं होत असतं. नेहमीप्रमाणे मी सकाळची फिरुन परत येते, तेह्वा सकाळचे ७-७.१५ होत असतात. सकाळी बंगलोरमधली हवा एकदम मस्त असते, रात्रीचा पाऊस झाल्याने, हवेत आल्हाददायक गारवा असतो. पुण्याची हवाही अशीच होती कधीतरी... माझ्या मनात विचार आल्याशिवाय रहात नाही...

नेहमीप्रमाणे रस्त्यावरची बरीचशी दुकानं बंदच असतात. इथले दुकानदारही तसे पुण्यातल्या दुकानदारांचे भाऊबंदच!! आरामात साडेनऊ - दहाला आपापली दुकानं उघडणार!! अगदी इस्त्रीवाल्यापासून ते मॉलवाल्यांपर्यंत सगळे जण या परंपरेचं न चुकता पालन करणार... आनेका है तो हमारे टाइमपे आव, नै तो जाव!!तोच माज!! म्हणायला दूधवाला, एक किराण्याचं दुकान अन् एक दोन टपर्‍या सुरु झालेल्या असतात. बाकी, ही माझ्या घराजवळची टपरी एकदम खास!! तिथल्या काssssफीचा सुगंध तुमच्या नाकाशी जवळीक साधता साधता तुमची रसनेंद्रियंही हां हां म्हणता तॄप्त करुन जातो!! तर तिथे एक कॉफी रिचवून होतेच! तिथे काम करणारे एक दोघे जण, तिथेच फरशीवर फतकल मारुन एका लाकडी फळीवर पुढच्या रस्सम् सांबाराची तयारी म्हणून कांदे वगैरे कापण्यात गुंतलेले असतात. अगदी रस्त्यावरच बसलेले असतात, पण, याकडे फारसं लक्ष द्यायचं नसतं! नायतरी पंचतारांकित हाटेलात आतल्या मुदपाकखान्याची काय अवस्था अन् वेवस्था असते कोणास ठाऊक!! आमची अन्नदाती टपरी आम्हांला प्यारी! रस्त्यावर कांदे कापा नाहीतर गल्ल्यामागच्या एवढ्याश्या जागेत!

तर, सकाळी फिरुन परत येताना, हमखास दिसणारी दृश्यं, २५ तारखेलाही तशीच दिसत असतात -घरातल्या गृहिणींची घराबाहेर पाण्याने सडा शिंपण करुन, पाणी ओतून झाडझूड करुन रांगोळ्या काढायची लगबग, सुगंधी मोगर्‍याच्या वेण्यांचे हारे घेऊन विकायला बाहेर पडलेल्या फुलवाल्या, जरा उशीराने सकाळी फिरायला बाहेर पडलेले पेन्शनर्स... शहर हळूहळू जागं होत असतं.... मी राहते त्या भागात, ठराविक क्रमाक्रमानं बंगळुरुला जाग येते. आधी दूधवाले, पेपर टाकणारे लोक, मग फुलवाल्या, एखाद दुसरा भाजीवाला/ली, एक दोन दुकानवाले, तशातच शाळेत जाणारी पिल्लं आपापल्या आयांबरोबर चिवचिवत शाळेच्या बससाठी बाहेर पडतात. सकाळची शिफ्ट असणारे आयटी क्षेत्रातले विंजनेर, मॅनेजरही आपापले लॅपटॉप घेऊन आपापल्या कंपनीने पुरवलेल्या वाहनांची वाट पाहत थांबलेले तरी असतात, किंवा भरधाव वेगाने धावणार्‍या अशा वाहनांपैकी एकात, आपापला जीव मुठीत घेऊन बसून आपापल्या कंपन्यांमधून पोहोचत तरी असतात. बघता बघता बंगलोरच्या दिवसानं बर्‍यापैकी वेग घेतलेला असतो.

मीही नेहेमीप्रमाणे माझी सुमो पकडून नेहमीप्रमाणे हापिसात, शहरापासून दूर पोचते, काम सुरु होतं. एकदा कंपनीच्या आवारात शिरलं की शहराशी तसा काही संपर्क राहात नाही. शुक्रवार म्हणून जरा सगळेच आरामात असतात. रुटीन कामं, मीटींगा सुरु असतात, एक सहकारी नव्या नोकरीत रुजू होणार, त्याचा आमच्या बरोबर शेवटचा दिवस असतो, आता तो जाणारच म्हटल्यावर, मॅनेजरला तो किती कामसू आहे याचा सा़क्षात्कार होऊ घातलेला असतो... आम्हां एकत्र टपोरीगिरी करत असलेल्यांना अस्सल टपोर्‍या चालला म्हणून लै वाईट वाटत असत... त्यातच गप्पा, कामं, अस सुरु असतं. असंच थोडंफार बंगलोरमध्ये प्रत्येक कंपन्यांमधून सुरु असावं, नाही?

बाकीचं शहरही आता धावायला लागलेलं असतं. बंगळुरु तसं शांतताप्रिय शहर. अस्सल मूळ बंगळुरी माणूस आरामात जगायला प्रथम पसंती देतो, अस माझं मत. कॉफी, इडली, डोसे आणि रस्सम भात असला की दुपारी मस्त ताणून द्यायला त्याला मनापासून आवडतं. आता आयटीसारख्या फैलावलेल्या उद्योगामुळे जी काही हालचाल सुरु आहे, तीच आणि तेवढीच हालचाल. आयटी उद्योग बाहेर न्या, की बहुधा बंगळुरु परत एकदा बर्‍यापैकी पेंगायला लागेल!

आमच्या हापिसातही, माझ्या टीमची चंगळ असते! मीटींगा वगैरे आटोपलेल्या असतात, आणि आता पुढचे २-३ तास सांघिक भावना वगैरे असल्या विषयावर प्रशिक्षण असतं! टीपीची नामी संधी, असं जाणून आम्ही सगळे प्रशि़क्षणात भाग घ्यायला निघतो, आणि, बॉसलाही तिथे पुढचे २-३ तास काय धुमाकूळ चालणार याची पूर्ण कल्पना आलेली असते!! "हरलो बुवा मी", किंवा "मी तर तुमच्यापुढे हातच टेकले बुवा", छाप हसत तो मान हलवतो आणि आम्हांला लै लै आसुरी आनंद होतो!!!

प्रशिक्षण मजेत सुरु असतं, आणि, तेवढ्यात प्रशिक्षणात उशीरा सामिल झालेला एक सहकारी बाँबस्फोटाची वार्ता सांगत सांगत येतो. सारेजण अवाक् होतात!! हे काय मधेच! कोणाचा विश्वास बसणं कठीण असतं! एव्हाना, सर्वांचे सेल फोन किणकिणायला सुरुवात झालेलीच असते... एक तर शहरापासून दूर असल्याने, खरं तर अजूनपर्यंत शहरात नक्की काय झालंय याचा आम्हालाच काही पत्ता लागलेला नसतो, पण बंगलोरमधे अन् इतर शहरांतही घरी टी.व्ही. पुढे बसून बातम्या पाहणारे आई वडिल, इतर नातेवाईक, भाऊबंद, इंटरनेटच्या माध्यमातून बातम्या पाहणारी मित्र मंडळी - सगळेच हादरलेले असतात! हळूहळू बातमीच गांभीर्य वाढायला लागतं आणि सर्वांचा मूडही गंभीर होत जातो. प्रशिक्षणात आता फारसं कोणाचं लक्ष नसतं....

प्रशिक्षक तरी म्हणतेच, " इथे बसून आत्ता आपण काही करु शकतोय का?? मग निदान प्रशिक्षण तरी पूर्ण करुयात!" परत एकदा सगळे प्रशिक्षणात मन रमवायचा प्रयत्न करतो... सगळ्यात जास्त माझा सेल वाजत असतो, बंगळुरुमधल्या अन् पुण्यातल्या इतर मित्र मैत्रिणींचेही फोन, निरोप यायला सुरुवात झालेली असते! थोडंस वैतागून माझी प्रशिक्षक मला सेलफोन सायलेंट मोडवर ठेव अशी सूचनावजा आज्ञा करते. मी काही म्हणायच्या आत, लग्गेच माझे सहकारी तिची कल्पना मोडीत काढतात. "ती इथली नाही आहे, पुण्याहून तिचे फोन येताहेत, ती ठीक आहे ना, हे पहायला. समजा, सायलेंटवर फोन असताना तिला फोन आल्याचं समजलं नाही, अन् तिने फोन घेतला नाही, तर तिथल्या लोकांना डोक्याला घोर लागेल, तिचा फोन सायलेंटवर नको आत्ता..." आणखी सांघिक भावना काय वेगळी असते?? सगळ्यांचा आग्रह प्रशिक्षिकेलाही मोडवत नाही.

घरी फोन करायचाही मी आटोकाट प्रयत्न करते, तितक्यात सेल नेटवर्क जाम झालेलं असतं! आई, बाबांच्या जीवाला कसा घोर लागला असेल, याची कल्पना करुनच मला रडू फुटायच्या बेतात असतं. वैयक्तिक फोन ऑफिसमधले फोन वापरुन करायचे नाहीत, हा नियम "गया भाडमें" असं म्हणत माझा बॉस मला फोन लावायची सोय करुन देतो. "आरामसे, ठीक तरहसे बात कर..." हे पण सांगतो. घरी खुशाली कळवून मीही जरा निर्धास्त होते, आणि माझा आवाज ऐकून घरच्यांचा जीवही भांड्यात पडतो. बाकीच्यांचेही फोन लावून, करुन झालेले असतात, खुशाली विचारुन झालेली असते...

प्रशि़क्षण संपवून आम्ही बाहेर पडतो. कँपसमधे ठिकठिकाणी घोळके उभे राहून जरा दबक्या आवाजात एकच चर्चा करत असतात! बंगलोरमधे, आपल्या घरांच्या आसपास असं होईल, होऊ शकत, हे पचवायला बहुतेकांना जडच जात असत... काहीजणांची कुठलं आयटी पार्क आधी उडवतील यावरही चर्चा सुरु झालेली असते. काही जण लवकर घरी गेलेले असतात, त्यांची पिल्लं शाळांमधून सुरक्षित घरी आणायची असतात. जनजीवन तसं विस्कळीत झालेलं असतच, पण त्याहीपेक्षा अचानक बसलेला मानसिक धक्का बर्‍याच जणांसाठी जबरदस्त असतो. रस्त्यांवरही बर्‍याच कंपन्यांनी लोकांना घरी जायला परवानगी दिल्याने भरपूर गर्दी वाढलेली असते.... बंगळुरुमधली वाहनव्यवस्था परत एकदा कोलमडलेली असते, आणि या परिस्थितीमुळे आमची कंपनी आम्हांला नेहमीच्याच वेळेला, म्हणजे रात्री ८:००नंतर सोडायचा निर्णय घेते.

परत माझ्या जागेवर येऊन बसल्यावर, परत एकदा कामात गुंतवून घेण्याबरोबरच स्नेह्यांच्या खरडी, मेल्स, खुशालीबाबतचे प्रश्न, खुशाली कळवणं सुरुच राहत... नोकरी सोडलेला सहकारी संध्याकाळी ५:०० वाजता जायला निघतो, तसं सगळेच त्याला जपून जा आणि घरी पोचल्याचं कळव, असं कैकदा बजावून सांगतो. तब्बल साडेतीन तासांनी, रात्री ८:३० ला तो घरी पोचतो, आणि तो व्यवस्थित घरी पोहोचला हे ऐकून सगळ्यांनाच हुश्श् होतं! हळूहळू हापिसमधेही वातावरणातला ताण सैलावलेला असतो, घरी जायची वेळ जवळ येत असते अन घरी जायचे वेधही लागलेले असतात. एकमेकांना घरी जाताना वीकांताला फारसं बाहेर पडू नका, असं आवर्जून सांगितलं जातं. कंपनीची वाहन व्यवस्थाही बर्‍यापैकी कोलमडलेली असते, शहरात गेलेली वाहनं अडकलेली असतात, निम्मी अधिक परतलेली नसतात..... तरीही सर्वांची घरी जायची सोय ऍडमिन विभागातले कर्मचारी जातीने उभे राहून करतात, घरापर्यंत सोडणं आज शक्य नाही, मुख्य रस्त्यापर्यंत सोडू शकतो, कृपया सहकार्य करा, असं विनवतात. त्यांचाही इलाज नसतो, पुन्हा सर्व सुखरुप जावेत याचंही टेंशन.

परत घरी जाताना, बंगलोर परत एकदा सुरळीत, मार्गाला लागलेलं आहे हे लक्षात येतं, आणि जनतेचा विश्वास टिकून राहण्यासाठी हे खूप आवश्यक असतं. माथेफिरु विघ्नसंतोष्यांच्या नाकावर टीच्चून बंगलोरमधले व्यवहार सुरुच असतात! हे बघून सुद्धा खूप खूप बरं वाटतं... सुरुवातीला इथे आल्यावर ह्या शहराला जितक्या शिव्या घातल्या, त्याच शहराबद्दल आता आत्मियताही वाटायला सुरुवात झाली आहे, हेही तेवढयात लक्षात येत! स्वतःचीच गंम्मत वाटते!

एव्हाना मस्त पाऊस झालेला असतो, रस्ता धुवून निघालेला असतो, वातावरणातही सुखद गारवा आलेला असतो. परत एकदा हा सुखद गार हवा अंगावर झेलत, मुख्य रस्त्यावर उतरून मी पायी पायी घरी जायला निघते. सगळा माझाच एरिया तर असतो, भीती कसली??

नवीन दिवसाला सामोरं जायला बंगलोर परत एकदा रात्रीच्या कुशीत विसावायला सुरुवात करत असतं, रस्त्यांवरची रहदारी तुरळक होत चाललेली असते. मध्यवर्ती भागांमधून मात्र, अजून थोडा वेळ रहदारी सुरु राहणार असते...

बंगळुरु थांबणार नसतं!

July 21, 2008

प्रत्येकाचा अंधार अन् सूर्य

कधी कधी असं उगीच होऊन जातं.... सगळे रस्ते बंद झाल्यासारखे वाटतात, आतल्या आत मन धुमसत राहतं, स्वतःचं मन, स्वतःलाच अनोळखी! मनात काय चाललंय, का चाललंय, कशासाठी चाललंय, त्यातून काय निष्पन्न होणार, होणार का? सारंच कसं अगदी बेभरवशाचं. प्रश्न आहेत, कधी कधी त्यांची उत्तरंही आहेत, पण हवी असणारी अन् लागू पडणारी आहेत का, हे मात्र ठाउक नाही... प्रत्येक वेळी आजमावून पहायची हिंम्मतही नाही, आणि तरीही आयुष्य सुरुच राहतं. आला दिवस आपला म्हणायचा का? हं, तसच असावं बहुधा...

जणू काही एका अश्या वळणावर कुठेतरी उभं असतो, जिथून रस्ते तर भरमसाठ निघतात, पण यातला माझा कुठला, असं वाटत राहतं. कोणत्याच रस्त्याशी बांधिलकी वाटत नाही, चार पावलं चालून मधेच रस्ता बदलला तरी, रस्त्यावर आपल्या पाऊलखुणा राहतील असही काही नाही आणि आपल्या मनातही त्या रस्त्याची काही आठवण राहील याची खात्री नाही, नाळच जुळत नाही, आणि तरीही एक रस्ता निवडून चालायच..... का? थांबण्यातही स्थैर्य असेलच, अस खात्रीपूर्वक सांगता येतं, असही नाहीच...

वरवर सगळं कसं छान छान, सुरळीत, एकदम मस्तच असत! पण कुठेतरी मनात एक खोलवर एक डोह असतो, ज्याचा तळ गवसत नाही... किती खोल जावं तळ शोधायला? गवसेलच याचीही शाश्वती नाही, परत उलट फिरुन काठावर येईनच याचीही खात्री नाहीच, आणि समजा जरी काठ दिसला आणि तिथपर्यंत पोचता आलं तरी परत एकदा काठावर उभं राहून पुन्हा एकदा डोहात वाकून पाहताना आपलंच प्रतिबिंब आपल्यालाच परकं वाटल तर??

काही कळत नाही... स्वतःच स्वतःला अनोळखी होत जाता जाता ओळख शोधायची तरी कुठे? प्रत्येकाचा अंधार वेगळा, प्रत्येकाचा सूर्य वेगळा... एकाच्या सूर्याला दुसर्‍याचा अंधार पेलेलच असंही नाही!

शेवटी प्रत्येकाने आपापला अंधार पेलायचा आणि त्याला छेद देऊ शकणारा स्वतःचा सूर्य स्वतःच शोधायचा.. कदाचित असंच असाव.