December 30, 2007

संकल्पाची ऐशी तैशी

जसजस नव वर्ष जवळ येतय, तसतस नवीन वर्षाचे संकल्प, या विषयाला चांगलीच मागणी आणि धार चढायला लागलेली दिसतेय! बर्‍याच अनुदिन्यांवर देखील नवीन वर्ष, नवे संकल्प इ. इ. वर लेखण्या सरसावल्या गेल्यात!! बर्‍यापैकी चावीफळे (पक्षी: कीबोर्ड) बडवून झालेत! बर्‍याच उत्साही जनांनी 'नेमेचि येतो मग पावसाळा' च्या धर्तीवर 'नेमेचि करु या संकल्प आता' म्हणून संकल्प केले असतील. हां, आता अजून १ जानेवारी २००८ आणि पुढच वर्ष उजाडलेल नाही, त्यामुळे, हे संकल्प खरोखरीच राबवले जाताहेत का ते मात्र कळायला अजून वाव नाही!! अर्थात, घोडा मैदान जवळच आहे म्हणा, कळेलच लवकर कोण किती दृढनिश्चयी आहे, आणि संकल्पांची घोडी कुठपर्यंत दामटली जाताहेत ते!!

मला विचाराल तर, माझा काहीही संकल्प नाही!! आतापर्यंत संकल्प करण्याचे अन ते डोळ्यांदेखत आणि मनादेखत खितपत पडण्याचे अन पाडण्याचे भरपूर प्रयत्न आणि प्रयोग आपसूकच झालेत. त्यात परत काय आहे, की मुळातला पिंड आहे गोवा, कारवार वगैरे या भागातला, तेह्वा उगाच कटकट, दगदग करायला आवडत नाही! सुशेगात राहण्याला प्रथम पसंती!! त्यात हे असल काय बसत नाही हो!! जेवढ काही जिवाला त्रास न देता, सहजगत्या होऊ शकत तेवढच करायच, हे ब्रीदवाक्य. स्वतःच संकल्प करायचे, स्वतःच त्याची आखणी करायची, व्यवस्थित फूल प्रूफ प्लॅन करायचा, किती कष्टाच, अन वेळखाऊ काम आहे माहित आहे का? अन भरीस भर म्हणून पुन्हा त्याची अंमल बजावणी, ती पण आपणच स्वतः करायची... परत एखाद दिवशी समजा नाहीच जमल, तर पुन्हा आपणच आपली खरडपट्टी काढायची!! आता आहे का?? म्हणजे आपणच आधी सगळ ठरवायच वगैरे, म्हणजे, संपूर्णतः आपण या संकल्पनेचे मालक असतो, नाही का?? पण सरते शेवटी ही संकल्पना, किंवा संकल्पच आपले मालक बनून जातात, अशी काहीशी परिस्थिती!! हे काय बरोबर वाटतय का, सांगा बर! सांगितलेत कोणी नको ते धंदे?? म्हणजे जर आपण ठरवणार असू, की आपल्याला अमूक अमूक, अस, याप्रकारे करायचय बरका आता नव्या वर्षापासून वगैरे, तर एखाद दिवशी ते नाही केल म्हणून काय बिघडणारे का??? पण तस नसत रे सायबा......

संकल्प केलाय, मग तो पार पाडायला हवा, असा काहीतरी अलिखित नियम आहे म्हणे!! म्हणजे, आपली स्वतःची काहीच हरकत नसते एखाद दिवस नेहमीच "संकल्प नामक रुटीन" बदलायला, पण ज्या कोणाला आपल्या संकल्पाची कल्पना असते त्या सर्वांची मात्र असते!! मग आधीच डोक्यावर ते संकल्प नामक ओझ आणि भरीला भर म्हणून सर्वांच्या हरकतीच ओझ!! सरळ साध असणार आयुष्य उगाचच खड्ड्यात घालायच असेल तर खुशाल करा संकल्प!! होऊनच जाऊंदेत मग!!

तर, तुम्हां सार्‍या उत्साही जनांना शुभेच्छा, संकल्प करण्यासाठी, ते अमलांत आणण्यासाठी आणि यदाकदाचित ते मोडलेच, तर फारस वाईट न वाटून घेण्यासाठी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजूबाजूच्यांच्या कमेंटस धीरोदात्तपणे एका कानाने ऐकून दुसर्‍या कानाने सोडून देण्यासाठीही. प्रयत्नांती संकल्पेश्वर म्हणे!!

तेह्वा, चालू देत तुमच संकल्पवाल्यांच. मी तरी आपलं, मस्तपैकी संकल्पविरहीत सुशेगात जगायच म्हणते यावर्षी!!

पण, आत्ता एक सुचल!! माझ्या ब्लॉग वाचक मायबापांसाठी एक आयडिया सुचली!! तुम्हां सार्‍यांना एक मस्त संकल्प सुचवू का?? :D

जेह्वा, जेह्वा, इथे या अनुदिनी वर याल, काही वाचाल, तर त्याबद्दल आपल मत जरुर सांगायच. संकल्प कसा वाटतो?? :) :D अगदीच काही नाही , तर निदान हाय हॅलो तरी म्हणा की!! :) म्हणजे कस, भेटल्यासारख वाटत ना, म्हणून! :) परत एकदा, येणार्‍या नववर्षाच्या शुभेच्छा!! :)

शुभेच्छा


येणार्‍या नवीन वर्षाच्या तुम्हां सार्‍यांना खूप सार्‍या शुभेच्छा!!

December 26, 2007

शब्द पसारा

कधी कधी काय होत ते समजत नाही खर तर. इतका कंटाळा दाटून येतो आतून, काही स्पष्टीकरण नसत त्यासाठी. जणू काही अंतर्मनावर कसल तरी मळभ दाटून आलेल असत. काहीच नकोस वाटत, लेखन वाचन, शब्द... सार काही परक वाटत अगदी. अस वाटत की मी कुठेतरी उभी आहे अन एक विशिष्ट परिघावर हे सार आहे. म्हणजे हेच, लेखन, वाचन, शब्द, ह्या सगळ्या गोष्टी. इतर वेळी मी यांच्यापासून स्वत:ला वेगळ काढूच शकत नाही, श्वास घेण्याइतकच ते ही सहजच आहे, पण कधी कधी हे ही परकच वाटाव?

अस वाटत की आहोत तिथूनच हात लांब केला तर येईलही आवाक्यात, पण जस, ज्या प्रमाणात हवय, ज्या कसदारपणे हवय, तस नाही आल तर? जरा वेळाने, हे अप्राप्य प्राप्त करण्याची खरच इच्छा आहे का इथपासून सुरुवात होते! काय आहे हे? मला स्वत:लाच कळत नाही कधी कधी. काय चाललय? कुठे जायचय, मकाम कुठे आहे, आहे का? का नुसतच जिप्सी होऊन भटकायच आहे? नक्की काय करायच आहे, ह्याचाच गोंधळ उडल्यासारखा होतो माझा. लक्ष्याचा शोध म्हणावा का?? स्वत:चा शोध? उगाच मोठे शब्द पण नाही वापरायचे मला.

ही तक्रार नाही आहे, किंवा मी रडगाणही गात नाही आहे, असच थोडस स्वत:शीच संवाद साधायचा हा एक प्रयत्न आहे. स्वत:ला शोधायचा म्हणूया हव तर.

आणि ही सगळी तगमग उराशी जपत, परत ते सगळे व्यवहारातले मुखवटे घालून जगातही यशस्वीपणे वावरायच, वावरतेही. तेही आवश्यकच ना? अजिबात तक्रारीचा सूर नाही त्याबद्दल, एक निरीक्षण नोंदवल, इतकच. जगाबद्दल वगैरे माझी मुळीच तक्रार नाही, किंवा जग विरुद्ध मी, किंवा जगाने माझ्यावर अन्याय केलाय असले हास्यास्पद दावे मी मुळीच करत नाही. मला वाटत, कधी कधी आपला स्वत:चाच दावा असतो स्वत:शीच. स्वत:लाच समजावयाचे, काय समजावयाचे पण?

अन कधीतरी शब्द पण पोकळ वाटतात! पाण्यावरचे बुडबुडे जणू. काय अन कस? काही काही अवस्था अश्या असतात ना, की त्या स्वत:च अनुभवायच्या, स्वत:च जळायच अन स्वत:च ती तगमग पण अनुभवायची! त्या कोणापाशी बोलून दाखवता येत नाहीत, बोलावस वाटत नाही असही नाही, पण एक तर योग्य शब्द सापडत नाहीत किंवा ते शब्दांच्या पलिकडे पोचलेल असत. मग बोलायची गरज पण संपून जाते.

विचित्र झाल आहे! स्वत:च्याच मनाशी असलेली बांधिलकी तुटतेय का? काहीतरी स्वत:शीच एक नाळ तुटल्यासारखा अनुभव, होता होता, एक राहून गेलेला संवाद जणू, की नुसताच जड झालेला शब्द पसारा?

कधीतरी एकदा असच,
अवती भवती फेर धरत,
सभोवताली हसत नाचत,
शब्द म्हणाले खेळ खेळत.....

म्हणाले, चल ना, जाऊ,
उंच शब्दभरार्‍या घेऊ,
जाणीवा, नेणीवांच्या जगात
एक चक्कर टाकू अन,
असच जरा भटकून येऊ....

हातात हात गुंफत,
आणि मनात गाणी जागवत,
एकमेकांना सोबत करत,
निघालो असच वाटचाल करत.
भिंगरीसारखे भिरभिरत,
पाण्यासारखे झुळझुळत,
उन्हांसारखे तळपत,
आणि सावलीसारखे शांतवत.

मधेच वाटत, खेळ संपला......
हात कधीचाच हातातून सुटला,
शब्दांच जणू कुरुक्षेत्र होता,
वावर नशिबी असेल का इथे,
अश्वत्थाम्याच्या जखमेच दु:ख सोसत?

December 24, 2007

सोनेरी उन्हं

या सप्ताहांताला ऑफिसमधे जायला लागल. शनिवार, अन रविवार पण!! मग, सांगतेय काय??? जाम वैताग आलेला.. आता आयटीमधे काही वर्ष जगून, शनिवार, रविवार सुट्टी हा माझा जन्मसिद्ध हक्क झालाय ना? अन मग त्याचीच पायमल्ली?? माणसाने जगाव तरी कस??लईच पिळून घेतात राव... ह्म्म्म्म...

तर, मनातल्या मनात बापूला, त्याच्या बापूला इत्यादि सर्व प्राणीमात्र, की ज्यांना शिव्या घालता येण शक्य आहे आणि जायज आहे - प्लीज नोट, उगाचच अन्यायाने कोणालाही शिव्या घालत नाही मी :D - अश्या सर्वांना शिव्या देत देत (पुण्यातली व्यक्ती असून शिव्या येत नाहीत म्हटल, तर पुण्याची लाज जाईल की !) मी शनिवारी ऑफिसला जायला लाल वोल्वोत बसले. हे बंगळुरुमधल लाल रंगाची वोल्वो प्रकरण मात्र एकदम सहीये! अस्ताव्यस्त अन बेशिस्त ट्रॅफिकमधून ही लाली अश्या नजाकतीत तुम्हांला इथून तिथे घेऊन जाते ना, की काय सांगाव! अगदी अल्लाद म्हणतात ना, तस! आता मी पुण्याचीच असल्याने बेशिस्त वाहनांची मला चांगलीच सवय आहे!! पुण्याच्या रस्त्यावरून गाडी मारताना ( आम्ही पुण्यात दुचाकीलाही गाडीच म्हणतो!! असो. :P) अंगी स्थितप्रज्ञ वृत्ती, वेगवेगळया प्रकारची संभाषणं ऐकून (यात शिव्या पण जमेला धरा!) ज्ञानात अफाट भर पडणं, कुठल्याही ट्रॅफिक चक्रव्यूहाचा यशस्वी भेद करायच कौशल्य अंगी येण, अस बरच काय होत असत.... सो नो वरीज पीपल... असो.

तर, ऑफिसला पोचले, काम अस काही नव्हतच, फक्त उपस्थिती अनिवार्य. मग म्हणल, चला भटकू ऑफिसच्या कँपसमधे. छान आहे कँपस खर तर. हिरवाई जोपासली आहे बरीच. आणि गेले आठवडाभर बंगळुरुमधे थंडीबरोबर कधीकधी रिमझिम तर कधी बदाबदा गिरणारा सावन पण आहे, जवळ जवळ आठेक दिवस धड सूर्यदर्शन झाल्याच आठवतच नाही. तसही, सोमवार ते शुक्रवार कामाच्या चक्कीला जुंपल की इतर काही पाहण्याची शुद्धही राहत नाही म्हणा....

तर, भटकता, भटकता अशीच एका बाकावर बसले. इतकी निरव शांतता होती, आणि सगळा परिसर इतका सोनेरी दिसत होता.... शांत, शांत बसून राहिले. अगदी आत कुठे तरी शांतता झिरपत होती. अगदी आत्म्याला वेढून राहिल्यासारखी वाटली. एकदम समाधानच भरून आल मनात. आजूबाजूला बघताना लक्षात आलं, मस्त सोनेरी ऊन्हं पडली होती, सगळ्या परिसरावर पसरली होती. एकदम उबदार, एखादी दुलई अंगावर पांघरून बसाव तस वाटत होत अगदी. परिसरही तसाच वाटत होता, अचानक एक नातच जुळल्यासारख वाटल सार्‍या आसमंताबरोबर. भर दुपार असली तरी उन्हाला कुठेही रख्ररखीतपणाचा स्पर्शही झाला नव्हता, मऊसूत, सोनेरी, झळाळणारी उबदार उन्हं इतकी देखणी दिसतात, हे किती तरी दिवसांनी अनुभवल. वाटल, हातात पकडून ठेवू शकेन का थोड माझ्याचपाशी? खूप वेळ तशीच बसून राहिले, सोनेरी उन्हं अनुभवत अन त्या सोन्याने सोनेरी बनलेला आजूबाजूचा परिसर निरखत. शनिवार, रविवार ऑफिसला येण्याच सार्थक झाल....

आणि हो, बापूच्या अन त्याच्या बापूच्या नावाने दिलेल्या शिव्या यावेळपुरत्या रद्द समजण्यात याव्यात! :D

December 22, 2007

सुहृद - भाग ६

शाळेत जाताना पण मास्तरांच्या मनात अनेक विचार थैमान घालत होते। लक्षच नव्हते कशातही. एका विचित्र पेचात जणू ते अडकले होते. तत्वांना उराशी कवटाळाव, तर लेकीच्या स्वप्नांची राखरांगोळी डोळ्यांदेखत होत होती, आणि लेकीची स्वप्न फुलवायला जाव, तर तत्वं पायदळी तुडवली जाणार असच चित्र दिसत होत. मास्तरांना एकदम थकून, गळून गेल्यासारख, लढाई हरल्यासारख वाटायला लागल होत... शाळेत पोचले नाहीत, तोच, चालकांनी ऑफिसात बोलावले आहे असा निरोप आला. मास्तर ऑफिसात गेले.

"या, या मास्तर, मग काय ठरीवलय तरी काय मास्तर? कळू तरी द्या...."

"मला खोट बोलायला जमणार नाही..."

"आर तिच्या मारी!! काय लावलय राव खोट खोट! खोट काय बोला म्हणलोय का मी? फक्त गप्प बसा म्हणतोय न्हव का??! आन खोटच बोलायच नाय तर तुमच्या पावण्यांना सगळ सांगाया वो काय कोणी बंदी तर नाय घातली ना? ते का व्हईना हो तुमच्या हातन...? तिथं का नाय खर खर बोलला आधीच?? आँ? तर मग जाईबाईच्या नशिबातच रडणं दिसतय तर!! हां, आता ती आन तिच नशीब नाय का मास्तर, त्याला तुम्ही तरी काय करणार अन मी तरी काय करणार... या तुम्ही!" मग्रूरपणे चालकांनी मास्तरांना बाहेर जाण्यासाठी सुचवले.

आयुष्यात एक भयानक पोकळी निर्माण झाली आहे अन ती आपल्याला कुठेतरी अंधारात ओढून घेउन चालली आहे असे मास्तरांना वाटायला लागले होते। कसाबसा दिवस संपवून ते घरी आले. संध्याकाळ अन रात्र अशीच उदासवाणी गेली...

दुसर्‍या दिवशी मास्तरांनी राजीनामा लिहिला अन ते शाळेत जाण्यासाठी बाहेर पडणार, इतक्यात दारावर थाप पडली। कोण आले असावे असा मनातल्या मनात विचार करत मास्तरांनी दरवाजा उघडला अन पाहतात तो काय! दरवाजात दादासाहेब अन अनिकेत उभे होते! अचानक दोघांना दरवाज्यात उभे राहिलेले पाहून मास्तरांच मन भितीने एकदम झाकोळून आल... एवढ्या लवकर जाईची स्वप्न पायदळी तुडवली जाणार? बापाच मन कळवळल....

"काय सर, येऊ का आत?? अहो, इतक आश्चर्य वाटायला काय झाल?" दादासाहेब बाहेर उभे राहून प्रसन्नपणे हसत विचारत होते.

"अं.. नाही, नाही तस नाही, या, या... बसा. अग , ऐकलस का? दादासाहेब आलेत आणि अनिकेतही आलेत सोबत... चहा, जेवणाच बघा...."

स्वयंपाक घरात मास्तरांच्या पत्नीच्या पोटात गोळा उठला!! आता काय होईल? यांना काही समजल असेल का?

"सर, कुठे चालला होता का तुम्ही?? बाहेर जायची तयारी दिसतेय..."

"हां, तस काही नाही, आपल हेच... शाळेत चाललो होतो...."

"हं... अच्छा... काय म्हणतेय शाळा तुमची, ठीक ठाक सगळ? आणि लग्नाची तयारी कुठवर आलीये? आमची ही तर अगदी जोरदार बेत करते रोज, ही खरेदी, ती खरेदी... काय काय सुरुच असत तिच, अन सध्ध्या लेकाला पकडलय खरेदीसाठी!! मी पण म्हणतो जा रे बाबा, तेवढीच तुला सवय पुढच्या आयुष्यासाठी, काय म्हणता?? खर की नाही? द्या टाळी!! " मास्तरांनी कसनुस हसत टाळी देण्यासाठी हात पुढे केला. "आणि जाई कुठे आमची? जाsssईSSS, ए जाssई... सर, एकदम गोड मुलगी आहे हो तुमची... कुठे गेली? तिला भेटायला म्हणून तर आलो मी!"

एवढ्यात जाई बाहेर आली। तिने दादांना वाकून नमस्कार केला, अनिकेतकडे कळत नकळत एक दृष्टीक्षेप टाकला. अनिकेत तिच्याकडेच पाहत होता. परत एकदा तीच शांत, हसरी, मनाचा ठाव घेणारी नजर.....

"आलीस बेटा, ये, ये, आईलाही बोलव बेटा। सर, तुम्हां सर्वांशीच बोलायचे आहे आम्हां दोघांना. काही गोष्टी स्पष्ट झालेल्या बर्‍या, नाही का?" मास्तर आणि त्यांच्या पत्नी धडधडत्या मनाने दादासाहेबांपुढे येऊन बसले.

"जाई बेटा, जरा आत जा बर तू...."

"नाही वैनी, तस नको, जाई देखील इथे असलेली मला हवी आहे। शेवटी हा तिच्या पण आयुष्याचा प्रश्न आहेच ना... थांब बेटा..... "

हे ऐकूनच, लेकीसाठी, तिच्या कानावर आता जे काही काही पडेल अन तिची काय प्रतिक्रिया होईल या धास्तीनेच आईची छाती दु:खाने दडपली!

"सर, वैनी, आमच्या कानावर सगळ काही आलय। सर, तुम्ही संस्थेत पैशाची सोय करायला गेला होतात अन तिथे चालकांनी तुम्हांला काय काय अटी घातल्या आहेत अन काय काय धमक्या दिल्या आहेत हे सगळ कळलय आम्हांला!"

"दादासाहेब... माझ चुकलच खर तर॥ मी खर तर तुम्हांला माझ्या भावाविषयी सांगायला हव होत... तुमच्यापासून लपवायच अस नव्हत हो मला, पण एकदम काय सांगाव अन कस सांगाव या विवंचनेत होतो मी.. पुन्हा इतक्या वर्षांमागच्या गोष्टी... त्याला सगळे लागू नयेत ते छंद लागले, सवयी लागल्या, त्यापायी झालेला तुरुंगवास... पण खूप वर्ष झाली याला.. दुर्दैवाने म्हणा किंवा काही म्हणा, आता तो या जगात कुठे आहे कोणालाच ठाऊक नाही, त्याला शोधायचा प्रयत्न केला, पण काही ठावठिकाणा नाही... जाईची काहीदेखील चूक नाही हो यात.... जाई, बेटा... "

"शांत व्हा सर। ऐका तर खर माझ. आम्हांला हे सगळ जाईकडूनच कळलय... मोठी धीराची आणि स्वाभिमानी लेक आहे तुमची सर... अगदी आम्हांला हवी तशी आहे आमची होणारी सून! काय जाई? एकदम सासर्‍यावर गेलीयेस हां तू!!" दादासाहेबांनी वातावरणात आलेला ताण हलका करण्याचा प्रयत्न केला.

"जाई? जाईने सांगितल तुम्हांला? पण॥ तुला कोणी सांगितल जाई? कस कळल?" मास्तर गोंधळून विचारत होते, त्यांच्या पत्नीही गोंधळल्या होत्या।

"आई, बाबा, त्यादिवशी ऐकल मी॥ मी मैत्रिणीकडे गेले होते ना, तिथे पोचले अन कळल की तिला काही कामासाठी बाहेर जाव लागतय, मग काय तशीच माघारी फिरले.. दरवाज्याशी पोचले तोच बाबांचा चढलेला आवाज ऐकू आला म्हणून दाराशीच थबकले अन सगळ ऐकल... ऐकून इतका त्रास झाला!! माझ लग्न ठरलय याचा गैरफायदा घेऊन तुम्हांला कोणी कोंडीत पकडू पाहणार असेल तर, मला त्यात कसला आलाय आनंद? आणि तुम्ही दोघांनी मला काही सांगितल नाहीत ना? का? विश्वास नव्हता वाटला माझा? मी मुलगी आहे म्हणून? मी एवढी स्वतःतच मशगुल राहिन, तुमची काहीच काळजी मला वाटणार नाही, अस वाटल का तुम्हाला?" बोलता बोलता जाईच्या डोळ्यांत पाणी तरळल.....

"॥तस नाही ग बेटा.... हं, तरीच दरवाजापाशी काही वाजल्याचा आवाज आला त्यादिवशी, पण बाहेर येऊन पाहते तो कोणीच नव्हत... "

"मी सटकले ग आई, मागच्या मागे..."

"तर सर, जाईने त्यादिवशी तुमच बोलण ऐकल अन तिने अनिकेतला फोन करून सगळ सांगितल। अनिकेतने ते आम्हाला सांगितल. अन तुमच्या भावाबद्दल म्हणाल ना, तर आम्हांला ठाऊक आहे ते आधीपासूनच. अनिकेतच्या जिवलग दोस्ताचा एक मित्र तुमचा विद्यार्थी होता, त्याच्याकडून खूप काही ऐकलय तुमच्याबद्दल, आणि काकाच्या पूर्वायुष्याची सजा पुतणीला देऊ नये हे कळण्याइतके मीही केस पांढरे केलेत की आता!! सर, उगीच टेंशन घेऊ नका विनाकारण... अप्पांनीही मला कल्पना दिली होती सर... मीच म्हणालो, ते एवढ महत्वाच नाही आता... "

"दादासाहेब... काय बोलू आता मी.... खरच...."

"खर सांगू का सर, जाईचा खूप अभिमान वाटतो मला। वयामानाने तिचे विचार परिपक्व आहेत. तिने अनिकेतला जेह्वा भावी जोडीदाराबद्दल तिच्या अपेक्षा बोलून दाखवल्या ना, तेह्वा, घर, गाडी, घोडा, पगार यापैकी काहीच विचारल नाही, तिला हवा आहे तिच्यासारखाच एक सुहृद जोडीदार, जो तिला सतत साथ देईल... अश्या मुलीला नाकारण्याचा करंटेपणा आम्ही कसा करू? आणि अनिकेत दुसर्‍या कोणा मुलीला जोडीदार मानायला तयार होईल अस वाटत नाही मला... काय अनिकेत?? दुसरी कोण सुहृद मिळणार त्याला अशी?? स्पष्ट सांगितल आहे त्याने तस, आणि आमचाही पूर्ण विश्वास आहे त्याच्या निर्णयावर. "

"तुमचीही काळजी आहे तिला खूप, म्हणून आम्ही इथे येऊन तुमच्याशी बोलाव अशी विनंती केली तिने... आणि मानीदेखील आहे सून माझी! आम्हांला, जे काही तुमच्यावर ओढवलय त्यात तुमची साथ द्यावीशी वाटली नाही, तर इथेच सार थांबवायची तयारी होती पोरीची.... काय ग, अनिकेत तुझा सुहृद बनू शकतो, नव्हे आहेच, याची खात्री नव्हती का ग तुला? निदान या म्हातार्‍या सासू सासर्‍यांवर तरी विश्वास??"

"दादा...." जाईचे डोळे पाण्याने भरले होते. अनिकेत जाईकडे बघत फक्त आश्वासक हसला.

मास्तर अन त्यांच्या पत्नींची काही वेगळी अवस्था नव्हती....

"सर, आता जाऊन त्या चालकांना सांगा, काय करतोस ते करुन घे म्हणाव खुशाल!! माझेही सुहृद आहेत म्हणाव ठामपणे माझ्या पाठीमागे उभे!!" दादासाहेबांनी दिक्षीतांना सांगितल.

"वैनी, फक्कडसा चहा करा बुवा आता!!" होकार देत, समाधान भरल्या मनाने, मास्तरांच्या पत्नी चहा करायला अन त्यांच्या गजाननापुढे वात उजळायला आत वळल्या.

दादासाहेब जाईपाशी आले. तिच्यासमोर उभे राहून हसत हसत म्हणाले, "आता तरी सून म्हणू का तुला?? आहे का परवानगी??" अन मग हळूच गुपित सांगितल्यासारख म्हणाले, "अग, लवकर हो म्हण, तुझ्या सुहृदाचा जीव टांगणीला लागलाय ना तिथे!!" वडिलांच्या मायेने दादासाहेबांनी जाईला जवळ घेतले, अन तिच्या डोक्यावर थोपटले.बापाच्या मायेने जवळ घेणार्‍या सासर्‍याच्या कुशीत हसत भरले डोळे पुसताना जाईने पाहिले, तिचा सुहृद तिच्याकडेच पहात होता. तिच्याच नजरेच्या भाषेत तिच्याशी बोलत.......


समाप्त.

December 21, 2007

सुहृद - भाग ५

नेहमीचा घरचा रस्ता आज संपतच नाही, असे मास्तरांना वाटत होते... अतिशय थकल्या मनाने मास्तरांनी घरचा दरवाजा ठोठावला.

"आलातही इतक्यात? झाल का काम? काय म्हणाले ते लोक?"

"अग, हो, हो, आत तरी येऊदेत मला.... " आत येता येता हुsssश्श करत मास्तर जवळच्याच खुर्चीवर टेकले. अचानक मास्तर थकलेले दिसत होते. बघूनच पत्नीच्या लक्षात आले की काहीतरी बिनसले आहे, नक्कीच! त्यांच्या मनालाही हुरहूर लागली... काय घडले असावे? देवा, गजानना, काही त्रासदायक तर नाही घडले? कोणी काही खोडा तर नाही घातला? झाले तरी काय असेल? नाना शंका, कुशंका मनात उभ्या राहू लागल्या...

" अहो... चहा ठेवते बर का, इतक्या लवकर कसे आलात? काय झाल ? झाल का काम? लवकरच झाल मग!! का परत बोलावलय वगैरे?"

"नको, चहा नको, जरा पाणी आण गारस माठातल... आणि हे पहा, तूही ये जरा इथे, बोलायच आहे, किती ते प्रश्न... अन हो, जाई कुठे आहे? घरातच आहे का? "

"नाही, बाहेर गेली आहे इथेच जरा मैत्रिणीकडे, एवढ्यात नाही यायची, अजून दोनेक तास तरी आहेत तिला...."

"बर झाल, ये बैस इथे॥ सांगतो तुला, सांगायचे तर आहेच...." आणि धडधडत्या मनाने शेजारी येऊन बसलेल्या आपल्या पत्नीला मास्तरांनी सार्‍या घटना एकामागून एक सांगितल्या। "सरळ सरळ धमक्या दिल्या आहेत मला त्या माणसाने!! लायकी तर काहीच नाही!! नुसता पैशाचा माज!! काय करायच ग आता....? मन नुसत पोखरून निघाल्याप्रमाणे झाल आहे माझ! जाईचा विचार मनात येऊन वेड लागेल अस वाटत!! काय वाटेल तिला माझ्याबद्दल? या बापाबद्दल काय वाटेल तिला? दादासाहेब तर किंम्मत करतीलच आपली, आणि गावात पण लोकांच्या कुचाळक्यांचा विषय होणार पहा आपण..... " मास्तर दु:खातिशयाने थरथरत होते...

"अहो, अहो, शांत व्हा!! काही तरी मार्ग निघेल हो... अप्पांना विचारायच का??" मास्तरांच्या पत्नी सार ऐकून हबकल्याच होत्या, पण पतीला धीर देण्यासाठी काही बाही बोलत होत्या। जाईची हे सर्व ऐकून काय अवस्था होईल हा विचार मनात येऊन त्यांना अगदी खचल्यासारखे वाटू लागले....

"अहो, हे सगळ जाईला कस सांगायच हो? पोर अगदी जिवाला लावून घेईल हो माझी..."

"अग, नाही, एवढ्यात जाईला नको सांगूस काही!! खचूनच जायची ग ती.... तिचेच जास्त वाईट वाटते, आपणच अस स्वप्न ठेवल ना तिच्या हातात आणि आपणच आता हे अस... कुठे पुण्याई कमी पडली माझी, काही कळत नाही, बघ!! अप्पांशी बोलून पाहतो, काय सल्ला देतात... माझी अक्कल गुंग झाली आहे ख्रर तर!!" मास्तर विमनस्कपणे काही न बोलता बसून राहिले। घरातले सकाळचे हसरे, उत्साही वातावरण आता कुठल्याकुठे निघून गेले होते! खिन्न मनाने मास्तरांच्या पत्नी उठून आत जाता जाता त्यांना दारापाशी काही तरी वाजल्यासारखे वाटले. अरे बापरे!! कोणी ऐकले की काय!! दारापाशी जात त्या पुटपुटल्या, त्यांची काळजी अधिकच वाढली!! कोणी काही ऐकले तर गावात बोभाटा व्हायला कितीसा उशीर!! असे कसे विसरलो आपण दाराला कडी लावायला??!! भरभर बाहेर येऊन त्यांनी बाहेर डोकावल, घराच्या आसपासही जरा पाहिल... कोणीच नव्हतं... वारा सुटला होता. हं!! वार्‍याने हलल असाव दार॥ आपल मन कमकुवत झाल की सगळयाच गोष्टींचा संशय येतो, झाल!! मनाशीच म्हणत त्या दार बंद करून आत वळल्या.

थोड्या वेळाने जाई उत्साहातच घरी परतली आणि तिची बडबड सुरु झाली!! आपल्याच नादात, उत्साहात जाई वावरत होती!! मैत्रिणीकडे जाऊन काय काय धांगडधिंगा घातला याबद्दल अगदी उत्साहाने ती गप्पा मारत होती. मास्तरांच्या पत्नी, मुलीचे बोलणे खोटा उत्साह दाखवून ऐकत होत्या, पण मास्तरांना मात्र त्यात भाग घेववेना। रात्रीच्या जेवणातही मास्तरांचे मन लागेना. भूक नाही, पोटात बरोबर नाही अशी कारणं देत मास्तर ताटावरुन लवकरच उठले. जाईला संशय येऊ नये म्हणून आईने कसेबसे लेकीबरोबर दोन घास पोटात ढकलले.

"आई, काय ग झाल बाबांना एकदम? दुपारपासून तसे मलूलच वाटताहेत नाही? खर तर मघाशीच तुला विचारणार होते ग मी... राहूनच गेल बघ!"

"नाही ग, काही नाही, जर दगदग झाली त्यांना आज, एवढच... बर वाटेल हं उद्यापर्यंत! जा आता झोपायला॥"

"अग आई, हे काय??" जाईच्या आवाजात आश्चर्य होते! "अग, आज तू चक्क देव्हार्‍यात दिवा लावायला विसरलीस की!! अस कस काय??"

"अगsss बाई!! खर की काय?? कठीणच आहे ग बाई!! अग कामापुढे अन आता या गडबडी पुढे ना, मला लक्षातच नाही राहिलं बघ!" डोळ्यांतल पाणी थोपवत अन जाईपुढे हसण्याचा खोटा आव आणत जाईच्या आईने गणपतीपुढे वात उजळली। "माफ कर रे गजानना, बाबा!! पण चित्तच थार्‍यावर नाही रे माझ...." मनातल्या मनात गजाननाला आळवत त्यांनी देवापुढे हात जोडले अन मस्तक टेकल, "आता तूच रे बाबा त्राता!! आम्हांला जनांत लाज येईल अस काही होऊ देऊ नकोस रे...."

जाई झोपली याची खात्री करून अन बाकीची स्वयंपाकघरातली झाक पाक करून जेह्वा त्या निजण्यासाठी आल्या, तेह्वा मास्तर टक्क जागे आहेत हे त्यांच्या लक्षात आलं.

"अहोsss..." हलकेच त्यांनी हाक मारली. "झोपा आता, प्रयत्न तरी करा... उद्या अप्पांशी बोलून घ्या..."

एकमेकांना धीर देण्याचा प्रयत्न करत दोघेही पती पत्नी कूस बदलत रात्रभर जागेच होते.

"ऐकलस का?" मधेच मास्तर म्हणाले.

"काय झाल? काय म्हणता आहात?"

"उद्या अप्पांकडे जातो, अन बोलून घेतो। खर तर ते तरी काय म्हणणार?? उगाच आपल्यामुळे ते मात्र संकटात आता!!त्यांचे आपापसातले संबंध दुरावले तर आपल्यामुळे.... " मास्तरांच्या मनात अनेक विचार थैमान घालत होते! "... पण जाईला तू घरातच थांबव, नाहीतर, काही तरी कामाने कुठेतरी पाठव तरी.... माझ्याबरोबर तिथे नको! सुनिताकडे येते म्हणून हट्ट धरून बसायची नाही तर!!"

सकाळी लवकरच ऊठून, सारी आन्हिकं आटोपून अन तयार होऊन मास्तर घराबाहेर पडले। अप्पांना पतपेढीत घडलेल सगळ सविस्तर सांगायच अस मनाशीच ठरवत त्यांनी अप्पांच्या घरचा दरवाजा ठोठावला. अप्पा नक्कीच काही तरी मार्ग दाखवतील, अशी आशाही त्यांना वाटत होती. अप्पांनी कदाचित दादासाहेबांना सार काही सांगितलही असेल, कोण जाणे!! तस असेल तर बरच होईल......

सुनिताने दरवाजा उघडला. "सर तुम्ही!! या, या ना, बसा. जाई आलीये का?" सुनिताने बाहेर डोकावत विचारल.

"नाही ग बाळा, मी एकटाच आलो आहे, जरा कामाच बोलायच होत अप्पांशी... काय करताहेत ते? बोलवतेस जरा?"

"सर, अप्पा ना, कालच रात्री जरा आत्याकडे गावी गेलेत... दोन तीन दिवसांत येतील परत। आत्याला काल ते फोन करायला गेले तेह्वा समजल की आत्याच्या सासूबाईना अगदी बर नाही, म्हणून बघायला गेलेत. काही अर्जंट आहे का काम तुमच? फोन देउ तुम्हांला आत्याचा? फोन करा न अप्पांना..."

"नाही ग, अस इतक काही अर्जंट नाही...." अश्या परिस्थितीत अप्पांना कुठल्या तोंडाने फोन करून मी माझे रडगाणे गाऊ?? मास्तरांनी स्वत:शीच विचार केला, अन खिन्न मनाने अप्पांच्या घरून परत यायला निघाले.....

अपूर्ण......

सुहृद - भाग ४

दिक्षीत मास्तरांच्या घरात उत्साहाच वातावरण होत. इतक्या अनपेक्षितरीत्या जाईच लग्न ठरल होत, घरही चांगल मिळाल होत. जाई सुखावली होती हे बघून मास्तर आणि त्यांची पत्नी दोघांनांही समाधान वाटत होत. लग्नाची किती तरी तयारी करायची बाकी होती. मास्तर आपल्या पत्नीशी विचार विनिमय करत होते...

"झेपेल ना ग आपल्याला? आता जरी दादासाहेब काही नको म्हणाले तरी थोड फार तरी करूच आपण... आपल्याला तरी दुसर कोण आहे? आपली जी काही थोडी फार पुंजी आहे ती उपयोगाला येईल आता, थोड मी शाळेच्या संस्थेच्या पतपेढीमधून कर्ज काढतो... इतकी वर्ष मन लावून विद्या दान केलय, काही तरी केल्या कष्टांचा मान ठेवतीलच ना... "

"अहो, पतपेढीकडून कर्ज घेणार तुम्ही...? दुसरा काही मार्ग नाही का सापडणार? तुमच्या त्या संस्थेच्या पतपेढीचे व्यवहार.... "

"मान्य ग, पण आता काय करायच, सांग... सध्ध्या आपल्याला गरज आहे ना, आणि मी त्याच संस्थेत कामाला आहे, मग माझ काम तस तुलनेन सोपच आहे, नाही का? मी बघून तर येतो, तू चहा दे, मग मी जरा जाऊन येतो संस्थेत, पाहतो कस काय होतय ते... गरज पडली तर संस्थाचालकांना भेटायला हव... "

मास्तर बाहेर पडले तस, मास्तरांच्या पत्नीने, न राहवून गजाननाला हात जोडले. "सगळ काही ठीक कर रे देवा..." त्या मनातल्या मनात पुटपुटल्या।

संस्थेच्या आवारात शिरता शिरता मास्तरांना संस्थाचालकांनी बघितले अन त्यांना थोडे आश्चर्यच वाटले!! दिक्षीत सर? इथे?? काय काम काढल असेल?? माहित करून घ्यायलाच हव, म्हणत चालक जिना उतरायला लागले....

"नमस्काsssर, नमस्काsssर मास्तर, याsss!! हितं कुणीकड वाट चुकली म्हणायची आज?? आव, म्हटलच हाय नाय का, साधू संत येती घराsssss, तोची दिवाळी, आन तोची दसराsssss!!" आपल्याच वक्तव्यावर खूष होत, चालक मोठयाने हसले! त्या हास्यातून सत्तेचा, पैशाचा माज जाणवत होता। "चला, हापिसात बसूयात आपल्या॥ अरे गणा, मास्तर आल्यातीsss काय चा वगैरेच बघ की जरा ल्येका!" शिपायाला त्यांनी चहासाठी पाठवल.... "बोला मास्तर, काय कामाने आलात म्हणायच हित?? कायतरी मोठ दिसतया, नायतर तुम्ही आजपावतर काय हित आल्याले मला तरी काय आठवना बघा...." इथल तिथल बोलत, मास्तरांच्या येण्यामागच प्रयोजन काढून घ्यायचा चालक प्रयत्न करत होते... "बोला मास्तर, तुम्ही आपलेच हाय की.. काय आडचण आसल तर सांगा की तस..... "

"नाही, म्हणजे, घरात जरा कार्य निघालय...."

"म्हंजे??? " चालक जरा कोड्यात पडले... "अन कसल कार्य म्हणायच आता ह्ये?? आरे होsssss आलं, आलं!! समद ध्येनात आल बघा!! जाईच लगीन ठरिवताय का?? आरे वा, वा, वा.... पन म्या काय म्हणीत व्हतो, बर का मास्तर, हितन तुमास्नी आस कितीस कर्ज भ्येटणार? आँ? त्यापरीस माझ्याकडे येक प्ल्यान हाय तो ऐका! अन त्ये जाईच्या लग्नाला आपल्या संस्थेचा हॉल वापरायचा बर का, आगदी संकोच म्हून करायचा न्हायी!! आन त्येच भाडं घेणार नाही आम्ही!! आमची बी ल्येकच की ती..." गोड गोड शब्द वापरून चालक आपले योजना मास्तरांच्या गळी उतरवू पाहत होते... " तर आस बघा मास्तर, आपल्याकडे सरकारी पावण येणार हायती, ह्येच हो, आपल शाळा बघत्याल, पोरांची प्रगती बघत्याल... आन सध्ध्या त्येंच्या काय योजना बी हाये म्हणत्यात. त्यातून आपल्या शाळेला काय अनुदान वगैरे पदरात पाडता येत का ते बघतो बघा मी... तुम्ही बघताच आता, किती खर्चिक काम आसतय शाळा चालवण..."

"मग यात मी काय करावे अशी अपेक्षा आहे आपली??" मास्तरांना संशय आणि मनातून संताप येत चालला होता... केवळ आपण इथे आलो आहोत म्हणून हा माणूस आपल्याला अशी वागणूक देऊ धजावतोय!!

"अजाबात काय बी करायच न्हाय तुमी उलट!! म्हणजी आस बघा, त्येंना माहित हायसा तुमी, राजा हरिश्चंद्राचे अवतार!! पण आमास्नी तस र्‍हाऊन नाय चालायच!! आणि आमी सगळ बिन बोभाटा काम करवून घेऊ!! अनुदान पण वाढवून मिळेल, पण आम्ही दिलेल्या अहवाला बाबत त्यानी तुम्हाला विचारल तर तुम्ही आमची री ओढा! त्यावर अनुदान अवलंबून हाय... तुम्हाला जाईच्या लग्नाला काय जी मदत लागल, ती द्यायची हमी आमची. ह्ये अनुदान मोठ हाय आन आम्हाला त्ये हव बी हाय!!"

"काय बोलताय तुम्ही हे?? मला खोट बोलायला सांगताय तुम्ही?? शाळा नावालाच आहे तशी, मुल येतात, शिकतात एवढच!! कित्येक योजनांसाठी अर्ज करून, शाळेच्या नावाखाली अनुदानं, फायदे पदरात पाडून घेतले जातात, मुलांना कसलाच फायदा होत नाही... आणि आता मला ही या पापात ओढू पाहता आहात??" मास्तर संतापाने थरथरत होते!! "केवळ मी कर्ज घ्यायला आलो, म्हणजे मी विकाऊ आहे अस वाटल की काय तुम्हाला??"

"आवं मास्तर, चिडायच कशाला? चिडू नका!! घ्या, पाणी घ्याsss बसा!" चालक मनातून संतापले होते! आवाजात हळू हळू संताप, गुर्मीची झाक येत होती, " येक ध्येनात राहू दे म्हणजे झाल, आजून जाईच लगीन झाल्याल न्हाय, त्ये मोडूही शकत, आन हो!! बरी आठवण झाली... काय हो मास्तर, तुम्ही सांगितलच असणार म्हणा मुलाकडच्या मंडळीना..... आता तुम्ही कधी खोट बोलत नाय, काय लपवा लपवी करत नाय म्हटल्यावर... ते तुमच्या बंधू राजांच्या करतुती सांगितल्या हायती का पावण्यांस्नी?? तुमच्या सारख्यास्नी कुटुंबातल एक माणूस खराब , आन ते बाह्येर कळल की आख्ख कुटुंबच पार कामातून जातय की!! या आता, विचार करून सांग काय ते, तशी काय घाई न्हाय आपल्याला..." छद्मीपणे हसत हसत चालक ऑफिसातून बाहेर पडले!

मास्तर सुन्न होऊन तिथेच काही वेळ बसून राहिले!! काय कराव? इथे नकोच, बँकेतून कर्ज घ्याव का?? तिथेही हाच माणूस संचालक पदावर!! जिथे तिथे खोडे घातल्याशिवाय राहणार नाही!! अन, धमकीही दिलीय वरून तुमच्या भावाबद्दल सांगेन म्हणून!! काय होईल जर सांगेल तर? दादासाहेबांना काय वाटेल? जाई इतका जीव लावून बसलीय अनिकेतवर.. काही बोलायची नाही आपल्याला पण दु:खाने झुरून मरून जाईल पोरगी.... आपण आपल्या भावाबद्दल सांगितल नाही , हे चुकल का आपल?? सांगायला हव होत का?? दादासाहेबांची अन घरच्यांचे काय प्रतिक्रिया होईल अस काही कळल तर?? पण आता त्याला किती वर्ष लोटली, अन जाईचा काय दोष? काय संबंध? माझ्या भावाच्या चुकांची शिक्षा माझी लेक भोगणार आता?? काय कराव? कोणाचा सल्ला घ्यावा?? " विचार करकरून मास्तरांच डोक फुटायची वेळ आली....

" का वो मास्तर, बर वाटत नाय का??" आत आलेला गणा विचारत होता....
" नाही रे बाबा, ठीक आहे... निघतो मी..." अतिशय जड पावलांनी मास्तरांनी घरची वाट धरली। घरी जाऊन आता हे सारे पत्नीला सांगायचे होते. सारेच कठीण होऊन बसले होते......


अपूर्ण.........

December 20, 2007

सुहृद - भाग ३

बागेत जाता जाता जाई हळूच सुनिताकडे पाहून पुटपुटली, "तू जाऊ नकोस हं कुठे, आमच्या बरोबरच थांब... "

सुनिताने जाईकडे बघत डोळे मोठ्ठे केले!! तिला जाम हसू यायला लागल होतं, कसबस गंभीर राहण्याचा प्रयत्न करत ती जाईला हळू आवाजात म्हणाली, "चक्रमच आहेस!! मी काय करू तिथे?? कबाबमें हड्डी! अनिकेत काय खातोय का तुला??"

"अग पण... अस काय ग... थांब ना... "

"गप ग...!! अनिकेत मारेल मला!! वेडी आहेस का तू?? मी आहे पलीकडेच..... तू बोलून घे, काय? कळल नं?"

घराच्या मागच्या बाजूला बसण्यासाठी सिमेंटचे छोटे बाक होते, तिथे मंडळी जाऊन बसली. थोड्याश्या इथल्या तिथल्या गप्पानंतर पाचेक मिनिटांत सुनिता काहीतरी कारण काढून तिथून उठली. सुनिता गेल्यावर अचानक वातावरणात थोडस अवघडलेपण भरुन आल.... दोन एक मिनिटं अशीच शांततेत गेली.... अचानक, एक क्षणी अनिकेत अन जाईची नजर एकमेकांना मिळाली, अन दोघांच्याही चेहर्‍यावर हसू उमलल...

"टेंशन आलय का??" अनिकेत जाईला विचारत होता. "खर सांगायच तर, थोडस मलाही आल होतच.... " अनिकेत हसर्‍या चेहर्‍याने सांगत होता.

जाईने त्याच्याकडे क्षण, दोन क्षण पाहिल. तीच फोटोतल्यासारखीच आर्जवी, हसरी नजर.... शांत, समजूतदार आवाज, बोलण्याची पद्धत... जाईला आत कुठेतरी अनिकेतबद्दल खूप विश्वास वाटला.
"जाई, तुला मान्य आहे ना हे लग्न? नाही, म्हणजे आई दादांना तू आवडली आहेस. दादांना तर एकदमच!! लेक घरी आणायची घाई झालीये त्यांना. ते तर पसंती सांगूनही मोकळे झालेत!! खर तर, अप्पांनी आम्हांला सुचवल तुझ स्थळ, आणि त्या सर्वांकडून तुझ्या विषयी अन तुझ्या कुटुंबाबद्दल चांगलच ऐकलय आम्ही. जे काही ऐकलय ते आवडलय. तुझा फोटोही दाखवला होता सुनिताने...." जाई जिवाचा कान करून ऐकत होती.... "आज तुला प्रत्यक्ष बघतोय. मलाही आवडली आहेस तू, पण तुझ्याही काही स्वतःच्या अपेक्षा, कल्पना असतीलच ना?? त्यात बसतोय का मी? माझे आई वडिल? काही घाई नाही जाई, तू विचार कर थोडा.... आणि ठरव, मगच कळव मला. हव तर सुनिताकडे निरोप दे... दादांनी खर तर एकदम अशी घाई नको होती करायला..."

"नाही, तस नाही.... " एकदम जाईच्या तोंडून शब्द निघून गेले!!

"म्हणजे...??" मिश्किल हसत, जाईकडे बघत अनिकेत विचारत होता. जाई त्या नजरेने मोहरली!! "नवरा मुलगा पसंत आहे तर तुला??" जाईने हसत, थोडस लाजत होकारार्थी मान हलवली. अनिकेत तिच्याकडे बघतच राहिला!! किती निर्व्याज, मुग्ध दिसते ही!! "सुटलो बुवा एकदाचा!! तू नकार दिलास तर काय करू असा प्रश्न पडला होता मला तुला पाहिल्यापासून!!"

हसर्‍या, आश्चर्यचकीत चेहर्‍याने जाईने अनिकेतकडे पाहिले अन मनाला मनाची खूण पटली. जाई आता पहिल्यापेक्षा खूप सावरली होती.

"अनिकेत, एक सांगू का पण?"

"बोल ना.... काय झाल? काही अडचण आहे का??"

"नाही, तस नाही, पण थोड बोलू का?? मी आता एकुलती एक मुलगी आहे माझ्या आई बाबांची. लग्न झाल, दुसर्‍या घरात गेले तरी मला त्यांची जबाबदारी घ्यायची आहे. तुझ्या आई वडिलांना जस मी आपल करेन, तसच माझ्या नवर्‍यानेही माझ्या आई बाबांना आपलस केलेल मला आवडेल.... संसारात मला माझ्या नवर्‍याची सुहृद बनायला आवडेल आणि माझा नवराही माझा सुहृद असावा एवढीच अपेक्षा आहे माझी...."

अनिकेत आश्वासक हसला. "याबाबतीत तुला कधी तक्रारीची वेळ नाही येणार जाई... विश्वास ठेव माझ्यावर..."

"म्हटल, आम्हीं यावं का??" सुनिता येता येता हसत हसत विचारत होती!! " मी आपल म्हटल, की जाई येईल पाचच मिनिटांत सांगतsss, चल, जाऊया म्हणून!! काय ग जाई?? बघते तर तुम्ही आपले इथे गप्पा मारताय!! काय रे बोलत होता एवढ??" उत्तर म्हणून सुनिताला जाईने एक चिमटा काढला!! "आई गsss... हं!! चला आता!! वाट पहात असतील सगळे... पण काय रे अनिकेत..." सुनिताचा दोघांना चिडवण्याचा मूड अजून संपला नव्हता!! " बाग पाहिली का तू इथली?? अन ही वेल पाहिलीस का?? कशी छान बहरलीये ना? कसली आहे माहिती आहे काsss, जाईची!! जाई बघ किती फुललीय, आवडली का??" सुनिता मिश्किलपणे अनिकेतला विचारत होती.

सुनिताची बडबड ऐकून जाईने उगाच खोट्या रागाने तिच्याकडे पाहिल, मनातल्या मनात, अनिकेत काय उत्तर देतो, याची उत्सुकता तिलाही होतीच!!

"हो। खूप आवडली." अनिकेत जाईकडे बघत हसत उत्तरला. सुखाचा वर्षाव अंगावर झेलत फुललेल्या, आनंदी चेहर्‍याने जाई तिथून मागील दारातून घरात पळाली!!

बैठकीच्या खोलीत मास्तरांचा प्रश्न ऐकून दादासाहेब प्रथमच जरा गंभीर झाले होते... "दिक्षीतसाहेब, मला एकच मुलगा. तुमचीही एकच मुलगी. मला फक्त दोन चांगली घर जोडली जाण्यामधे स्वारस्य आहे. चांगली माणस जोडायची आहेत मला. आमच्या काहीच अपेक्षा नाहीत देण्या घेण्या बाबतीत, अगदी मनापासून सांगतोय. आपण एकत्रच लग्नाची सारी व्यवस्था पाहू. अहो, आमचाही एकच मुलगा, आम्ही ही जरा भाग घेऊ हौसमौज करण्यात!! कस?? आणि पत्रिकेच म्हणाल ना, तर माझा काही विश्वास नाही यावर. पत्रिका पाहण्यापेक्षा मी माणस पाहण्याला जास्त महत्व देतो!! पटतय का पहा... आता जर मुलांनी एकमेकांना पसंत केल असेल तर..."

एवढयात सुनिता अन अनिकेत पुढच्या दाराने आत शिरले. दोघांच्या चेहर्‍यांवरचा आनंद पाहून बैठकीतही सार्‍यांच्या चेहर्‍यावर हसू उमटल. मुलांचाही होकार सार्‍यांना कळला होता.

अप्पा म्हणाले, "वैनी, तोंड गोड करा आता! गजाननापुढे वात उजळा.... "

मास्तरांच्या पत्नी स्वयंपाकघरात देवापुढे निरंजन उजळण्यासाठी अन काहीतरी गोड आणण्यासाठी गेल्या. आत जाई हसर्‍या चेहर्‍याने उभी होती. लेक खूप खुषीत, समाधानात आहे, पाहून आईच मनही सुखावल, अन लेकीला त्यांनी मायेने जवळ घेतल....

अपूर्ण.....

December 19, 2007

सुहृद - भाग २

ठीक साडेचार वाजता, अप्पा आणि सुनिता दिक्षितांकडे आले. अनिकेत आणि त्याचे आई वडिल येणार, तेह्वा, दोन्ही कुटुंबाना ओळखणारे म्हणून अप्पांनी आपल्या घरी त्यावेळी हजर रहाव, अशी दिक्षितांनी विनंती केली होती, त्याप्रमाणे अप्पा आले होते. काही हाताखाली मदत लागली तर, म्हणून सुनिताही आली होती.

"येऊ का सर?? वैनी?? झाली का तयारी सगळी?? सुनिता बेटा, तू जा जाई काय करतेय बघ बर... " अप्पांनी सुनिताला जाईकडे पिटाळल.... "सर, वैनी, कसलीही काळजी नको!! सगळ छान होणार बघा... "

"तस झाल ना भावोजी, तर तुम्ही काय म्हणाल ते गोडधोड करुन घालेन हो मी तुम्हांला... गजाननच बोलूदे तुमच्या तोंडून!!"

"अप्पा, या, या, बसा, पहा सगळ आहे ना व्यवस्थित? ठीकठाक वाटतय ना??"

"छान आहे हो सर, उगाच काऴजी का करता? सगळ उत्तम आहे, अन मुख्य म्हणजे आपली जाई म्हणजे शंभर नंबरी सोन आहे!! पसंत पडणारच! मी सांगतो ना..."

अश्या गप्पा सुरु असतानाच अचानक मिश्किल हसर्‍या स्वरात एक प्रश्न आला, "नमस्कार, याव का आम्ही??" सगळ्यांनीच आवाजाच्या दिशेने पाहिल. अनिकेत अन त्याचे आई वडिल दरवाज्यात उभे होते, आणि अनिकेतच्या वडिलांनीच प्रश्न केला होता. तिघांना पाहताना, त्यांच्या चेहर्‍यांवरचे हसरे, शांत, मैत्रीपूर्ण भाव निरखता निरखता, दिक्षित मास्तरांना आणि त्यांच्या पत्नीला हायस वाटल।

"अरे, या, या, याsss दादासाहेब, या वैनी... कसा आहेस रे अनिकेत?" अप्पा स्वागताला उठून उभे राहत म्हणाले, पाठोपाठ दिक्षितांनीही सर्वांच स्वागत केल. सारे आपापल्या जागेवर स्थिरस्थावर झाल्यावर, अप्पांनी सर्वांची एकमेकांशी रीतसर ओळख करून दिली. अनिकेतचे आई वडिल, अप्पांनी म्हटल्याप्रमाणे, बोलायला अन वागायला मोकळे ढाकळे होते, मुलाकडची बाजू वगैरे असला कसल्याही प्रकारचा अभिनिवेश त्यांच्या बोलण्या वागण्यात नव्हता. दादासाहेब तर विलक्षण बोलघेवडे होते, आणि त्यांनी लगेच गप्पांची बैठकही जमवून टाकली होती!! अनिकेतचही वागण, बोलण मास्तरांना आणि त्यांच्या पत्नीला आवडल होत. पंधरा एक मिनिटं गप्पांमधे गेल्यावर दादासाहेब एकदम आठवल्यासारखे म्हणाले, "अरे हो, पण आधी उत्सव मूर्तीला बोलवा आजच्या! आमच काय, आम्ही आपल सावकाश बघू होsss गप्पा, चहा झाला की निवांत!! आता आमच्या सुनिताची मैत्रीण म्हणजे छानच असणार!! पण आमच्या हिला धीर निघत नसेल जाईला बघायचा!! काय रे अनिकेत? खर की नाही??"

"अहो, काय उगीच जिथे, तिथे थट्टा तुमची!!" अनिकेतची आई हसत उद्गारली. अनिकेतच्या चेहर्‍यावरही हसू उमटल होत. वातावरण सैल झाल, आणि अप्पांनी सुनिताला हाक मारुन जाईला घेऊन यायला सांगितल. सुनिता आणि जाई चहा आणि खाण्याच घेऊन आल्या।

"कशी आहेस ग सुनिता?" दादासाहेबांनी लगेच सुनिताकडे मोहरा वळवला, "आणि ही जाई ना?? ये बेटा, बैस इथे. अग, लिस्ट काढ ग ती प्रश्नांची, परीक्षेला सुरुवात करूयात!! काय ग जाई, करु का सुरुवात?" सगळ्यांच्याच चेहर्‍यांवर एक मिश्किल हसू होत।

"अं...??" आधीच जराशी घाबरलेली जाई अजूनच बावचळली आणि तश्याच गोंधळलेल्या चेहर्‍याने तिने आळीपाळीने दादासाहेबांकडे आणि आपल्या आई वडिलांकडे पाहिल! तिचा गोंधळ बघून, सगळेच हसायला लागले, तस काही सेकंदांनी तिच्या डोक्यात प्रकाश पडला आणि एक प्रसन्न हसू तिच्या चेहर्‍यावर उमटल! प्रसन्नपणे हसणारे अनिकेतचे आई वडिल बघता बघता, त्यांच्या डोळ्यामधली, चेहर्‍यावरची आपुलकी पाहता पाहता ती निर्धास्त झाली. आपल्या आई बाबांसारखेच दिसताहेत की... तिच्याही मनात एक आपुलकीची भावना रुजू झाली, अन अनिकेत? हसता हसता झालेली निमिषार्धातली नजर भेट एकमेकांना खूप काही सांगून गेली होती.... जाईच मन सुखावल होत... सुनिताने खरच सांगितल होत तर....

"सर, आम्हांला तुमची लेक एकदम पसंत बघा!! काय ग, तुला आहे ना पसंत?? का नको म्हणतेस?? का रे अनिकेत? आवडेल का आईला??"

"अहो, काय हे परत!! कशाला छळता त्याला?" अनिकेतची आई हसतच म्हणाली... "पसंत आहे हो मला!"

"चला, एक काम झाल!!" दादासाहेब म्हणाले, "आता आपण बसू गप्पा मारत, सुनिता ताई, आता तुम्ही एक काम करा, अनिकेतला जरा सरांची बाग दाखवा, अन जाईला माहीत असेल बागेची, तेह्वा तिलाही घ्या बरोबर, कस??"

सुनिता या संधीची वाटच पाहत होती, लग्गेच तिने दोघांना घेऊन बाग गाठली।

आत बैठकीमधे सरांनी दादासाहेबांना विचारल, "दादासाहेब, मुलगी पसंत आहे म्हणालात, आनंद वाटला, पण आपण पत्रिका वगैरे मागितली नाही, तसच आपल्या काय अपे़क्षा आहेत, याचा जरा अंदाज आला असता तर..... "


अपूर्ण
....

December 17, 2007

मैत्रिणीची व्यथा

आज एका मैत्रिणीचा फोन आलेला. बर्‍याच दिवसांनी. ती पण बिझी आहे सध्ध्या, अन मी पण! निदान, मी खूप बिझी आहे, अस मी सांगते तरी!! म्हणजे हल्लीच ठरवल की अस सांगायच.

I hardly get time for my own things, you knowऽऽऽऽ ! कप्पाळ!!

पण काय करणार?? आयटीसारख्या क्षेत्रात आहे अन बिझी नाही म्हटल , म्हणजे समोरची व्यक्ती, अगदी काय ध्यान आहे अश्या नजरेने बघते असा काहीसा अनुभव! त्यापेक्षा खूपच बिझी आहे अस म्हटल, की समोरच्या व्यक्तीला जरा पटत असाव, की असेल बुवा आयटीमधली! माझ्या शेजारणीला पण मी बिझी असण्याच कौतुक! नसले तरी!! आम्ही कधी गप्पा मारत उभ्या असलो, अन तिच्या बहिणाबाई तिला भेटायला म्हणून आल्या तर त्यांना ती लग्गेच सांगणार, अग आजच दिसतेय ही तुला, नाहीतर इतकी बिझी असते!! आता असे बरेच 'आज' बहिणाबाईंनी माझ दर्शन घेतलय म्हणून ठीकेय!! असो। तर गाडी मूळ मुद्द्याकडे आणूया.

तर, मैत्रिणीचा फोन आलेला, अन खूपच उदास अन डिप्रेस्ड वाटली... काय झाल विचारल्यावर, म्हणाली, ऑफ़िसमधे पॉलिटिक्सचा त्रास होतो आहे... मजा म्हणजे त्रास देणार्‍या पण स्त्री सहकारीच!! इतका वैताग आला हे ऐकून! मैत्रिण सरळ, साधी आहे माझी, खरच। आत बाहेर अस काही नाही, छक्के पंजे फ़ारसे पटकन लक्षात येत नाहीत, येई पर्यंत वेळ निघून गेलेली असते. कामात चोख, म्हणून पाट्या टाकणार्‍यांच्या मते शिष्टच आहे!! हे कोड काय आजता गायत उलगडलेल नाही बुवा मला!! कामात चोख असण हे शिष्टपणाच लक्षण आहे?? नेहमीच टिपिकल गॉसिपिंग नाही, तसल्या गोष्टीत फ़ारसा इंटरेस्ट नसतोच तिला कधी, आणि मुख्य म्हणजे कोणाच्याही पुढे पुढे करायला जमत नाही तिला.

आणि म्हणाली, इथेच घोड पेंड खातय सध्ध्या!! त्रास देणार्‍या स्त्री सहकार्‍यांपैकी एक जण जरा सिनियर कामामधे, अन दुसर्‍या दोघी तिच्या पिट्टू!! पण सध्ध्या सिनिअर बाईंना हिच्यामुळे जरा स्पर्धा!! अर्थात अस काही हिच्या मनातही नव्हत। आणि मैत्रिणीचा स्वभाव माहित असल्याने, मी याबाबतीत १००% खात्री देऊ शकते! ते सगळ तिथूनच आलय. त्यामुळे सध्ध्या जोरदार आघाडी विरुद्ध एकटी उभी आहे!! बर, तक्रार तरी काय करणार? अस काहीच नाही की जे ती प्रूव्ह करू शकेल... पण त्यांच्या वागण्याच्या पद्धतीचा नाही म्हटल तरी त्रास हा तिला होतोच!! आणि पुन्हा त्यांच्याइतक्या क्षुल्लक पातळीवर ती उतरूही नाही शकणार.....

मी तरी तिला ह्या असल्या लोकांकडे दुर्लक्ष करायचा सल्ला दिलाय, पण डोळे उघडे ठेवून। जिथे जमेल अन गरज असेल तर, तडाखा दिल्याशिवाय रहायच नाही. स्वत: तर कोणाच्या वाटेला विनाकारण जात नाही ना? मग? इतर कोणी आपल्या वाटेला जाणार असेल, तर कधी कधी अरेला कारे म्हणण प्राप्त आहेच. मैत्रिणीच काम चोख आहे, हीच तिची सगळ्यात मोठी जमेची बाजू. अंगी गुण असतील तर व्यक्ती चमकल्याशिवाय राहणार नाहीच. हळूहळू मैत्रिणीची दखल ऑफ़िसात घेतली जातेय अन नेमक हेच खटकतय वाटत या दोघी तिघींना. का?? ते नाही ठाऊक.

कधीतरी मैत्रिणीला 'खटासी व्हावे खट, नटखटासी नटखट' हे धोरण स्वीकारावच लागेल मात्र. मी हे सांगितलय तिला. पाहू, म्हणाली.

तुम्हाला काय वाटत यावर??

December 16, 2007

सुहृद - भाग १

दीक्षित मास्तरांच्या घरी जरा लगबग सुरु होती. आज त्यांच्या लेकीला, जाईला, बघायला येणार होते. घरात सर्वात जास्त अस्वस्थ मास्तरच होते! खर तर, त्यांच्याच शेजारी रहात असलेल्या कुलकर्ण्यांनी हे स्थळ आणल होत, म्हणजे तस माहितीच असणार होत…

कुलकर्णी स्थळाची माहिती देताना म्हणालेही होते, "काळजी करू नका सर, अगदी चांगली माणंस आहेत ही. मला ठाऊक आहे, तुम्हांला जाईची काळजी वाटते, तुमच्या काळजाचा तुकडा आहे जाई, पण माझी खात्री असल्याशिवाय मी तुम्हांला अस तस घर दाखवणार नाही. अहो, माझ्या चांगल्या परिचयाची माणस आहेत…"

"नाही हो अप्पा, तुमच्या हेतूविषयी काहीच शंका नाहीत माझ्या मनात, पण तरीही मनात आपले नाही नाही ते विचार येतात हो… आणि पुन्हा, मी काही खूप काही डबोल बाळगून असलेला माणूस नाही. साधासुधा शिक्षक या गावातला. शिक्षणाचा बाजार करण आणि माया जमा करण, मला काही शक्य झाल नाही, यापुढे होणार नाही, त्यामुळे व्यवहारात माझ्यासारख्या माणसाची किंम्मत तशी शून्यच! मी आपला या गावातच राहिलो, शाळेत, विद्यार्थ्यांत रमलो. मनापासून शिकवल, पण या सार्‍याला व्यवहारात किंम्मत नाही हो.... आजच्या जगात तरी नाही! अन आताशा मला हे फार टोचत, खर सांगायच तर, तत्वांवर चालणारा माणूस मी, पण अस वाटत हल्ली कधी कधी की या तत्वांपायी मी आमच्या हिच्यावर अन जाईवर अन्याय करतो की काय... आता ह्या बघायला येणार्‍या मंडळींच्या काय अपेक्षा असतील, काय माहीत? उगाच न झेपणार काही असल तर? हुंडा वगैरे माझ्या तत्वांत बसणार नाही, रीतीप्रमाणे, खुशीने जमत तेवढ करणारच मी सगळ, पण त्यांच्याही मनाला आल पाहिजे... अश्या बाबी वरून बैठक मोडली तर, तुम्हालाही वाईट वाटायच.... "

"पैजेवर सांगतो सर मी तुम्हांला, अस काहीही होणार नाही बघा. अहो, ती माणसही तुमच्याच सारखा विचार करणारीच आहेत, पहालच तुम्ही....." आज परत एकदा, मास्तरांना हे बोलण आठवून गेल. अप्पांनी दिलेला भरवसा होता, पण स्वत: भेटल्याशिवाय, बोलल्याशिवाय काही खर नाही... मास्तर मनाशीच म्हणत होते.

मास्तरांच्या पत्नीची फारशी वेगळी अवस्था नव्हती. त्यांनाही चिंता लागलीच होती, जरा धाकधूकच होती. मनातल्या मनात, गजाननाला आळवून झाल होत... "देवा गजानना, सगळ काही व्यवस्थित पार पाड रे बाबा! तुला एकवीस संकष्ट्या मोदकांचा नैवेद्य दाखवीन बाबा... एवढस गाव रे, त्यात असली बातमी लपूनही राहणार नाही, आणि हे जमल नाही तर, लोकांना लगेच चघळायला विषय!! नकोरे गजानना, असल काही..." किती वेळ त्या गजाननाला आळवत होत्या....

अन जाई? जराशी गोंधळलेली, जराशी वैतागलेली... उगाच जरा धडधडत पण होत! शेजारच्या अप्पांची सुनिता येऊन चिडवून गेलीच होती!! एकदम छान जोडा शोभेल म्हणे!! एवढ काही कौतुक नकोय करायला त्याच!! जाईने उगाच नाक उडवल!!

तिला आठवल, सुनिताने फ़ोटो आणला होता दाखवायला....

जाईने आपल खूप लक्ष न देऊन पाहिल्यासारख दाखवल खर सुनिताला, पण सुनिताही जाईला लहानपणापासून ओळखत होतीच!! "इथेच ठेवून जाऊ का ग फोटो?" मिश्किलपणे हसत हसत सुनिता विचारत होती, "नाही म्हणजे कस, की मी इथून गेले ना, की कस अगदी नीट बघता येईल हो फोटो!! काय??"

"सुनिटलेऽऽऽऽ!!" सुनिताच्या पाठीत एक धपाटा बसला!! तरीही सुनिताच हसणं काही आवरेना! मग दोघी मैत्रिणी हसत सुटल्या!!

थोड्या वेळाने सुनिताच जरा गंभीर होत म्हणाली, "जाई, अनिकेत खूप चांगला मुलगा आहे, समजूतदार आहे, आवडेल तुला ग.... माझ्या चांगल्या ओळखीचा आहे. त्यांच कुटुंबच चांगल माहितीतल आहे आमच्या. अप्पांची इथे बदली होऊन यायच्या आधी आम्ही दुसर्‍या गावी होतो तेह्वा ते शेजारीच होते आमचे, एकत्रच वाढलोय ग आम्ही, अगदी बहिण भावासारख. अगदी तुला जस आवडेल तसच घर आहे ग त्यांच.. काका आणि काकी खूप प्रेमळ आहेत बघ. तू नाही म्हणू नकोस ग..."

"अग पण..."

"पण काय आता? जाई, माणस चांगली आहेत, संस्कारांना मानणारी आहेत, स्वाभिमानी, सचोटीने वागणारी आहेत. अनिकेतलाही चांगली नोकरी आहे, एकमेकांना जपून, धरून राहणारी माणस आहेत ग... तुझ्या सारख्या मुलीला जस मिळायला हव, तस घर आहे ग अगदी...... असच होत नं मनात तुझ्या?"

"हो, अग पण , त्या मुलालाही आवडायला हवी ना मी?? मी अशी साधी..."

परत एकदा मिश्किल हसत सुनिता म्हणाली, "आवडलीयेस ग!! पाहिलय त्याने तुला फ़ोटोत, मीच दाखवला त्याला फोटो..."

थक्क झालेल्या जाईच्या हातावर फोटो ठेवून सुनिता हसतच तिथून निघून गेली होती... जाईची नजर आपसूक फोटोकडे गेली, तेह्वा, अनिकेतची हसरी नजर आपल्याला काही विचारतेय अस उगीच तिला वाटून गेल! इतकी मनाचा ठाव घेणारी नजर.......

आता परत एकदा जाईला सगळ आठवल, आणि उगाच तिची धडधड वाढली! आज प्रत्यक्ष भेट होणार होती......

अपूर्ण....

सुमल्याची आश्रम वारी!!... (३)

"रे, माका काय न चलूक?? पण सुमल्याक पण विचारुक व्हया मां? तेणी हो म्हणूक व्हया मां? आयला तर बराच होईत, आमका ही काळजी नाय होईत, आणि पोरग्या आसाही चुणचुणीत, काय हो मास्तर, तुमका काय वाटता??"

"माझ अनुमोदन आहे हो!! हुशारच ती, पण शिकली नाही!! नाहीतर आज गावाचे नाव काढले असते हो पोरीनं!! हंऽऽऽ! कमी का समजावले मी तीस आणि तिच्या आईस आणि बापूसाक?? पण नाहीं!! कोणी फारसे मनावरच नाही घेतले!! असो. रे बाबल, येऊ दे हो सुमतीला आमच्या सोबत. भारी तीक्ष्ण नजरेची पोर आहे होऽऽऽ आणि तुझ्या काकीबायची आवडती पण. बायका बायका घालतील घोळ एकत्र, आमच्या डोक्यांस शांतता!! कसें??"

आणि अश्या रीतीन ठरला, काका, मास्तर आणि दोघांचे फ़्यामिल्ये, गुरव आणि सुमल्या, येवढे मंडळी जावन आश्रम बघून येतली.

सुमल्याक बातमी देवक बाबल सुमल्याक हाकारतच तेच्या घरच्या ओसरीर येऊन ठेपलो.

"सुमल्याऽऽऽऽऽ गो सुमल्याऽऽऽऽऽ!! चल, हिकडे ये बघया चटचट!! गो सुमल्या!! अगो, चल लवकर, माका कामा आसात गोऽऽऽ! काय फक्त तुझ्या पाठसून बातमे देवक धावत रवतलय काय दिसभर?? चल, चल!! "

"रे, काय झाला, मेल्या वराडतस कित्या धोतराक आग लागल्या सारखो?? काऽऽऽय, काय झाला?"

"गो, सामान बांधूक घे, समाजलय? तुका जावचा आसा, आश्रम बघूक... बरोबर काका, काकीबाय, मास्तर, मास्तरीणकाकी, गुरव सगळे आसत, तेह्वा तशी चिंता करा नको, काय तुका येकट्याकच धाडणव नाऽऽय.... पण थय सगळा डोळे उघडे ठेवन बघ, समाजलय मां?? येकदम वेवस्थिशीर रिपोर्ट मिळाक व्हयो हयसर, कितपत पाण्यात आमी आसव ता कळाक व्हया! आपले अडाणी कोकणी लोक म्हणान कोणी शेंडी लावूक जातीत, तर तसा होता कामा नयेऽऽऽ, आयला मा ध्येनात?"

सुमल्याचो वासलेलो आ अजून तसोच होतो, आता शेहराकडे जाणा तेका तसा नवीन नव्हता, पण तेची आपली ठरलेली वारी होती, आणि एक मामाचा ठिकाण सोडून अजून खयच ता फारसा जावक नाय होता. आणि आता एकदम आश्रम बघूक जावचा??

"अगोऽऽऽऽ काय?? समाजला का नाय तुका?? जातलय मां?? "

"गेऽऽऽऽ बाये माझ्याऽऽऽ!! काय सांगतय तरी काऽऽय.... खराच सांगतसय का भगल करतसय?? माका नेतत आश्रम बघूऽऽऽक?? रे, रव रे, चाय हाडतय इल्ली......"

चाय बरोबर सुमल्यान बाबल्यापुढे रव्याचो लाडू पण ठेवलो। चाय आणि लाडू खात खात बाबल्यान आयुष्यात पहिल्या खेपेकच सुमतीक सूचनाच सूचन दिले अन सुमल्यान पण ते ऐकान घेतले. प्रथमच असा दृश्य दिसला की सुमल्याचा त्वांड बंद आणि बाबल बोलतासा!! सुमल्याची ओसरी हो ट्रान्स्फ़र शीन बघान धन्य झाली!! पण गावच्या इज्जतीचो आणि भलायकीचो सवाल होतो ना!!

आणि मग, प्रस्थानाचो दिवस उजाडलो! एव्हाना, महाराज पण बाकीच्या पंचक्रोशीत फिरणार होते, आजूबाजूच्या गावातल्या लोकांक त्येंच्या पवित्र दर्शनाचो लाभ देणार होते, आणि काय काय करुचो त्येंचो विचार होतो हे त्या श्रीकृष्णाकच ठावक होता!!

आश्रमाक जातले लोकांच्या प्रवासाखातेर, एका भक्ताची आरामदायक क़्वालिस डायवर सकट तयारच होती, तर, शुभस्य शीघ्रम म्हणत, बर्‍याश्या मुहूर्तावर, सगळा लटांबर गाडीत बसून आश्रमाच्या वाटेक लागला येकदाचा.....


अपूर्ण....

December 14, 2007

मार्गी दूरच्या एकल्या......

दिठ तुझी माझी कधी,
क्षणी एका रे गुंतली
मौन आर्जवाची तुझ्या,
वेडी भूलही पडली

अश्या वेड्या वेडासाठी,
केली आयुष्याची होळी
झुगारूनी ऋतू सारे,
वाट काटेरी धरली

वेड हेच आता माझे,
आहे माझ्या सोबतीला
वाट चालते सांगाती,
मार्गी दूरच्या एकल्या......

December 8, 2007

मी ब्लॉगतेय!!

मागच्याच एक पोस्टमधे मी म्हटलय ना, मला दाट शंका येतेय की मी ब्लॉग जंकी बनत चाललेय म्हणून?? आता ती शंका खात्रीत बदललेली आहे! अगदी खात्रीच झालीये माझी, शंभरच काय हजार टक्के, की मी एकदम अव्वल दर्जाची ब्लॉग जंकी बनलेय म्हणून!!

जेह्वा सुरुवातीला एक मित्राने सुचवल की ब्लॉग बनव स्वत:चा वगैरे, तेह्वा मी अगदी खोडूनच काढल त्याला!! छे, छे, मला नाही जमणार वगैरे!! तशी जरा निरुत्साहीच होते या सगळ्या प्रकरणाबद्दल. मग जेह्वा त्याने ठरवलच अगदी, की माझा ब्लॉग असायलाच हवा, तेह्वा, हो, हो केल आणि थोडेफ़ार कष्ट घ्यायचा प्रयत्न केला!! :P

म्हणजे ते टेंप्लेट निवडण वगैरे, वगैरे… तपशिलात जात नाही कारण, सगळ्यांनाच माहीत आहे काय काय कराव लागत ते… :P हे सुरुवातीचे कष्ट घेणे प्रकार जरा वैतागवाणा. आणि मी जऽऽऽराशी(च) आळशी आहे, त्यामुळे, हे असे कष्ट कोण घेणार, हे एक मोठ्ठ प्रश्न चिन्हच! आणि ही सगळी पूर्वतयारी संपली की मग, लिहायला सुरुवात करायची!! फारच लांबचा पल्ला होता!!

पण मित्र तारी, अन ब्लॉग सुरु करण्यातही मदत करून देई!! नंतरच्या बर्‍याच छोट्या, किचकट अन महत्वाच्या गोष्टी या माणसान अगदी न कंटाळता केल्या. किती आभार मानावे तेवढे थोडेच आहेत, पण त्याला नाही आवडणार, म्हणून, इथे एका वाक्यात मनापासून मानतेय. अगर तुम नहीं होते तो मेरा ब्लॉग नहीं होता!! :P

आणि मग, पोस्टायला सुरुवात केली, मिळणार्‍या कमेंट्सनी पण उत्साह वाढत गेला, आणि मंडळी वाचतात आपण लिहिलेल, ही भावना पण सुखावणारी तर खरीच. आता हा उत्साह किती दिवस टिकतो ते बघू!! तो भाग अलाहिदा!! सध्ध्या तरी हे सगळ मी मस्त एंजॉय करतेय.

आता यात कसला आलाय जंकीपणा अस वाटतय का तुम्हांला?? तर तस नाहीय, मी सध्ध्या इतर ब्लॉगही खूप वाचते, ते ही नॉर्मल आहे, म्हणता?? पण माझ नुसते पोस्ट्स वाचूनच समाधान नाही होत आताशा, मला त्यावर पडणारे कमेंटस पण वाचायचे असतात आणि आता तर आधी कमेंट्स वाचून, कमेंटमधे काय लिहिलय ते कळाव, त्याचा अर्थ लागावा म्हणून मी पोस्ट्स वाचते!!

बोला आता!!

सुमल्याची आश्रम वारी!!... (२)

"अरे, अरे काय ह्या?? ऑँ?? हयसर सगळे जमलेसत काय कारणान, तुम्ही झगडतसात काय कारणा काढून, अरे शोभता काय ह्या?? अशान काय्येक होवचा नाय हातून, समाजल्यात?? तर आता हो धयकालो बंद करात आणि मुद्याचा काय ता बोलाक लागात!!"

"मी काय म्हणतय काकानुं, असा केल्यान तर? म्हणजे बघा, एक तर तुम्ही जावात, तुम्ही म्हणजे कशे, जरा वडीलधारे नाऽऽऽय, मगे तुमका समाजतला कसा वागूचा, काय बघूचा… होय का नाय रे??"

"होय, होय…" सगळ्यांनीच होकार भरलो!! सगळ्यांचा एक झटक्यात झालेला एकमत बघून पारही अचंबित झालो!!

"अजून कोणाक धाडूयात?? ओ गुरवानु, तुम्ही जाशात काय?? तुमका आपला देवाधर्माचा माह्यत आसा, तुम्ही जावात काकांबरोबर..... काय हो काकानुं??"

परत एकदा होय, होय असो घोष झालो, अशा रितीन दोन मेंबर तरी ठरले.

"आता अजून कोणाक धाडूयात??"

"मी काय म्हणतय, आपल्या शाळेचे हेडमासतर आसत, तेंका जावदे हेंच्या बरोबर! जरा शहाणो माणूस बरोबर असलो म्हणजे बरा, नाऽऽऽय?"

"म्हणजे रे काय?? काका आणि गुरव काय वेडे रे?? काऽऽय मेलो बोलतासाऽऽऽ, समाजली अक्कल! उगी रव!!"

"रे उगीच अकलेवर जाव नको हां!! सांगान ठेवतय!!"

"अरे, अरे काय ह्या?? सतत कसले रे भांडत रवतत!! बायल माणसा तरी बरी रे तुमचेपेक्षा!! उगी रवात बघया!! आरे मास्तरांका असांदी बरोबर, मीच सुचवतलय होतय ह्या, शिक्षक आसात ते, चार बुका वाचलेली आसत, तेंका कळता बरा वाईट आपल्यापेक्षा… असांदेत" इति काका.

"आणि आता बायल मनशा कोण कोण जातली?? ह्यापण ठरवा बघू…"

"बायल मनशा?? ती कित्यां आणि?? थय काय तुझ्या आवशीचा डोहाळ जेवाण आसा की काय?? आणि बायल मनशा जातली आणि हयसर घराकडे कोण बघतला?? काय पण मेलो सांगतासा!!"

"अरे असा काय, ते स्वामीच नाय सांगी होते, की बायला माणसां पण येवूक व्हयी आणि तेणी पण बघूक व्हयो आश्रम म्हणान?? ता मी सांगी होतय!! आणि काय रे चुकला माझा?? बायल माणसांका बरोब्बर समाजता, कसा काय वातावरण आसा तां, समाजला?? तेंच्या दृष्टीन पण बघूक व्हया ना?? आजकाल सरकारात पण तेत्तिस टक्क्यांची भाषा करतत, वाचलेलय मां पेपरात?? मगे?? काय नुसतेच आपले नट्यांचे फोटो बघीत रवतय??"

"तां खरां, अरे मेल्या पण असा जाताला कोण घरदार अन पोरा टोरां टाकून??"

" मी सांगू कोणाक धाडूचा ता??" बाबल बोललो.

"बोल, बोल बाबल, काय म्हणी होतय?" काकांन विचारल्यान.

"काकांनु, ह्या तर खराच की कोणी घरातसून बायल माणसांक तसा पाठवचा नाय.... आता बायल माणसाबरोबर घोवाकय धाडूचो लागतलो मांऽऽऽ.... त्यापेक्षा, तुम्हींच काकीबायेक घेवन जायात आणि मास्तरानुं तुम्ही मास्तरीणकाकीक नेयात होऽऽ... कसा?? आणि बरोबर सुमल्याक नेयात!"

"रे, ह्या समाजला की, काकीबाय आणि मास्तरीणबाय जातले, ता ठीक, पण सुमल्या कित्या आणि?? थय काय हळदी कुंकू आसा काय रे?? काय फुगडे घालूचे आसत??"

"च्च!! इतक्या समाजणा नाऽऽऽय तुका?? रे, ही तशी जरा म्हातारी मंडळी जातत मां..... काकानु, मास्तरानु, रागाव नकात हांऽऽ म्हातारा म्हटलय म्हणान, पण आता तुम्हीच सांगात बघया, मी काय खोटा म्हणतय काय?? सुमल्या जायत तर तेंची काळजी घेईत नाऽऽऽयऽऽ.... अगदीच कसो रे तुझो वरचो भाग रिकामो?? द्येव विसारलो मुद्देमाल ठेवूक की मेल्या तू धावलेलय मागच्या बाजूक द्येव अक्कल वाटीत होतो तेंव्हा??"

"....मगे काकानु, काय वाटता तुमका??

अपूर्ण....

December 7, 2007

अन्न हे पूर्णब्रह्म!!...(२)

.... हे अगदीच राहवल नाही म्हणून!! अतिशय आनंदाने पोस्ट करतेय! :)

ज्या सहकार्‍याला मी आजपर्यंत सर्वात जास्त पिडलय ना की ताटातल टाकू नको म्हणून, तो माझ्या बरोबर कँटीनला आला होता जेवायला अन ताटात चक्क मोजकेच पदार्थ अन मोजक्या प्रमाणात!!!!

मला म्हणाला की "देखो, आज तुम्हारी बात का असर हो गया"

जेवणाच्या शेवटी स्वच्छ ताट पहायला त्यालाही बर वाटल, मला तर इतक बर वाटल!! आता तोही सांगेल म्हणे इतरांना. ऐकूनच छान वाटल. :)

अगदी ज्योतसे ज्योतच झाल की!!! :)

मराठीचिये पाईंका वक्र पाहे....

हा आजचा किस्सा, असच आज आठवला म्हणून... गमती, गमतीत :)

काय झाल, की बंगळुरुत आल्यावर एखाद्या तहानलेल्याला जस पाणी, पाणी व्हाव ना, अगदी तस्सच, मला मराठी, मराठी झाल होत!! कुठेही जा, आपल, कुडुकुडूच ऐकू यायच!! आणि मराठी आठवून बेचैन व्हायच!

नाही, नाही, माझी कुठल्याही भाषेशी कसलीही दुश्मनी नाहीये. खर सांगायच तर मला वेगळ्या भाषा शिकायला आवडत. वेगवेगळे शब्द वगैरे. आतापण माझ्याबरोबर काम करणार्‍या सहकार्‍यांना मी पीडतच असते की कन्नड शिकवा वगैरे..... शिकवणी सुरुपण झालीये अख्ख्या टीमकडून! :D मजा येते, पण शेवटी माय मराठी ती माय मराठीच ना?? म्हणजे मी ही अधून मधून विंग्रजी शब्द वापरतेच, अस काही ज्वलंत भाषाभिमानीपणा वगैरे नाही करत, पण शेवटी आपली भाषा ती आपलीच भाषा.

आता बघा, की जर मला म्हटल, की तुला २ पर्याय आहेत, सुंदर अलंकारयुक्त अस काही तरी कन्नड ऐक - आता खर तर,मुळात साध कन्नड पण मल येवढ येत नाही, तर अलंकारयुक्त काय कळणार कप्पाळ!! पण सध्ध्या कन्नड भागात आहे, मग पटकन तेच आल मनात, बर, हिंदी म्हणूयात - तर सुधारीत आवृत्तीनुसार अलंकारिक हिंदी ऐक, किंवा मराठीतल्या शिव्या ऐक, कोणता पर्याय निवडशील?? दुसर्‍या क्षणाला, मी भन्नाट शिव्या ऐकण्याचा पर्याय निवडेन!!! खरच, शप्पत!! यावर काहीही म्हणालात, तरी शेवटी, माझ्यासाठी, माझी मराठी आहेच माझा बाब्या!! आणि यावर कोणाचेच, काहीही विरुद्ध मत मला ऐकायचे नाहीये!! खलास!! :D

आणि तसही बरका, विरुद्ध, अभ्यासपूर्ण, चिकित्सक, तात्विक मतं मांडायचे, अन तीच मतं कशी योग्य आहेत (बरोबर नव्हेत, योग्यच!! बरोबर मत अस म्हटल की ते फुटकळ मत वाटत, योग्य म्हटल की कस एक वजन येत त्याला!) हे आग्रहानं आणि अट्टाहासानं प्रतिपादन (शब्द फाऽऽर महत्वाचाय बर!!) करण्याचे सगळे घाऊक हक्क आम्हां पुणेकरांकडे अत्यंत सुरक्षित आहेत!! कायमच्या निविदा भरल्यात आम्ही त्यासाठी अन त्या मंजूर झाल्याच असाव्यात!! :D त्याशिवाय का आम्हांला जमत अस हे वागा बोलायला सगळ आणि ते ही सतत?? असो, खूपच विषयांतर झाल.

तर, इथे आल्यावर, हापिसमधे कोणी माझ्या मराठीचिये कौतुके बोलणारे आहे का, ह्याच शोध घ्यायला लगेच सुरुवात केली आणि सुदैवाने चार एक टाळकी सापडली. बर वाटल, मग अर्थात आम्ही एकमेकांशी मराठीतूनच बोलायचो/बोलतो, जाम धमाल यायची आणि येते गप्पा मारायला, आणि सगळ्यात ग्रेट म्हणजे, दोन जण माझ्याच टीममधे आहेत.

तर, असच एकदा, गप्पा मारताना माझा एक मद्र देशीय सहकारी तिथे आला, रीतीप्रमाणे त्यालाही हाय हॅलो केल, कस चाललय वगैरे विचारल.. आणि, अर्थात हे विंग्रजीमधून, कारण, त्यांना एक मद्र आणि दुसरी विंग्रजी ह्या दोन भाषा सोडून, अगदी ते राहतात त्या राष्ट्राची भाषा बोलायची पण विलक्षण एलर्जी आहे!!

आणि कोणी काही लेक्चर द्यायच्या आत सांगतेय, मी मुळीच सगळ्यांना एकच पट्टीने मोजत नाहीये. माझी शेजारीण पण मद्र देशीयच आहे, आणि आमच एकदम गूळपीठ आहे. आणि ती चक्क मस्त हिंदीही बोलते, अन कधी कधी मला पण मद्र भाषेतले शब्द शिकवते, आणि मी ही शिकते. कुठलीच भाषा शिकायच मला काही वावड नाहीये, विरोध आहे तो प्रवृत्तीला, राष्ट्र भाषा येत नाही याचा अभिमान कसला?? हा तर निव्वळ करंटेपणा आहे, अस माझ मत आहे.

तर, सुरुवातीला ठीक बोलत होतो आम्ही इथल तिथल, मग तो एकदम, आमच्या मराठी बोलण्यावरच घसरला!! आणि मग ही मुक्ताफळ उडाली!! तेच मूळ संवाद घालायचा मोह आवरत नाहीये, म्हणून त्यातल्या त्यात सेंसॉर करून... :D

मद्रमॅन: व्हाऽऽट इस धिऽऽसऽऽऽ यू आल आऽऽऽऽलवेज स्पीक इन यूवर लॅंग्वेऽऽज... धिऽऽस इज वेऽऽऽऽरी रॉंग! ग वर जोर देऊन!

आम्ही जरा उडालोच!! अरेच्या! याला काय चावल आता!! आधी आम्ही समजलो की तो खेचतोय आमची, मग लक्षात आल की, तस नाही, खरच म्हणतोय तो, तेवढ्यात,

मद्रमॅन: यू मस्ट स्पीक इन अवर लॅंग्वेज, दु यू नो, देअर इज नोऽऽऽ लॅंग्वेज लाईक अवर्स!! इट इज इंटऽऽऽर् नॅशनल लंग्वेज, यू नो??

आमची डोचकी सटकायला लागलेली!!

मी: इंटरनॅशनल?? सिन्स व्हेन?? हाउ कम??

मद्रमॅन: यू डोंट नो?? व्हाऽऽट यू आर सेईंग?? इट इज स्पोकन इन श्रीलंका, यू नो दॅट???

आम्ही प्रचंड वैतागाने, पण प्रचंड हसू यायला लागल्याने, खुर्च्यांमधून पडायच्या बेतात होतो!! आणि आता मराठी मॅन पण वैतागलेले!! आता सगळ्यांनाच खुमखुमी चढलेली!!

मराठी मॅन १: सो व्हाय डोंट यू गो टू श्रीलंका?? सेटल डाऊन देअर?

मराठी मॅन २: लेका फ़ुकण्या ( ए, तू कान बंद कर आता, मी त्याला शिव्या ऐकवतो मस्त - हे मला) भXXXx तिकडे मुंबईत येता लेको, तिकडे काय मराठी शिकता का रे?? तू भेट रे साल्या बाहेर!! च्यायला, माज उतरवतो तुझा, मराठी बोलू नका म्हणतोय!!

नंतरच्या शिव्या न लिहिल्याबद्दल क्षमस्व वाचक हो! (कोणी वाचत असाल तर!)

मद्रमॅन : व्हाऽऽट इज धिस?? आय एम नॉट फ़ॉलोइंग यू गाऽऽईज!! स्पीक इन इंग्लिश, सो दॅट आय कॅन फ़ॉलो....

मराठी मॅन १: अबे, मेरी बात को समझ ध्यानसे, एक तो हम मराठीं में बोलना तो छोडने वाले नहीं, तेरी लॅंवेज इंटरनॅशनल हो या और कुछ...

मद्रमॅन: आय डोंट अंडरस्टॅंड हिंदी...

मराठी मॅन१ : वो तुम्हारा प्रॉब्लेम है, नहीं आती तो सीखो!!

आणि अस बरच काय काय वाजल!! त्यानंतर त्याच्या समोर तर मराठीतच बोलयचो आम्हीं अन त्याच्याशी बोलताना हिंदीतच बोलायचो!

सुरुवातीला त्याने कांगावा केला, पण आम्हां मराठी लोकांची डोकी जरा तरकटच राव!! एकदा खुन्नस म्हणजे खुन्नस, बस!! मद्रमॅन आता झक्कत हिंदीतही बोलतो!!!

आणि आम्ही सुखाने मराठी गप्पांचा फड त्याच्या समोर, त्याच्या नाकावर टीच्चून जमवतो!!

December 5, 2007

ब्लॉग जंकी

आज पहाटे चार वाजता हापिसचा ऑन कॉल मोबाईल किणकिणला!! मनातल्या मनात शिव्या घालत, कानाशी धरला तर पार साता समुद्रापलीकडून, राणीच्या देशातून हापिसमधला गोरा बोलत होता... काही तरी क्रिटिकल प्रॉब्लेम होता, अन मदत करतेस का म्हणून. नाही म्हटल तर चालणार नसतच!! नको रे बाबा आता, मला झोपायचय खरतर, उद्या बघू, अस सांगून चालत नाही!! मग उगाच आपल अर्थ नसलेल स्मॉल टॉक अन फालतू गप्पांचा प्रयत्न. पहाटे चारला गप्पा तरी काय मारायच्या डोळ्यांत झोप असताना?? काही जण मस्त गप्पा मारतात अन काही जण उगाच राजघराण्याकडून "स्टिफ़ अप्पर लिप" शिकवण घेऊन आल्यासारखे असतात वागायला. जाऊंदेत.

तर, प्रॉब्लेमवर काम केल अन मग सुटलाही तसा पटकन, दिडेक तासात, मग लगेच झोप येईना, अन मराठी ब्लॉगविश्वात भ्रमंती सुरु केली. कधी कधी वाटत, ब्लॉग जंकी होणार मी, का झालेय एव्हांना? पण खूप छान छान पोस्टस वाचायला मिळतात अन बर्‍याच वेळा प्रतिक्रिया द्यायचा मोह मी आवरते, उगाच आपल काय, जिकडे तिकडे आपल्या पाऊलखुणा उमटवत बसायच!! :D पण सही लिहितात मंडळी!! कधी कधी, म्हणजे बर्‍याचदा इतरांच लिखाण वाचून मला जाम कॉम्प्लेक्स येतो!! आपण काय भिकारचोट लिहितो अन का लिहितो अस वाटत! पण काय... आता व्यसन जडल्यासारख झालय थोडफार.... म्हणतात ना, नाविलाज को क्या विलाज, तस्सच अगदी!! असो.

तर, उठले तेह्वा बाहेर इतका गडद अंधार होता, इतकी निरव शांतता... आणि मग काम करताना, आणि नंतर भ्रमंती करता करत बाहेर नजर गेली तर अंधार पुसला गेला होता अलगद अन सकाळ हलके हलके उजळत होती.......इतक ग्रेट वाटल पाहताना!! म्हणून हा लेखन प्रपंच, शब्दांत पकडून परत कधीतरी अनुभवायला. तरी कठीणच आहे शब्दांत पकडण तस. तरीही बसलेय लिहायला, झालेच आता मी ब्लॉग जंकी! नक्कीच!!

कदाचित, एखाद दिवशी लांबलचक चाललेल्या कंटाळवाण्या रटाळ मीटींगमधून बाहेर पडल्यावर वाचल तर बर वाटेल का?? :)

पुरावे

पुरावे आणि उसासे,
सारंच आता फ़ोल आहे,
लांडग्यांच्या मस्तवाल जगात,
माणूस कवडीमोल आहे

अन्न हे पूर्णब्रह्म!!...(१)

बेंगलोरला नोकरी मिळून एक वर्ष झालय आणि आता हळूहळू इथल्या रस्सम, सारमची सवय पण व्हायला लागलीय! न होऊन सांगतेय कोणाला?? एक वेळ सकाळच जेवण बनवण जमतं, पण रात्री घरी येऊन परत स्वयंपाकघराकडे जायला पण नको वाटत!

तरी, तस कंपनीत अगदीच सतत काही बेकार नसत जेवण. बरही असत कधी कधी. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे केवळ दाक्षिणात्य लोकच इथे काम करत नाहीत याची ही जाण कंपनीच्या प्रशासनाला आहे. त्यामुळे, उत्तर भारतीय प्रकारच खाण पण असतच. अगदी सामिष पण. त्यावर तर रोजच किती जणांच्या भक्तीभावे उड्या असतात!! कधी न पाहिल्यासारख!! नाही, नाही, मला सामिषाहाराचे मुळीच वावडे नाही. मी खात असे. आता सोडलय, तेही स्वेच्छेनेच. पण बनवते अजूनही. पण मुद्दा हा नाही, हे आपल असच, ओघानेच आल म्हणून.

मुद्दा वेगळाच. मी नेहमीच बघते, कितीतरी जणं जेवण घेताना आपापली ताटं अगदी भरून घेतात. इतक, की आता अजून घेतल तर खाली पडेल अन ताटातून पण ओसंडेल इतक. बर, घेतलत तर घ्या, असेल तुमची भूक तेवढी, तर जरूर घ्या, पोटभर जेवा, अगदी सुखाने तृप्त व्हा! पण हे एवढं, बकासुरी पद्ध्तीन घ्यायच अन मग ते पानात तसच टाकून द्यायच!! कोणती रीत आहे ही?? इतका संताप अन चिडचिडाट होतो माझा!! रोज ही अशी अन्नाची नासाडी करायला काहीच कस वाटत नाही या लोकांना?? इतका कसला माज?? का आपलं समोर भरपूर आहे, आणि सहजगत्या उपलब्ध होतय, म्हणून त्याची किंम्मत नाही?? जेवण झाल्यावर हात धुवायला गेल, की तिथले वाया घालवलेल्या अन्नाचे एक-दोन ड्रम - हो, हो ड्रम - पाहूनच मलाच पोटात खड्डा पडल्यासारख होत... किती उपाशी पोटं या अन्नावर भरली गेली असती, किंवा जाऊ शकतात हा विचार माझ मन कुरतडल्याशिवाय रहात नाही रोज.... विलक्षण अपराधी भावना माझ्या मनात दाटून येते अन अगदी खिन्न व्हायला होत!

आत्तापर्यंत, मी माझ्याबरोबर जेवायला जे कलीग्ज येतात, त्यांना सांगायचा, समजवायचा खूप प्रयत्न केलाय, नेहमीच करते, की सुरुवातीला पानात जरा कमीच घ्या अन्न, मग हव तर परत घ्या, अन त्याला काही बंदी पण नाहीये, तरीही बर्‍याचदा पालथ्या घड्यावर पाणी असत हे माझ्या लक्षात येत.

काही कळतच नाही मला... आजकाल माणसांची मन इतकी मख्ख झाली आहेत का?? खूप कुठे लांब जायला नको, इथेच बेंगलोरमधे रस्त्यांवरची भीक मागणारी, उपाशी तापाशी असणारी लहान मुलं, अठरा विश्व दारिद्र्य भोगणारी माणसं, झालच तर देशातले दुष्काळी प्रदेश, तिथली माणस, त्यांच्या वाट्याला आलेले भोग, खाणच काय, पाण्याच्या थेंबालाही महाग असणारी आयुष्य पण काही जण जगतात, हे यांना जाणवतच नाही का?? वाया जाणार्‍या अन्नाकडे बघून असे कोणतेच चेहरे आठवत नाहीत का? का सुशिक्षित म्हणायच यांना??

अर्थात, ज्या शहरात आपण राहतो तिथले प्रश्न जाणवत नसतील तर, देशासमोरच्या प्रश्नांवर विचार करण, ही खूप लांबची पायरी आहे म्हणा. ते तर जाऊच देत, पण एक मूलभूत सुसंस्कृतपणाही नाही का? इतक अन्न शांतपणे, जराही रुखरुख न बाळगता, टाकवतच कस मुळात? आपापल्या घरी ही असेच वागत असतील का हे?? समृद्धी माणसाला इतकी बेलगाम रीत्या बेजबाबदार बनवते?

वाया जाणार्‍या त्या अन्नाकडे बघून, अन्न हे पूर्णब्रह्म, हे उगाच कुठे तरी डोक्यात घणघणत राहत इतक मात्र खर!

December 2, 2007

सुमल्याची आश्रम वारी!!...(१)

"रे बाऽऽऽबल, खयं चललय मेल्या सकाळच्या पारी इतक्या घाईत?? कोणच्या म्हशीक रेडकू झाला काय मेल्या?? तुका काय बारशाचा आवताण आसा रेऽऽऽ??" सकाळच्या चायच्या भांड्याक भायेरसून राख फासता फासता, सुमतीन बाबलाक साद घातली!

बाबलो थयच थबकलो. सुमल्याचो आवाज तेह्वाच वळाखलो त्येनी, नायतर इतक्या प्रेमळ भाषेत त्येचो उद्धार करणारा दुसरा कोण असताला!! "गो सुमल्या, अगो आयलय तरी कधी परतान? माका काय खबरच नाय!! कोण काय बोलूक पण नाय ता..."

"तर रे मेल्या!! तू येकदम मामलेदारच मां, तुका सगळे बातम्ये पोचवूक!! लोकांकनी काय काम धंधे नाय आसत काय मेल्या?? तुझे पाठसून बातमी पुरवत धावतले ते!!" इति सुमल्या.

बाबलो थक्कच झालो!! काय बायल माणूस तरी!! त्वांड आसा काय तोफखानो!! सतत आपला चलतासा, काळ नाय, येळ नाय! धन्य माऊली आसा अगदी!! काय त्या तोंडाळपणाक धरबंध असात तर!! तशी हातान सढळ आसा, पण, तोंडान सगळा घालवतली! आणि आता सुमल्यान अडवल्यावर, त्येच्या प्रश्नांच्या सरबत्तीक तोंड दिल्यशिवाय थयसून जाणा पण जमण्यासारखी बाब नव्हती!! कठीणच काम होता! शिकला नाय म्हणानच ह्या, नाय तर बालिश्टर होऊक काय हरकत नव्हती हेका!! मनातल्या मनात काय बाय कुरकुरत, बाबल्यान थयच एक बर्‍याश्या दगडार बसकण घेतल्यान.

" बोल, काय म्हणतय सुमल्या?? आणि आता हयसर हाकारलयसय, तर वायच चाय दी बघया इल्ली, सकाळच्यान घसो नुसतो कोरडो पडलो माझो!" बाबल्यान चायची फ़रमाईश करूनच टाकली!

सुमल्याकडे चायवांगडा अगदीच काय नाय तर बटर तरी मिळात ह्या ठाऊकच होता बाबल्याक. थोड्या वेळातच सुमतीने बाबल्यासमोर चाय आणि बटर ठेवल्यान. पितळी कपबशीतून फ़ुर्र करून चाय पिता पिता बाबल्यान येकदम मान्य करून टाकला की सुमल्यासारखी चाय कोणाकच बनवूक येणा नाय!!

"बाकी कायेक म्हण तू सुमल्या, तुझ्या हाताक चवच बरी हां!! मेल्या, सगळ्यांचा सगळा करतय, पण तोंडान घालवतय मगो!! आणि आयलय कधी परतून येवढा शहराकडे गेलेलय ता??" गरम चाय पोटात गेल्यावर, बाबल्याचा नरडा मोकळा झाला गजाली करूक। " जरा ती पानाची डबी घे गो हयसर... वायच पान खतय, मगे आसतच कामा, जरा सुदीक वेळ मिळूचो नाय माका... हसतय काय मेल्या, खराच सांगतय!" बाबल करवादलो!

"रे बाबल, तू माका सांगतय मेल्या कामाचा कवतुक?? तुका काय आज बघतसय काय रे मी?? मेल्या लंगोट लावून आवशी पाठल्यान शेंबडा नाक ओढत जाय तू, तेव्हांच्यान बघतसय, समाजलय?? कोणाक रे सांगतय कामाची कवतिका?? आणि कसला मेल्या काम काढलय इतक्या?? तुझ्या व्होकलेच्या लग्नाचो माटव घालूचो आसा काय रे??" आता बाबल काय बोलतलो कप्पाळ!!

तसा बाबल आणि सुमल्यात जास्त अंतर नाय होता, सुमल्या म्हणजे सुमन, बाबल पेक्षा पाच- सात वर्षांनीच मोठा होता, आणि तोच मोठे पणाचो अधिकार ता गाजवी, पण कसो? तर होडल्या बहिणीच्या मायेन, आणि ह्या माहित होता, म्हणान, बाबल ही आपलो गप रवी.

"हं, तर सांग मरे खयच्या कामासाठी धावत होतय??"

"गो सुमल्या, आता काय सांगतलय तुका, आपल्या गावाक येक एकदम पावरबाज स्वामी येवचे आसत! समाजलय?? त्येंची सगळी तजवीज करूक व्हयी, काय समाजलय?? सगळे बापये येतले आता महादेवाच्या देवळात, विचार विनिमय करुक, थय जाइ होतय मी. आता देवाचो माणूस येतलो, त्येची जरा सेवा करीन तर पुण्य मिळात मां??"

"गे बाये माझ्या, सांगतस तरी काय?? रे थय काय सांगतत, ठरवतत, ता येऊन सांगशीत मां माका?? मी पण जोडीन रे थोडा पुण्य, संत माणसाची सेवा करूची, माझी आवशी नेहमी म्हणा रे!" सुमल्यान विचारला। त्यावर होय, होय करत, बाबलान थयसून काढतो पाय घेतलो! कारण येकदा का सुमल्याचा आवशी पुराण सुरु झाला की तास दोन तासांची निश्चिंती, ह्या आता सरावान बाबलाक ठाऊक झाला होता!

बाबल बैठकीक गेलो, अन नंतर प्रत्येक बैठकीक गेलो. गावात जोरदार बैठकी घडले, महा नगर पालिकेच्या निवडणूकीत होवचे नाय इतके संवाद परिसंवाद घडले आणि कसा काय करुक व्हया, अन स्वामी महाराजांची कशी बददास्त ठेवूक व्हयी, याची जोरदार रूपरेखा ठरली येकदाची! द्येवाचा काम ता, तेका कोण नको म्हणात!

आणि, शेवटी एकदा, गावात स्वामी महाराज अवतरले!! त्येंची ती लांबलचक दाढी, पायघोळ रेशमी वस्त्र प्रावरणां बघून मंडळीही जरा सुखावली. आणि महाराजांवांगडा शहरी, सुशिक्षीत गर्दी बघून तर त्येंची खात्रीच पटली, की ह्या काय असा तसा कुडमुडा काम नाय आसा!! जोरदार काम आसा! हळू हळू या स्वामीच्या पाया पडाक कायच धोको नाय असा सगळ्यांचा मत होवूक लागला, एकूणच स्वामींचा आणि त्येच्या भवतीच्यांचा वागणा बघून । देवाचो माणूस असलो तरी तेका पारखूक व्हया ना, आजकालच्या जमान्यात? मगे?

स्वामी महाराज गावात आयले, रवले, एकदम गोड, मिठ्ठास आवाजात काय काय बोलले आणि सरते शेवटी त्येंनी जाहीर केला की, ह्या गाव इतक्या सुंदर आसा, की प्रत्यक्ष देवाकडून तेंका आदेश आसा, की हय एक आश्रम बांधच!! आता साक्षात देवाचोच आदेश तो, नाय तरी कसा म्हणतला कोणी?? पण जागेचा काय?? आता कोकणी माणूस भावूक आसा, पण अगदीच हे पण नाय मां.... पण स्वामी महाराजच ते, तेंका नाय भक्त मंडळींची काळजी तर कोणाक असतली?? आणि ते काय अशे तशे भक्त मंडळीक फसवणारे स्वामी होते काय?? ते तर प्रत्यक्ष श्री कृष्णाक भगवान मानून चालत बोलत, अगदी त्येच्या सारखेच गोऽऽड़ हासत, वागत!! ते काय अशे फसवतीत?? काय तरीच काय?? साक्षात श्रीकृष्ण प्रसन्न त्येंका!!! उगाच काय तरी इपरीत शंका घेवचे म्हणजे काय?? कलियुगाचो प्रताप म्हणतत, ता ह्या असा, समाजल्यात?? कलीच तो, मनात नाय ते इपरीत इपरीत कल्पना घालीत रवता.... काय खरा नाय बाबा माणसाचा आजकाल!!

तर, स्वामी महाराजांन सांगितल्यान, की घाई करुचा काय काम नाय, व्हया तर गावातले चार शहाणे सुरते लोक, दोन एक बायल माणसा, अशे करून जा आणि त्येंचो मूळ आश्रम बघून घ्या, काय मनात शंका असतीत ते फेडून घ्या. बघा आता, असा कोण सांगात आधी?? ज़ावची येवची वेवस्था पण स्वामी महाराजांचे सुशिक्षित भक्त गण करुक तयार होते, गावकर्‍यांन नुसती हो म्हणूचीच खोटी होती!! आता सुशिक्षित लोक पण महाराज्यांच्या शब्दाखातर हो म्हणतत, म्हणज़े हो बाबा अगदीच कंडम नसात असो विचार करून परत येकदा महादेवाच्या पारार बैठक बसली!! ग़जाली, चवितचर्वण सुरु झाला!!

"नाय, पण मी काय म्हणा होतय, जावन बघूक काय झाला?? आपणांक काय खर्च पडणा नाय, काय नाय, आणि आपलो आश्रम बघूक गावता… काय बिघडला, सांगा बघया??"

"ता खराच रे, पण उगाच ह्या म्हणजे कसा, उपकार घेतल्यासारखे, नाय?? आता म्हणतले, या, बसा, खा, प्या…"

"मेल्या, प्या?? प्या??? तुका काय सुचता तरी रे पिण्याशिवाय?? खयही जातय ता आपला पिण्याचाच डोचक्यात मेल्या तुझ्या!! आश्रमात पितत रे?? कधी ऐकलेलय असा?? काय मेल्याचा लक्षण तरी!! रे, उगीच नाय तुझो बापूस गाळी करणा तो तुका, समाजलय मां?? काय तरी अकलेचे तारे तोडता मेलो!! रे, जनाची नाय तर मनाची तरी!"

"आत बघा ह्या उलटा काम कसा ता! मी म्हणी होतय, पाणी, दूध, ताक असा पिवूक दितले, श्रीकृष्णाचे भक्त मां ते...... मगे कृष्ण ह्या सगळा खाय, म्हायत आसा मां?? आपल्याच मनात चोर, आणि सगळयां जगाक नावा ठेवची, ह्या खयचा शास्त्र??"

"रे, हयसर माणसां जमली कशाक आणि तुमचा मेल्यांनो चललासा काय?? रे अशान कसा काय होयत रे?? खयही बघा, ता असाच!! मेल्यांचा अगदी देशाच्या राजकारणांत पण ह्याच! मूळ मुद्दो बाजूक आणि ह्ये तंडतत भलत्याच कारणांन!! म्हणान या देशाचा काय्येक कल्याण होणा नाय!! समाजलय मां?? कधी सुधरतले जाणा कोण!! सगळ्यांका नेवन समुद्रात बुडवूक व्हये!!"

अपूर्ण...

एक पत्र

प्रिय,

तुला पत्र लिहायला बसलेय खरी, पण शब्दांपलीकडल्या भावनांना शब्दांत चपखलपणे उतरवायच कसब नाही जमत मला तितकस अजून. मग वाटत, लिहू का नको, कारण जे म्हणायचय ते नेमक उतरल नाही तर काय अर्थ राहिला... पण तशी चिंता नाहीच मला, कारण सगळं समजेलच तुला, न बोलता आणि नेमक न सांगता आल मला, तरीही. तशीही कधी पत्र ही लिहायची गरज भासलीच नाही आपल्याला. तुला वाचता येत माझ मन, तुझ्यासमोर असले काय न नसले काय, अंतर कितीही असल तरी काहीच फरक नाही पडत तसा. आत्ता याक्षणी देखील एकमेकांपासून खूप लांब असलो तरी, एकमेकांच्या मनांत काय चालत असेल हे लक्षात येतच आपल्या. उगाच शब्दांच गालबोट तरी कशाला??

तसही, आपल्यात शब्दांचा आधार शोधणारी मीच. तुला त्यांची कधी फ़ारशी असोशी नसतेच. प्रत्येक गोष्ट शब्दांत मांडायलाच हवी का, हे तुझा नेहमीचाच प्रश्न. कमीत कमी शब्द वापरण लॉजिकल आहे, अस वरून आग्रही मत, आणि ते मांडायचा अन माझ्याकडून मान्य करवून घ्यायचा अट्टाहासही, जोडीला एक मिश्किल हसू. माझी सपशेल शरणागती तिथेच ठरलेली. पण हे लॉजिक, मी शब्द नाही वापरले तर कुठे पळून जात, हे आजत गायत मला समजलेल नाही, बघ!! तुला समजलय का रे??

भेटलो ना , तेह्वाच लक्षात आल होत माझ्या, की लांब राहिलेलच बर, कारण एकदा गुंतलो की परत त्यातून पाय सोडवण जमणार नाही, निदान या जन्मी तरी नाहीच, मग जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी फारसा फरक नाही पडणार! कितीही व्यस्त असलो अन कितीही जणांच्या घोळक्यात असलो तरी, हळूच एकदा नजर सर्वांच्या नकळत भिरभिरेल, तुझ अस्तित्व शोधायला. कान आसुसतील, ओळखीचा आवाज ऐकायला आणि मन तर कधीचच सुटलेल असेल हातातून, वावरत असेल तुझ्याच अवती भवती. आणि एवढ होऊन देखील सार्‍या गर्दीत मी नसतेच एकटी. माझ्या सोबतीला तुझ्या मनाचा एक कप्पा आहेच. कधी नव्हे ते बोलून दाखवलस, आणि एकदा मला समजावलस, एखाद्या रुसलेल्या लहान मुलीला समजवाव तस्सच अगदी..........

आठवत का रे तुला? किती आणि काय काय... जणू काही सार्‍या आयुष्याचा धांदोळा घेतलास, आणि सारी बेरीज वजाबाकी झाल्यावर लक्षात आल दोघांच्याही, की हे काही खर नाही गड्या, एकमेकांसोबत चालताना, दोघांचीही फरफटच होणार आहे सतत, एक तर एकमेकांची फरफट करायची नाही तर सभोवतालच्यांची. दोघांनाही मान्य नसलेला पर्याय! तू हताश, माझ्या डोळ्यांतून अगतिकता वहायला लागलेली...... सार काही बोलण्यापलीकडे पोचलेल.

मग म्हणालास, ठीक आहे, परत कधी सांगता येईल, न येईल म्हणून सांगतोच आता, "माझ्या आयुष्यात तुला, फक्त तुलाच, ध्रुवाच स्थान आहे. आयुष्यं समांतर वाहतील आता, आणि वहायलाही हवीत, स्वत:साठी नाही तरी इतरांसाठी, तसाही फक्त आपलाच हक्क कुठे असतो आपल्यावर? पण मी आहेच. कधीही हाक मारलीस तरी इथेच आहे. तुलाही ठाऊक आहे ना, मी ही तुझ्यासाठी सतत इथेच आहे?? "

प्रिय, त्या दिवशी मलाही हेच सांगायच होत, पण शब्दच वाहून गेले... नाही तरी प्रत्येक गोष्ट शब्दांत सांगायला हवी असा थोडाच नियम आहे? जाणून आहेसच की तू देखील, की मीही सतत तुझीच आहे.....

December 1, 2007

सांगा! आता काय कराल?

मित्र दारात येतो, घरात येत नाही,
मित्र बोलत राहतो.... कळू देत नाही,
मित्र ओळख नाकारतो दिवसाच्या कोलाहलात,
मित्र आठवण नाकारतो रात्री एकटं

मित्र शत्रूसारखाच होत जातो दिवसागणिक....
आणि पूर्ण विचारांती, नाही आवेगात क्षणिक.
दु:ख त्याचे खरे, नुसत्या दुराव्याचे नाही,
असूयेचे गाणे म्हणे असेच जन्म घेई

अशा मित्रास तहान लागेल सहवासाची, तो दाबेल,
अशा मित्रास जायचे असेल पुढे पुढे, तो जिंकेल,
अशा मित्रास तुम्हीं द्याल हिरवा चारा, तो फसणार नाही,
मित्रासाठी व्हाल तुम्हीच निवारा, तो थांबणार नाही

तो चालत सुटेल अशा वेगात,
की तुम्ही ऐलतीराशी तर तो क्षितिजापार,
जाताना नेईल तुमचे असे एकच गाणे,
की तुम्ही निराधार.... तर तो निर्विकार

मित्र जसजसा होत जाईल शत्रू, तसे तुम्ही काय कराल?

मित्र ओळख नाकारेल.... दुखावले जाल, पण मग घ्याल समजुतीने.
मित्र आठवण नाकारेल एकांतातही... हराल तुम्ही समग्रतेने.
मित्र जाऊ लागेल क्षितिजापार, तुम्ही हसाल नुसते

आणि क्षितिजापार असलेल्या लाटेवर, मित्रावर
उतरेल दिवस-रात्रीच्या पलीकडची सायंकाळ,
आणि मग जेह्वा मित्र हलेल, हरेल,
बोलावेल तुम्हालां पुन्हा एकदा,
कवळेल तुम्हांला पुन्हा एकदा,
अशा बोलीत, की जणू हीच तुमची पहिली भेट!

.... तेह्वां काय कराल?

सांगा! तेव्हां काय कराल?

( ही कविता मी २००७ च्या साधना दिवाळी अंकात वाचली आहे. डॉ. आशुतोष जावडेकर यांची कविता आहे.)

गूढ अशा एकांती

या गूढ अशा एकांती,
मज तुझी आठवण येते,
मी परत एकदा जगते,
क्षण सारे तुझे न माझे

नजरेची जगलो भाषा,
स्पर्शांची होती गाणी,
ती अनवट वेडी धुंद,
जी अजून वेढूनी राही

तू दूर आता, जणू स्वप्न,
माझ्या आकाशीचा चंद्र,
जो असून गवसत नाही,
तरी संगत अक्षय आहे

या गूढ अशा एकांती,
मग तुझी आठवण येते......

November 30, 2007

जगणं

मिटवून टाकलेत आता आवेग सारे
मनही बांधून ठेवलय कधीच बासनात
अनोळखी हसू फुललेल असत ओठीं
आजकाल यालाच ना जगणं म्हणतात?

आठव

जरी विरले क्षण वार्‍यावरती
सोबतीचे तुझ्या न माझ्या,
आठवही हा तुझ्या स्मृतींचा,
सावरतो मज क्षणाक्षणाला....

आनंदसोहळा

मन उधाण उधाण होते,
उन्मुक्त धुंद भिरभिरते,
नि:संग अशा जाणिवा,
गात्रीं परिमल दरवळतो,
मंतरल्या क्षणी एखाद्या,
आनंदसोहळा फुलतो.....

November 17, 2007

विसूनाना उवाच..... (१)

नमस्कार मंडळी! मी काय सांगतोय, ऐकता का जरा??

हो, पण त्या आधी, माझी ओळख.... मी विश्वास कुलकर्णी, पण आता वयामानानुसार, विसूनाऽऽऽऽना, होऽऽऽ!! आणि मंडळी, विश्वास वरून विसूनाना या स्थित्यंतरापर्यंत यायला हे केस काळ्यांचे पांढरे झालेत आणि तसाच अनुभव ही जमलाय गाठीशी, म्हणून सांगतोय बापडा...... ऐकायच तर ऐका, उपयोगच होईल!! तर, अस ऐकतोय की लवकरच लग्नाच्या बेडीत अडकायची स्वप्न बघताय आपण?? ठीकाय. तर मग ऐकाच माझे अनुभवाचे बोल एकदा!

तर मित्रांनो, मी ही कधी तरूण होतोच की..... आणि आमच्या वेळचा तो काळ!! अहाहा, काय आठवणी सांगाव्या तुम्हांला!! सारा काळच मोठा मंतरलेला होता बघा..... तेव्हाची स्वस्ताई, भोळे भाबडे, तत्वनिष्ठ लोक, निवांत वावरणार जग... जमानाच वेगळा हो, आतासारख काहीच नाही. तर काय सांगत होतो, माझा तरूणपणीचा काळ! आणि ती भावगीतं, त्या भावगीतांच्या संगतीन आम्ही प्रेम केली, लग्न केली...... तर एक गाण होत बरका, मला अगदी आवडायच बरका, म्हणजे अस पहा, की, या गाण्यांतून ना, अगदी मला आमच्या हिच्याविषयी तेह्वा काय वाटायच ते अगदी व्यवस्थित व्यक्त व्हायच हो, नाही तर मला काय जमणार होते दगड धोंडे??

म्हणजे अस पहा, की ही अशी गाणी असतात ना, ती अगदी तुमच मन उघड करून दाखवतात हो, मनातल्या भावना बोलून दाखवतात अगदी, आपल्यासाठीच लिहिली आहेत की काय अस वाटाव ना इतकी फ़िट्टं असतात हो ती आपल्या सिच्युएशनसाठी!! मग आपण एकटे असू वा दुकटे!! असो.

तर सांगायचा मुद्दा काय, तर, सुरुवातीला ना, हे असच होत प्रत्येकालाच, अगदी एकशे दहा टक्के खात्रीने सांगतो!! अशी ही एक व्यक्ती तुम्हाला एकदम आवडायला लागते, इतकी ओढ लागते ह्या व्यक्तीची, जीव नुसता वेडापिसा व्हायचाच बाकी राहतो की!! आणि तुम्ही पण या एकाच व्यक्तीसाठी काहीही करायला तयार होता एकदम, अगदी बारा रेड्यांच बळच येत तुम्हांला!! मनाशी अगदी चंगच बांधता तुम्ही, की या व्यक्तीला अगदी सुखी करायचच!! दुसर काही नाही, भावगीत जगत असतो हो तुम्ही आणि आम्ही!! इतर वेळी स्वत:साठी पण जितकी तसदी घेणार नाही ना, तेवढी, आणि, त्यापलिकडेही तसदी घ्यायला तयार असता मग तुम्ही, आणि ते ही कोणीही काहीही न सांगता, आता बोला!! नाहीतर बसल्या जागेवरून पण हलायला नको अशी स्थिती असते प्रत्येकाची, काय बरोबर ना? हॅ, हॅ हॅ!! उगाच का बसलोय इथे सांगायला, आम्ही पण गेलोय की यातून...

हंऽऽऽऽ!! दर वेळेस मदार्‍याचा तोच खेळ आहे, दुसर काय!! तर सांगत काय होतो, लग्नाचे सुरुवातीचे दिवस म्हणजे स्वप्न हो, निव्वळ स्वप्न!! आणि मग तुम्हा दोघांना वाटत असत, की आयुष्य अस स्वप्नातच जगायचय म्हणून.

आणि मग अचानक एके दिवशी बदल घडायला सुरुवात होते, अगदी अचानकच, आणि सगळ्यांत त्रासदायक काय असेल ना, तर तुम्हांला स्वत:लाही ते उमजत पण नाही अगदी सुरुवातीला. म्हणजे अस बघा, सुरुवातीच्या काळात तुम्ही ज्या अगदी छोट्या, छोट्या गोष्टी करता ना तिच्याचसाठी म्हणून, त्या आता तुम्ही करेनासे होता!! एकदम ठप्पच होऊन जात ते!! अचानकच!! निव्वळ वेडेपणा, आणि वेळेची बरबादी असले काही बाही विचार येऊ लागतात हो मनात!! पण, सांगणार तरी कोणाला?? आणि, अगदी लक्षात ठेवा या म्हातार्‍याच हे वाक्य, का थांबतो आपण? तर, करू शकत नाही म्हणून नव्हे, तर आता इच्छाच रहात नाही म्हणून. लहानसच उदाहरण देतो हो, लग्गेच...... पटतय का नाही ते सांगा, मात्र खर सांगा!!

आमच्या वेळी बर का, माझ नवीनच लग्न झाल होत, तेह्वा, न विसरता मी हिच्या साठी गजरा घेऊन जायचो. आणि तो कसा न्यायचा? तर कोणालाही संशय येऊ नये असा, त्यामुळे, मग देवाला फ़ुलं, आई, बहीण यांना वेण्या, म्हणून मग हिलाही नेता येत असे!! पण खर काय ते फ़क्त आम्हा दोघांनाच ठाऊक होत तेह्वा!! आमच गुपितच की अगदी! अगदी न चुकता हा परिपाठ मी पार पाडत असे. मोगर्‍याचा गंध कसा अगदी अजूनही त्या दिवसांची आठवण ताजी करतो बघा.... कित्तीही काम असो, काही असो, मी घरी जाताना एवढ करायचोच, सगळेच खुष! एकाच कृत्याने कितीतरी पक्षी!! तुम्ही सरळ सरळ फ़ुलच देता हो आता, मग काय ते तुमच्या व्हॅलेंटाईन डेला पन्नास रुपयांना पडल तरी तेवढ करताच ना?? तसच होत ते आमच पण, हॅ, हॅ, हॅ...

आणि मग कळलच नाही की कधी बंद झालो फ़ुलं न्यायचा!! एके दिवशी कधीतरी बंदच झाला बघा तो सिलसिला! आता तर तिलाच सांगतो, देवापासून तिच्यापर्यंत सगळ्यांसाठी फ़ुलं आणायला, अगदी फ़ुलदाणीतली पण! आता बोला!!!

लग्नाच्या पहिल्या वर्षात बर का, मी हिच्यासाठी काही पण करायला अगदी दोन्ही पायांवर तयार असायचो, बाजारात जायचय? चला... इकडे जायचय, चला..... तिकडे जायचय, चला.... हापिसातून आल्यावर जायचय, हरकत नाही!! चला..... बंदा हाजिरच असायचा!! अगदी १० वेळा पर्वती चढा, आणि मग बाजारात जाऊया म्हणाली असती ना, तरी ते पण या पठ्ठ्याने केल असत तेव्हा, म्हणजे बघा!! होऽऽऽ!! पण आता चार जिने उतरून समोरच्या वाण्याकडे जा म्हणाली ना, तरी जीव कावतो हो अगदी!! हिला ना, हे सांगितल तरी पटत नाही! आता, गर्दी वाढ्लेय, लोकं इतकी भरधाव वाहन हाकत असतात…. ह्या सगळ्यात आता माझा म्हातार्‍याचा जीव गलबलतो की, पण आमच्या हिला काय वाटत, माहीतेय?? की आळशी झालोय! मनातल्या मनात, खायला काळ अन भुईला भार म्हणते, ते ऐकतो ना मी!! आता, जरा वयापरत्वे सुटलोय, तर लगेच भार झालोय की काय?? पण नाही!! पार बदलतात हो या बायका!! काय कळतच नाही अगदी बघा हे गौडबंगाल मला……

तेव्हा कशी, अगदी, डोळ्यांत प्राण आणून माझी वाट बघायची हो! हापिसातून आल्या आल्या चहा, खायला तयार, आपण स्वत: टीप टाप, काय बर वाटायच म्हणून सांगू!! आणि आता?? मारकी म्हैस परवडली की!! आणि तिच्यातच बदल झाला, का माझे डोळेच बदलले हेच मला अजून उमगलेल नाही बघा!! तिचं पण असच झाल असणार कायतरी…… कळतच नाही हो, लग्नाच्या पाचव्या की पंधराव्या वर्षापासून बदलाला सुरुवात होते ती, पण होते खरी, अगदी तुमच्या पण होणार बघा!! त्याची जरा तयारी आहे का पहा मनाची आधी, आणि मगच ह्या भानगडीत पडा बुवा!!

म्हणजे, अस बघा…….. आता इथे परत एक उदाहरण देतो हं... आता बघा, समजा, मला येऊन जर कोणी सांगितल, की विसूनाना, अहो, आशाकाकू – म्हणजे आमची ही हो – कश्याबश्या, चार -चार पिशव्या, दोन हातांत चार, चार अश्या हां – तर, अश्या घेऊन येताहेत घराकडे, अन दमलेल्या दिसतायेत….. आणि त्यांनी तुम्हाला जरा मदतीला बोलावलेय… तर मी काय करेन?? ज़र का हे तेह्वा झाले असते, तर पहिली गोष्ट, म्हणजे तिला एकटीला जाऊ दिले नसते, बर, समजा, गेलीच असती, तरी, मी, असा निरोप आल्याबरोबर लग्गेच धावलो असतो आणि सगळ्या पिशव्यांसकट तिलाही अगदी जपून घेऊन आलो असतो…. पण आता??

आधी निरोप आणलेल्यालाच विचारेन, की बाबा रे, तू जर होतास तिकडे, आणि इथे आलाच आहेस निरोप द्यायला, तर येताना तूच का नाही ओझे वाहिलेस सगळे?? किंवा मग माझ्या मुलाला नाही तर मुलीला सांगेन, जा, तिकडे जाऊन आईला मदत कर!! हो, रिक्षातूनच घेऊन ये म्हणून सांगेन मात्र. आताशा आमच्या हिला पण होत नाही खर तर, पण वय झालय हे स्वत:, तिनं मनातून मान्य नको का करायला?? असो, तो एक वेगळाच विषय आहे निरुपणासाठी!! ते राहूंद्यात सध्ध्या.....

सुरुवातीला मारे अगदी एकमेकांसाठीच डोळे वगैरे असतात तुम्हांला, अगदी डोळ्यांत मावत नाही तुमचा सहचर, अन नंतर त्याच्या चुकांशिवाय काही मावत नाही!! नक्की नाही सांगता येणार की लग्नाच्या पाचव्या का पंधराव्या वर्षापासून हे अस व्हायला लागत ते, पण होत खर अस मंडळी!! मग ते बाहेर जाण वगैरे शिक्षाच वाटायला लागते अगदी, पण सांगता कोणाला?? सुरुवातीच्या गुलाबी कालखंडात डोक गहाण ठेवून केलेल्या चुका भोवत असतात!! वाघ पण खाणारच आणि वाघोबा पण तेच करणार की!! कशालाच काही इलाज रहात नाही, हेच खरे असावे! मनातल्या मनात प्रत्येक शहाणा, पण परिस्थितीने वेडा बनलेला पुरुष प्राणी, रामदास स्वामींचे मनातल्या मनात अगदी कौतुकच करत असेल पहा!!

तर काय सांगत होतो... हंऽऽ,खर तर काहीही अन काहीपण शिक्षाच व्हायला लागते अगदी, पण सांगता कोणाला?? आणि वाद विवादांनी हळूहळू शिरकाव केलेलाच असतो संसारात, आणि हे जे लेखक मंडळी लिहितात ना, की थोडी फ़ार नोक झोक असल्याशिवाय संसाराची मजा नाही वगैरे, ते म्हणजे बर का, कोल्ह्याला द्राक्ष आंबट किंवा तत्सम प्रकार आहे अगदी!! होऽऽऽऽऽ, अगदी एकशे एक टक्के!! नक्कीच त्यांचं स्वत:च, त्यांच्या स्वत:च्याच घरात काहीऽऽऽही चालत नसणार!! नाहीतर, तुम्हींच मला सांगा, कोण सुखासुखी ह्या वादविवादांबद्दल इतक चांगल बोलेल?? करा विचार तुम्हींच!! मग आपल उलटच बोलतात, झाल!! आणि एक खोट हजारदा सांगितल की खर वाटायला लागत, त्यातला प्रकार झालाय हे वाक्य म्हणजे!! फार लांब कशाला जायला हवं, तुमच्याच घरी, तुमच्याच पिताश्रींना विचारा, तुमच्या मातोश्रींशी वाद घालायची ते किती उत्कंठेने वाट बघत असतात ते!!

तर सांगायचा मुद्दा काय मंडळी, तुम्हांला वाटत तस काऽऽऽऽही आयुष्यभर हवेत तरंगायला मिळत नाही बर!! जमिनीवर जितक्या लवकर याल, तितक बरच! त्याची तयारी असेल, तर मारा उडी, होऊन जाऊंद्यात, काय??

पण एवढ असल ना तरी तुम्हांला म्हणूनच सांगतो होऽऽऽ, अस वाटत कधी कधी आताशा, की पूर्वीपेक्षा मला जरा अंमळ जास्तच माया वाटते हो हिच्याबद्दल… आता आहे जरा तोंडाने फटकळ, अन करते थोडी आदळ आपट, पण तरीही घराच घरपण टिकलय हो आमच्या हिच्यामुळे... नक्की कधी जाणवायला लागलय हे, ते नाही सांगता येणार। म्हणजे, लग्नानंतरच्या पाचव्या का पंधराव्या वर्षी लक्षात आल, ते नाही ठाऊक, पण आलय खर!

कस आहे मंडळी, तराजूच पारड कस एकदा इकडे न एकदा तिकडे, तसच काहीस असत पहा, मधला काटा समतोल आहे ना, ह्या कडे लक्ष द्याव लागत सतत, एवढच. तेवढा समतोल सांभाळलात की मग सगळ काही ठिकठाक होऊन जात, हेच खर!

समाप्त.

November 16, 2007

मृगजळ

शब्दांचे सांडती धबधबे,
रक्तास जिव्हाळा नाही
नात्यांचे मृगजळी फ़ुलोरे,
विश्राम जिवाला नाही...

November 7, 2007

डोझम्माचे बारसे

बंगळुरूला नवीनच आल्यावेळी इतक एकट वाटायच.. इथे नोकरी मिळाली आणि आमच पार्सल नव्या ऑफ़िसला भोज्जा करून राणीच्या देशात जायला विमानात बसल देखील!! बंगळुरुला जातेय म्हणेपर्यंत एकदम साता समुद्रापारच...

... आणि तिथल्या वास्तव्यानंतर परत एकदा बंगळुरुला येण झाल. तरी, ब्रिटनला जाण्याआधी साताठ दिवस बंगळुरुमधे राहिले होते. लवकर सकाळी ऑफ़िसला पळायचे अन उशीरा घरी... बर, मधे आठच दिवस होते म्हणून कंपनीने रहायची सोय केलेली होती. कारण राणीच्या देशात बरेच दिवस ठिय्या असणार होता, मग उगाच इथे मी घर भाड्याने घेऊन रिकाम्या घराचे भाडे भरणार नाही असे सांगितले होते कंपनीला आधीच!! पुणेरीपणा कामी येतो तो असा!! ते असो. पुणेरीपणा हा स्वतंत्र लेखनाचा विषय होईल!! ते नंतर.

तर तेह्वा, बंगळुरूमधे इतके सारे अनोळखी, अन रोज रात्री घरी जाताना इतका बदाबदा पाऊस कोसळायचा, की रस्त्यांच अनोळखी रुप अजूनच अनोळखी होऊन जायच... इतकी अफ़ाट तुंबलेली रहदारी असायची की खोलीवर पोहोचेपर्यंत, खूपच उशीर व्हायचा, मग कुठल जेवण अन कसल काय... इथे पाऊस पडायचा अन तिथे माझ्या डोळ्यातून बर्‍याचदा धारा... त्यामुळे एका अर्थी ब्रिटन मधे जाणार हे बरेच वाटले. सगळी सोय तर केलेलीच असते, रहायची, ऑफ़िसला ये जा करण्याची आणि आपापल्या टीमचे कलीग्ज असतातच. सगळेच घरच्या आठवणीने व्याकुळलेले.... त्यामुळे असेल, पण एकमेकांना अगदी सांभाळून घेत असतात. कालांतराने तिथलं काम संपल आणि परत एकदा बंगळुरुचा विमानतळ दिसला.
एव्हाना, रहायच्या जागेचा प्रश्न सुटला होता। लवकरात लवकर ऑफ़िसने दिलेल्या जागेतून स्वत:च्या भाड्याच्या घरात मुक्काम हलवला. खरतर त्या इमारतीच बांधकाम थोडस राहिलच होत तेह्वा, पण, तरीही... खर तर घर बघितल आणि एकदम आवडलच!! अजून एक कुटुंब ही होत सोबतीला, म्हटल, चला हरकत नाही!! पण कधी कधी खूप कंटाळाही यायचा. किराणा आणि एक बेकरी घराजवळच होती म्हणून बर. पटकन काही हव असल तर जाउन आणायला वगैरे. तशी सोय लागली होती आता।

एके दिवशी अशीच नेहमीप्रमाणे, काही वाणसामान आणायला गेले होते, अन पहिल्यांदा ती दिसली. एकतर कुत्रा हा प्राणी फक्त लाड करायच्या योग्यतेचा आहे हे माझ मत!! मग तो पाळलेला असो वा भटका. तशात ही बया तर इतकी गोजीरवाणी होती, की काय सांगू!! मी तर सपशेल प्रेमातच पडले तिच्या!! अशी सोनेरी , सोनेरी रंगाची स्वच्छ फ़र आणि एखादी इंग्लिश मड्डम काय नजाकतीत स्कार्फ घेईल, अश्या पद्धतीने, गळ्याभोवती पांढरा शुभ्र पट्टा. काळे काळे डोळे, अगदी बोलके आणि लुकलुकणारे. म्हटल आता बोलावं, तर पंचाईत!! हिला मराठी समजेल का??

तरी म्हटलच तिला, काय ग सोने, कशी आहेस ग? आणि चक्क आली की बया शेपटी हलवत!! मग काय, दोस्ती जमायला कितीसा उशीर? पण मुळातच ना, बंगळुरुमधले कुत्रे जरा आळशीच, त्याला ही राणी तरी कशी काय अपवाद असणार? सदानकदा आपली झोपलेलीच असायची बया!! मीच आपली अगदी तोंडापाशी नेऊन खाण ठेवायची, खा आता तरी! बाईसाहेब, माझ्यावर उपकार केल्यासारख खायच्या। परत एक आळसावलेली नजर माझ्याकडे टाकून निद्रादेवीची आराधना सुरुच. एव्हाना इमारतीत राहण्यासाठी शेजारी आले होते, आणि ह्या बयेशी माझ्या गप्पा ऐकून हसायचे कधी कधी. मनेका गांधी इथे लक्ष देईल का जरा?? काय पण लोक असतात!! असो.

आणि मग एक दिवस बया चक्क अवघडलेल्या चालीने आणि बाळं भरल्या पोटाने हजर की!! तशी आधी, झोपत नसली की खूप खेळायची माझ्या बरोबर। अंगावर उड्या काय, पायातून मधूनच नाचायच काय अन असच बरच काय काय.... ऑफ़िसला जाताना ठराविक अंतरावर सोडायला यायची अन परत जेह्वा मी येत असे, तेह्वा एका ठराविक जागी बसून माझी वाट पहायची. मग जरा अंगावर उड्या अन मग इमारतीच्या खालच्या गेटपर्यंत सोडायला यायची. रिकाम्या अंधारभरल्या घरात शिरण पण सुखावह करून टाकल होत बयेन. मग गरोदर झाली तशी, अवखळपणा ही कमी झाला. मग, अगदी जबाबदार व्यक्तीप्रमाणे मला सोबत करत असे.

आणि मग एक दिवस आली की परत एकदा समोर, दोन छोटे छोटे लुटलुटणारे गोंडस गोळे घेऊन!! भलतीच धमाल मग!! बया आपली सतत पहुडलेली, पडूनच त्यांच्यावर लक्ष ठेवण वगैरे... बच्चे कंपनी पण अगदी आईचाच कित्ता गिरवत!! दोनच पिल्ले होती ( मैं एक, मेरे दो, असा विचार केला होता वाट्ट तिने!! ) त्यामुळे त्यांना दूध पण भरपेट मिळायचे, मग काय, दुदू प्या अन ताणून द्या हाच कार्यक्रम! तर आता परिवारात भर पडलेली असल्याने, प्रत्येकाला स्वतंत्र नाव, आयडेंटीटी असणे आवश्यक झाले होते!! इतके दिवस, हे चोचले नसले तरी चालत होते, मी आणि बयाच होतो फक्त। पण आता तसे नव्हते ना... आणि आता बया आई पण झाली होती ना॥ मग तसेच साजरे नाव नको का? आणि एकदम तिच्याच सततच्या डुलकण्याच्या सवयीवरून एक नाव सुचले, डोझम्मा!!

आणि असे आमच्या डोझम्माचे तिच्या लेकरांसोबतच बारसे झाले!! लेकरांची नावे सांगू म्हणताय? डोझी, हा बच्चा अन डोझुली, ही बच्चुली!!

आहे की नाही गंम्मत??

आता यांच्या गमती जमती अन डोझम्माचे आईपण परत कधी तरी.

November 3, 2007

ओळखा बर माझ घर


ते माझे घर :) ओळखा बर कुठले ते :)

October 29, 2007

शब्द

मौन असूनही तुझा
शब्द वेल्हाळ वेल्हाळ
वेड्या नजरेची साद
जीव माझा हा घायाळ

October 28, 2007

काठावरून निरखलेला कामाठीपुरा

दचकायला होत ना? एक मध्यमवर्गीय घरातल्या व्यक्तीकडून, त्यातल्या त्यात स्त्रीकडून/ मुलीकडून हा शब्द ऐकला तरी आजूबाजूच्या भुवया लगेच उंचावतात!! या शब्दाचा उच्चार करण म्हणजे देखील पाप जणू.... तुमच्या आमच्या मध्यमवर्गीय आयुष्यात या शब्दाला जागा नसते, जणू काही हे जग अस्तित्वातच नसत आपल्यासाठी. तर, अश्याच मध्यमवर्गीय गर्दीतली आणि बर्‍यापैकी तशीच मानसिकता असलेली मी एक. मुंबईमधेच, कामाठीपुरा म्हणून एक भाग, वसाहत आहे हेच मला माहीत नव्हत. याबाबत मी पूर्ण अनभिज्ञ होते, आणि मग एके दिवशी अचानक कामाठीपुरा माझ्यासमोर उलगडला, उलगडला कसला, अंगावरच आला एकदम...

काही वर्षांपूर्वी, काही वैयक्तिक कामांसाठी, काही महिने तरी मुंबईमधे फ़ोर्टला सतत भेट द्यावी लागणार, हे स्पष्ट झाल आणि पोटात पहिला गोळा तिथेच आला! मुंबईच्या अफ़ाट बिनचेहर्‍याच्या गर्दीची मला नेहमीच धास्ती वाटते, सहनच होत नाही ती गर्दी मला. नेहमीच धावत पळत असणारी माणस बघूनच मला गुदमरायला होत आणि आता त्याच गर्दीचा एक नगण्य भाग बनून मला त्यांच्यामधेच वावरायच होत. एक बर होत की रोजची कसरत असणार नवह्ती. मधून मधून सलग, पुण्यात परतायला पण मिळणार होत आणि मुंबईच्या मानाने निवांत अस आयुष्य पण जगायला मिळणार होत. तेवढच बर वाटायच. सात समुद्रापार जाऊन देखील पुण्याची ओढ आणि थोडाफार पुणेरीपणा काही सुटत नाही!! मानाची बिरूद मिरवायला कोणाला आवडत नाही म्हणा!!

म्हणता, म्हणता, मुंबईलाही आपल म्हणायचे दिवस उजाडले आणि, मनात बरीच धाकधूक घेऊन, मी मुंबईत पोहोचले.

नशिबाने, मुंबईमधे नातेवाईक आहेत. मी मावशीकडेच राहणार होते. तिच्या घरापासून लोकल स्टेशन आणि बेस्टचा डेपो, जवळच आहेत. एक दिवस सोबत बरोबर घेऊन , लोकलची आणि पर्यायाने लोकांची गडबड, धांदल बघूनच लक्षात आले की हे काही आपल्याला झेपणारे नाही, आपल्यासाठी बसच बरी. मी बसच्या पहिल्या स्टॉपलाच चढणार होते, त्यामुळे गर्दी वगैरेची चिंता नव्हती, गंतव्य स्थानाच्या बर्‍यापैकी दारातच उतरू शकले असते, त्यामुले ती ही चिंता राहिली नव्हती. मुंबईमधे जर आधी कधीच वावरला नसाल आणि एकदम असे फ़िरायला लागले, तर मी काय म्हणते आहे ते लक्षात येईल, निदान मला तरी सुरुवातीला खूपच गोंधळल्यासारखे वाटत असे. तर पहिले दोन तीन दिवस मामाने बरोबर यायचे ठरवले. त्याच्या बरोबर गप्पांमधे प्रवासात वेळ कसा जायचा समजत नसे, बाहेरची गर्दी, रस्ता, कशाकडेच फ़ारसे लक्ष न देता, आम्ही खूप गप्पा मारत असू. बरे, तो बरोबर असल्याने मी ही निर्धास्त.

मग, दोन तीन दिवसांनी मी एकटेच जायचे ठरवले, रोज रोज मामाला तरी कुठे जमणार होते माझ्या बरोबर यायला? त्यालाही त्याचे घड्याळाच्या काट्यांवर पळणारे आयुष्य होतेच की. आता इतका आत्मविश्वास नक्कीच आला होता, कि एकटी जाऊ येऊ शकेन, आणि बरोबर घरच्यांचा फ़ोन नंबर होताच. पुस्तक पण घेतले होते वाचायला बरोबर. पुस्तक घेऊन गेले की कुठला ही प्रवास कंटाळवाणा होत नाही, त्यामुळे प्रवासात एक वेळ तिकिट विसरेन, पण पुस्तक नाही!! पहिले तीन चार दिवस, बसमधे चढून एकदा तिकीट काढल की मी पुस्तकात डोके खूपसून वाचत बसत असे. साधारण फ़ोर्टचा भाग लागला, की कंडक्टर ओरडून सांगतच असे, त्यामुळे तशी काळजी नसे. आणि एक दिवस असच वाचत बसलेले असताना, बसच्या बाहेर खूप गलका ऐकयला आला अन, वाचनाच्या तंद्रीतून एकदम जागी झाले.

पहाते तो काय, समोरचा माहौल इतका वेगळा होता... साधारण मध्यमवर्गीय किंवा अतिशय उच्चभ्रू वातावरणापेक्षा अतिशय वेगळ, भसकन अंगावर येईल अस वातावरण वाटल मला ते त्या वेळी.

पहिली पाच दहा मिनिट केवळ अवाक होऊन बसच्या खिडकीतून बाहेर बघण्यातच गेली!! आणि एकदम लक्षात आल, ही वेश्या वस्ती!! तेवढयात पाटीही दिसली लहानशी, कामाठीपुरा. बस, येवढच लिहिलेल. कदाचित, ज्यांना इथे यायची गरज पडते, त्यांच्या साठी पुरेस असाव तेवढच. बस वेश्या वस्तीतून जाते आहे, लक्षात आल, आणि उगीचच माझच मन कसनुस झाल! म्हणजे रोज बस इथून जात होती?? आणि आपल्या काहीच नाही लक्षात आल?? मला खरच वाटेना.... नंतर किती तरी वेळ माझ्या मनातून ते वातावरण पुसलच जात नव्हत. विदारक हा शब्द ऐकला होता, पण विदारक शब्दाचा अर्थ त्या दिवशी प्रत्यक्ष पाहिला. अतिशय सुन्न करून टाकणारा असा तो अनुभव होता....

तेह्वासुध्द्धा, पाहताक्षणी जाणवल, ते अतिशय भकास वातावरण, आणि तसेच उदास चेहरे. रस्त्यातली वर्दळही तशीच. कोणाची दखल न घेता, अलिप्त आणि मख्ख देहबोली घेऊन जगणारी, आपल्या आपल्या आयुष्याचे भार सांभाळणारी अन ओढणारी, दैन्य पांघरलेली गर्दी. अन त्यानंतर बसच्या बाहेर पहायच धाडस उरलच नाही त्या दिवशी. परत एकदा मी पुस्तकात डोक खुपसल आणि तशीच बसून राहिले. फ़ोर्ट आल, तस कंडक्टरने ओरडून सूचना दिली अन, मी तंद्रीतून जागी झाले!! इतका वेळ मी एकाच पानावर डोळे खिळवून बसले होते? लक्षातच नाही आल! एक प्रकारचा सुन्नपणा मला वेढून राहिला होता.... त्यातल्यात्यात एवढेच बरे होते, की परत जाताना मी जी बस घेत होते, ती कामाठी पुर्‍यातून जात नसे. कदाचित दुसरी बस मिळत असावी. माझा शेवटचा थांबा असल्याने, त्या थांब्याच्या नावाचा फ़लक बसवर लावलेला दिसला की मी जास्त विचार न करता बसमधे चढत असे!! काम संपवून घरी पोचले तरी, डोक्यातून विषय जात नव्हता... उद्या परत बस तिथूनच जाणार हे जाणवून उगाचच एक दडपण आले होते मनावर.

... आणि परत एकदा, दुसर्‍या दिवशी मी त्याच बसमधे चढले. आज पहिल्यांदाच मी बसमधे वाचत नव्हते. परत एकदा बस कामाठी पुर्‍याच्या रस्त्याला लागली, पण आज मी सारे पाहणार होते.. मनात थोडी भीती, थोडी जिज्ञासा, कुतूहल... हळू हळू नजर एकेक तपशील टिपत गेली... गलिच्छ रस्ता, ठिकठिकाणी फ़ेकलेला कचरा, सांडपाणी, त्यातच खाण्याच्या पदार्थाचे ठेले मांडलेले विक्रेते, चहावाले, इतर दुकाने, विक्रेते, दुकानातली गिर्‍हाईके. मला सगळयात आश्चर्य वाटत होते ते म्हणजे त्यांच्या तिथल्या सराईत वावरण्याचे. अर्थात, त्यांच्या साठी ते रोजचेच जगणे होते, अन रोज मरे त्याला कोण रडे, असेच होत असावे त्यांचे.

रोज सकाळच्या वेळी तिथल्या, देह विक्रयाचा व्यवसाय करणार्‍या स्त्रिया, रस्त्यावर किंवा त्यांच्या खोल्यांच्या दारांत बसलेल्या असायच्या. काही एकमेकींशी बोलत असायच्या, काही जणी उगाच थकून भागून बसलेल्या. सगळे काही स्वीकारल्या सारख्या. तर काही उगाच कुठे तरी भकास नजरेने पहात हरवलेल्या.. सार्‍याच थकलेल्या, भागलेल्या.. आणि काही आक्रस्ताळेपणे झगडताना दिसायच्या. नक्की कोणाशी भांडत असायच्या कोण जाणे? समोरच्या व्यक्तीशी? नशीबाशी? नियतीशी? दैवाशी?? की देवाशी?? या स्त्रियांना बघणे, त्यांच निरीक्षण करणे हा एक कडवट अनुभव होता माझ्यासाठी. का म्हणून यांच्या नशिबात हे दान पडल होत?

इथे येताना कितीजणींना आपण कुठे आणि का चाललोय ते माहीत असेल? अजाणत्या वयात काय अनुभव घेतले असतील? मनावर ओरखडे उठले असतीलच ना? नक्कीच.. आणि मग कदाचित एक दिवस सार काही मनाविरुद्ध अंगवळणी पडल असेल, पाडून घ्याव लागल असेल.. काहींनी कळत्या वयात, नाइलाज म्हणून हे अग्निदिव्य स्वीकारल असेल, घरच्यांवर मायेची पाखर घालण्यासाठी स्वत: अंतर्बाह्य जळत असतील, आणि ही पाखर घालतानाही आपल अस्तित्व दृष्टीआड ठेवून. घरचे लोकही कदाचित दृष्टीआड सृष्टी म्हणत असतील का?? कधीकधी माणसाचे नाइलाज किती पराकोटीचे असू शकतात..... सारच अर्तक्य! काहींची स्वप्नं चुरगाळली गेली असतील, ज्यांच्या खांद्यावर विश्वासाने मान टाकावी अश्याच कोणी नवर्‍याने, प्रियकराने, भावाने, नात्यातल्या काका, मामानेच या लेकी बाळींना इथे आणून इथल्या गिधाडंपुढे फेकून दिल असेल! या लेकी बाळी ही कधी काळी निरागसपणे कुठे तरी, आपापल्या घरच्या अंगणात बागडल्या असतील, काहींनी परकराच्या ओच्यात फुल, पान जमवली असतील, काहींनी भातुकलीचे संसार मांडले असतील, सख्यांबरोबर साईसुट्यो खेळल्या असतील.. घरच अठरा विश्व दारिद्र्य आणि झोपडीतला अंधार देखील यांच्या स्वच्छ हसण्याने उजळून निघाला असेल..... आज तस हसू फ़ुलेल कधी यांच्या चेहर्‍यावर? आयुष्यात परत या स्त्रियांचा कधी, कोणावर विश्वास बसेल??

आणि रस्त्यालगतच बागडणारी या माउल्यांची लहान मुल?? त्यांच्या आठवणी आजही मला अस्वस्थ करतात!! त्या निरागस, निर्व्याज लहानग्यांना रस्त्यावर अजाणता बागडताना पाहून खर तर मला उदास, अस्वस्थ व्हायला झाल…। काय भविष्य आहे यांच, हा प्रश्न सतत मनत आल्याशिवाय राहिला नाही… यातल्या मुली असतील, त्यांच हे हसू असच कायम राहील?? का आसूंत बदलेल? या मुलांच निरागस मन निब्बर व्हायला किती लवकर सुरुवात होत असेल! त्यांना देखील याच खातेर्‍यात उडी घ्यावी लागणार आहे का? काय वाटत असेल तिथे व्यवसाय करणार्‍या आईला, लेक पोटी आली म्हणून? काय विचार करत असतील ह्या आया आपल्या लेकरांच्या भवितव्याचा? असा काही विचार करायची मुभा नियती देत असेल त्यांना ?? सगळीच परिस्थिती, दाटला अंधार अशी.....

तिथल्या ह्या स्त्रियांच्या खोल्यांकडे बघवत नव्हतं, मोठया मोठया खिडक्या असणार्‍या काडेपेट्यांसारख्या, तितकीच लांबी, रुंदी असलेल्या ह्या खोल्या पाहून, कबुतरांची खुराडी सुद्धा बरी अस वाटल्या वाचून राहिल नाही. रात्रीच्या वेळेस, ह्याच काडेपेट्यांचे विलास महाल बनतात? तेव्हा, या विलास महालातली औट घटकेची रातराणी, आपल्या कच्च्या बच्च्यांना कुठे आसरा देत असेल? कोणा महाभागाची औट घटकेची सोबत करताना, तिच्या मनात काय येत असेल? मन कस आणि किती आक्रंदत असेल? असे किती मातांचे, नवतरुणींचे, अबोध बालिकांचे आक्रोश या भिंतींनी पाहिले असतील? पचवू शकल्या असतील? सकाळच्या वेळेस, या खोल्यांच्या भिंती अगदी भकास वाटायच्या, जणू काही या बायकांच्या मनातल्या मूक आक्रोशाच्या साक्षीदार होता होता, जगायच विसरून गेल्यासारख्या. सार्‍या वातावरणातच एक मृतप्राय कळा, एक उदासवाणा, अलिप्त भाव. जणू माणूसकीची जिती जागती कबर.

उगाचच एक वाक्य आठवल होत तेह्वा. स्त्री ही क्षणकालची पत्नी अन अनंतकालची माता असते.... किती वेगळ्या अर्थाने ते वाक्य तिथे साकार झाल होत!

.... अजून एक विरोधाभास पाहिला अन खूप जाणवलाही.

एक रेणुकामातेच देऊळ होत, छोटस, सुंदरस.. मनोभावे स्त्री रुपाची, आदिशक्तीची पूजा झालेली दिसत होती. देवीची मुद्रा प्रसन्न, हसरी, नजर तिच्या ह्या लेकींकडे. देवळाच्या बाहेर एक पताका लावलेली होती, त्यावर देवी सूक्तातले मंत्र ठळक अक्षरात लिहिले होते...

ll या देवी सर्वभूतेषु मातृरुपेण संस्थिता l नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम: ll

काय पाहत होती आई उघड्या डोळ्यांनी? मानवरुपातल्या स्त्रीशक्तीची, मातृरुपाची विटंबना? दैन्य, लाचारी, असहायता???

का सगळे फक्त शब्दांचे बुडबुडे केवळ???

October 19, 2007

माझे अण्णा

अण्णा म्हणजे माझे आजोबा। माझ्या वडिलांचे वडील. बालपणीचा माझा पहिला वहिला मित्र. अर्धवट कोकणी आणि मराठी बोलत असल्याने मी आजोबांना अरे तुरे च करत असे, अन त्यांना ही ते आवडायच. तर या मित्राच्या अगदी गळ्यात गळा घालून आजी, आई, बाबा, काका, आत्या, मावशी, इतर भावंड आणि बाकीच सगळ जग माझ्यावर कित्ती कित्ती अन्याय करतय हे सांगायला एकदम बर वाटायच. आणि मुख्य म्हणजे त्यांना ते पटायचही. न पटण्यासारख होतच काय म्हणा? आणि मग सर्वांना माझ्यासमोर लुटुपुटूचा जाब विचारला जायचा. ते मला खूपच आवडायच, अर्थात तेह्वा ते सार लुटुपुटूत चालायच हे कळायचच नाही, घरातली सर्वात मोठी व्यक्ती आपली बाजू घेऊन बोलते आहे, तमाम शत्रूगणाला जरब देते आहे, ह्याचच अप्रूप वाटत असे. शत्रूगण गूपचूप ऐकून घेतो आहे ह्याचा केवढा आनंद व्हायचा! नंतर भावंड आणि कधी कधी मोठी माणसं फ़िदी फ़िदी का हसायची तेच कळायच नाही तेह्वा मला!! सगळ्यात शेंडे फ़ळ असल्याचे हे असे तोटे पण होते!! पण, काहीही असल, तरी हा कार्यक्रम आठवड्यातून एक दोन वेळा व्हायचाच.

अण्णांकडे गोष्टींचा खूप साठा होता, आणि आम्हां भावंडांना जमवून गोष्टी सांगायला त्यांना खूप आवडायच पण। माझ्या लहानपणी, आम्ही एकत्र कुटुंबात रहात होतो, आजी, आजोबा, काका, काकी, माझी चुलत भावंड, आई, बाबा आणि मी. रात्रीची जेवण झाली की आम्ही भावंड, अण्णांच्या ताब्यात असायचो, आणि मग गोष्टी, गाणी, वेगवेगळी स्तोत्र यांचा खजिनाच खुला व्हायचा आमच्या साठी. घराच्या मागच्या बाजूला व्हरांडा होता, नेमकी वीज जायची आणि, चंद्र प्रकाशातल्या उजेडात अण्णा प्राण्या पक्ष्यांचे वेगवेगळे आकार करून दाखवायचे, जंगल खात्यात नोकरीला असल्याने त्यांनी जंगलांमधून भरपूर भटकंती केली होती, वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाजही काढून दाखवायचे. आम्ही पण तसे आवाज काढून बघण वगैरे ओघाने होतच होत, मे महिन्यांच्या सुट्ट्यांमधे आतेभावंडही येत असत पुण्याला, मग कल्ला करायला किती वेळ!! खूप मजा यायची!! घरातली बायका मंडळी आमच्या दंग्याला कंटाळत, पण अण्णांच्या पाठिंब्यावर हे उद्योग आम्ही बिनदिक्कत करत होतो!! ते आमच्या पैकीच एक होते.

आता वयाने जऽऽरा मोठे होते, केस पांढरे झाले होते, चालताना काठी घ्यावी लागत होती कधी कधी, म्हणून आम्हाला काहीच फ़रक पडत नव्हता। त्यांचा मोठेपणा कळण्याच ते वय नव्हत आणि त्या मोठ्या माणसाने ही कधी तो जाणवू दिला नाही.

अण्णा त्यांच्या भावंडात सर्वात मोठे। सर्व भाऊ, बहिणी मिळून आठ जण. माझे पणजोबा लवकर गेले, आणि मोठा भाऊ म्हणून सगळ्यांची जबाबदारी अण्णांवर येऊन पडली. भरीस भर म्हणून लहान वयात लग्नही झाल. माझी आज्जीही अगदी लक्ष्मीच होती. दोघांनी दोन्ही बाजूच्या खूप जणांच खूप काही केल, शिक्षण, नोकरी लावून देण, आपल्याकडे रहायला ठेवून घेण, आणि सार काही निरिच्छ भावनेने, मायेने, प्रेमाने. पुन्हा कोणासाठी काही केल तर त्याची वाच्यताही नाही कोणाकडेही. कुठूनतरी, कधीतरी कळायच... आजदेखील अण्णांची नात आहे म्हटले की जे त्यांना ओळखतात, त्यांच्या नजरेत उमटणारी आपुलकी आणि माया बघून मला अचंबा वाटतो, इतक्या मोठ्ठ्या माणसाशी आपल इतक जवळच आणि हक्काच नात होतं याबद्दल खूप अभिमान वाटतो, त्यांच नाव टिकवण्याची जबाबदारी पण वाटते.

माझ्या पुस्तकांच्या वेडाच त्यांना खूप कौतुक होत। त्यांनाही होतच ते वेड. त्यामुळे त्यांचा पुस्तकांचा संग्रह माझ्यासाठी नेहमीच खुला होता, अणि कुठलही पुस्तक हातात घ्यायला बंदी नव्हती. गडकर्‍यांची नाटक, शेक्सपिअर, श्री भगवद्गीतेवरची निरुपण, वि.स., तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, संत कबीर, सामाजिक प्रश्नांवरची पुस्तकं, कथा कादंबर्‍या, राजगोपालाचारींच रामायण, महाभारत, बा. भ, ग. दि. मा., अत्रे, गोट्या, चिंगी सारखी पुस्तक, पु. ल., चि. व्ही. जोशी...किती नाव घावी.... तेह्वापासून लागलेल वाचनाच वेड आजतागायत सोबत करतय....

पुस्तकांवरून असच आठवल। एकदा, अण्णांचे एक मित्र घरी आले होते. दोघांच्या गप्पा सुरु होत्या, मी ही तिथेच शेक्स्पिअर आणि शब्दांचे अर्थ शोधायला डिक्शनरी घेऊन जवळच बसले होते. शब्दांशी झटापट सुरुच होती. आणि एकदम ते मित्र मला म्हणाले, काय कळतय का काय वाचते आहेस ते? आणि मग अण्णांकडे वळून म्हणाले, अहो, हे काय वाचतेय ती?? एवढ्यात काय कळणार आहे तिला यातल? काहीतरी तिच्या वयाला चालेलस द्या... यावरच अण्णांच उत्तर मात्र मला अजून ही आठवत. ते म्हणाले होते, आत्ता तिला काही समजाव अशी अपेक्षाच नाही आमची, पण नकळत घडलेल हेच वाचन तिच्या जाणीवा प्रगल्भ करेल, तिला एक नजर देईल. कळत नकळत तिच शिक्षण होतय, त्याच्या आड येण्याच पाप मी कस करेन?

माझ शिक्षण अजूनही अव्व्याहत सुरुच आहे रे अण्णा...

लहानपणच्या आठवणींत रमताना, आता कळत की शिकवण्याचा अथवा उपदेशाचा आव न आणता या माणसाने आम्हा भावंडांना खूप काही शिकवल, आयुष्यभर पुरेल अन तरीही उरेल, इतक पाथेय दिल। जीवनमूल्य शिकवली, ताठ मानेन जगायला शिकवल. स्वत:वर विश्वास ठेवायला शिकवला आणि जिथे गरज पडेल तिथे प्रवाहाविरुद्ध पोहू शकू, गरज पडली तर एकट्यानही, इतकी हिम्मत दिली, ह्याहून अनमोल दुसर काय असू शकेल? आणि हे सार हसत खेळत. कसलाही आव न आणता, अगदी नकळत, भलेपणाचे संस्कार दिले. फ़ार साधी, सरळ अशी शिकवण होती त्यांची. साध्या साध्या गोष्टी सांगत. कोणाचे मिंधे राहू नका, खोट बोलू नका, कधी खर मत मांडताना, आणि स्पष्ट बोलतानाही समोरच्याला होता होईतो दुखवू नका.... साधीच, पण आजवरच्या आयुष्यात सतत उपयोगी पडलेली शिकवण. भले त्यांनी आम्हाला महागडी खेळणी आणली नसतील, शॉपिंगला नेल नसेल... याची काही गरजही नव्हती आमच्या लहानपणी. या सर्व गोष्टींपेक्षा, सर्वात महत्वाचा असा त्यांचा वेळ आमच्यासाठी कायमचाच राखीव होता.

अण्णांशी कधीही संवाद साधायला आम्हां कोणालाच कसलीच अडचण कधीच जाणवली नाही। मला तर अजूनही जाणवत नाही. माझा मित्र अजूनही माझ्या मनात ठाण मांडून बसलाय. कधी मनात कसली दुविधा आली, चल बिचल झाली, निर्णय घेताना अडल्यासारख वाटलच, तर लौकीकार्थाने माझ्या बरोबर नसलेल्या या मित्राशी मी संवाद साधते, माझ्याच मनात. त्या हृदयीचे या हृदयी केव्हाच घातले आहे, त्याची हलकेच एक उजळणी होते, डोळ्यांत नकळत उभा राहिलेला अश्रू त्यांच अस्तित्व माझ्यापुरत तरी अगदी जिवंत बनवतो. मनाला एक नवी उभारी मिळते.

थोडस भावनेच्या भरात लिहिल्यासारख वाटेल, पण माझा अण्णा, म्हणजे,

सकल चिंतामणी शरीर l जरी जाय अहंकार आशा समूळ ll
निंदा हिंसा नाही कपट देहबुद्धी l निर्मळ स्फटीक जैसा ll
मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी l येती तयापासी अवघीं जनें ll
तीर्थासी तीर्थ झाला तोची एक l मोक्ष तेणे दर्शने ll

असा होता...

मला मोक्ष मिळण्याच भाग्य कधीच लाभलय......