October 25, 2011

चरैवेति, चरैवेति.. २




सकाळी सहाला हृषिकेशहून निघालो, ते कौडीयालला खायला थांबलो. इथे प्रामुख्याने गंगेच्या प्रवाहामध्ये राफ्टींग चालते. जिथे थांबलो, ते एक छोटेसे हॉटेल होते. तसे यथातथा, पण तरीही अगदी सुबक, आपलेसे असे वाटणारे. आवडले. साधेच बांधकाम होते, पण खिडक्या मोठ्ठाल्या होत्या आणि जिथून तिथून जितका काही होता, तो सूर्यप्रकाश आत झिरपत होता. उजेड आणि स्वच्छता ह्या बेसिक गरजा भागत होत्या. झाले की! खूप आरामदायी प्रवासाची, मोठ्या ऐसपैस हॉटेल्समधून राहण्याची वगैरे ज्यांची इच्छा असेल, त्यांनी ट्रेकींग वगैरेच्या भानगडींत न पडलेलेच बरे, असे माझे मत. जोवर बेसिक गरजा भागत असतील, तोवर तरी फुसफुसायचे कारण नसते. खरं तर आपल्या गरजा आपणच वाढवून ठेवलेल्या असतात, आणि मग हळूहळू त्यांचे गुलाम व्हायचे. आमच्या ग्रूपमध्ये सहसा कोणी कुरकुरणारे नव्हते आणि कोणाच्याही अवास्तव अपेक्षा नव्हत्या, ह्याचे एक फार सुख होते. सगळेच तसे जुळवून घेणारे लोक होते. मी तर कोणत्याच अपेक्षा ठेवून ह्या प्रवासाला सुरुवात केली नव्हती, आणि एव्हाना मी आतापरेंत दिसलेल्या हिमाचल, हिमालय आणि गंगेच्या प्रेमात इतकी बुडाले होते, की मला काहीच त्रासदायक वाटत नव्हते. इश्कने फक्त गालिबच निकम्मा होतो की काय?

हृषिकेशवरुन जेह्वा पुढे निघालो होतोत, तेह्वा साहेबांनी मौलिक माहिती दिली होती, की पाईन वृक्ष, झाडी वगैरे दिसायला लागली, की आपण हिमाचलात आहोत हे ओळखावे. ती झाडी तर दिसायला सुरुवात झालीच होती. हिमाचलात प्रवेश करते झालो होतो. हिमाचलाला देवभूमी का म्हणायचे, हे हिमाचल पाहताना स्पष्ट होत जाते. आरस्पानी, मुक्त सौंदर्य जिथे तिथे उधळलेले असते. शंभर टक्के आणि थोडे कांकणभर अधिकच वरिजिनल. जराही नावाला हिणकस नाही. पाहण्यासाठी पावलापावलावर आणि नजरेच्या प्रत्येक टप्प्यात इथे इतके काही आहे, की शेवटी डोळे दुखू लागतात, मन ओसंडून जाते आणि थकते आणि आपण अंतर्मुख होत जातो, कोणाशी बोलावे वाटत नाही, काही सांगावे वाटत नाही, काही ऐकावे वाटत नाही.. बाऽस, केवळ त्या सार्‍या आसमंताचा भाग होऊन कोठेतरी शांत बसून रहावेसे वाटते. तिथे दाही दिशांत पसरलेल्या, रुजलेल्या नि:स्तब्धतेत, शांततेत हरवून जावेसे वाटते. असलेच, तर तिथे असतात, केवळ नदी, पक्षी ह्यांचे आवाज. कधीमधी वाहने जातात, पण शहरातल्यासारखे भयाण वाटत नाही. पॅं पॅं सतत हॉर्न्स कोणी वाजवत नाहीत. इतकी वर्दळच नसते माझ्यासारखीच्या कधीतरीच प्रसन होणार्‍या नशीबाने. ह्या वेळी मात्र नशीब फुल टू प्रसन्न झाले होते. लईच भारी चालले होते आतापरेंत. तर, अधून मधून येणारे हेही आवाज, निसर्गदत्त आवाजांबरोबरीने तेही आपल्यात रुजतात, आसमंताला आपल्या असण्याने थोडेफार भान देतात, पण रसभंग करत नाहीत. बाकी मग हवे तरी काय?

थोडेसे खाणे लागते हां पण! अडचण अशी आहे की व्यावहारिक जगाशी मेळ घातल्याशिवाय असे स्वप्न पूर्णपणे जगायची मुभा नसते. की कराँ... तेह्वा मग हॉटेलमध्ये जाणे ओघानेच येते. तर, म्हणून खायला थांबलो. सुरेख, चविष्ट पनीर पराठा खाल्ला. सोबत दही, लोणचे. हॉटेलचा मालक वा चालक, जो कोणी होता, तो अगत्यशील होता. पर्यटन हाच हिमाचलाचा मुख्य कणा असल्याने ही सेवा पुरवणारे इथले लोक अगत्यशील असणार, हे थोडेफार धरुन चालले तरीही, माझ्या मते, इथल्या लोकांनी अजून तरी माणूसपण जपले आहे. इथल्या माणसांशी बोलणे, संवाद साधणे फार सहजगत्या जमते, असं एकूण माझं मत झालं. अर्थात, दहा दिवसांत बरचंसं अंतर गाडीतून तोडणार्‍या माझ्या मताची ऑथेंटीसिटीही तितकीच म्हणा, पण कोणाशीही बोलायला सुरुवात केली की हसतमुखाने ती व्यक्ती बोलत असे. अगदी मनापासून. कोण हे माझा वेळ खाते आहे, कशाला बोलण्यात वेळ घालवत आहे, मला किती कामे आहेत आणि इथे मज शहाण्याचा वेळ वाया जात आहे, वगैरे असे भाव कधीच जाणवले नाहीत. चेहर्‍यावर प्रसन्नसे हसू असे, लागण व्हायलाच हवी असे. साधे, सोपे आयुष्य असले की कदाचित असे हसू त्याच्या सोबतीने मिळते की काय? की लुसलुशीत पनीर, मधुर दही अन् ताकाचा हा परिणाम म्हणायचा?

ह्या हॉटेलचा समोरचा रस्ता ओलांडला की छोटी छोटी कॉटेजेस होती, खाली जायला छोटासा रस्ता, पायर्‍या होत्या. मघा रस्त्यावर गाडी थांबली होती तेह्वाच पलिकडे गंगा वाहताना दिसली होती. लांब वाटली होती, तेह्वा लांबून का होईना, पुन्हा एकदा पाहूयात म्हणून, पायर्‍या उतरलो, आणि ही इथ्थेच अशी हातभर अंतरावरुन गंगा प्रवास करत होती. तेच जीवघेण्या सौंदर्याने नटलेले पहाड. तेच शुभ्र पाणी. तोच वेगवान प्रवाह आणि हे सारे नि:शब्दपणे अनुभवत तेच ते आम्ही. रैनाकडे पाहिले. तिचीही तीच अवस्था आणि स्वातीचीही. बरोबर ग्रूपमधले राहुल, प्राची (राहुलची बायको) आणि प्राची (राहुलची बहीण) होते, रोमिला म्हणूनही एक जण होती. ही आमच्यामध्ये एकदमच मिसफिट. ट्रेकींगमध्ये एकदम एक्स्पर्ट. तिला पाहूनच मला भयानक न्यूनगंड येत असे. फारशी बोलतही नसे कोणाशी, तेह्वा ती आम्हांला तुच्छ समजत असावी की काय, असे विचारही आम्ही केल्याचे आठवते अणि तिला जरा शिष्ट असावी का, हे लेबल कळत नकळत लावून ठेवले होते. त्या क्षणी मात्र सगळेच समोर जे काही दिसत होते, त्याने मंत्रमुग्ध झालो होतो. कॉटेजमध्ये जे कोण भाग्यवान मुक्काम ठोकत असतील, त्यांचा हेवा, हेवा वाटला.

पुन्हा एकदा गंगेचा प्रवाह आणि पहाडांना डोळ्यांत आणि मनात साठवत तिथूनही पुढे निघालो. प्रवास सुरु होता. बसमध्ये ग्रूपमधले सारेच खुलले होते. गाण्याच्या भेंड्या जोरात सुरु होत्या. खूप जुनी गाणी आठवून, आठवून म्हटली. रैना आणि दोन्ही प्राच्या, राहुल, साहेब गाणी म्हणण्यात पुढे होते. मीही त्यात घसा खरवडला मध्ये मध्ये. कधी कधी असा काही नजारा समोर यायचा, की गाणं वगैरे विसरायलाच व्हायचं मला. हे लोक तोवर काही दुसरंच गात असायचे. त्याच्याशी पुन्हा जुळवून घ्यायचे.

ते P.S पुस्तक वाचायचे राहूनच जात होते....

निशांत म्हणून एकजण होता, त्याच्याकडे टपोरी गाण्यांचा एव्हरग्रीन स्टॉक होता. ती मध्ये मध्ये म्हणून दाखवून बसमधले वातावरण खिदळत ठेवण्यात ह्याचा मोठा सहभाग होता. किस्सेही असेच, अफलातून, निव्वळ टीपी. सुजय, रोमिला, दुर्गेश ही जरा शांत शांत अशी मंडळी. स्वातीही. रोमिलाकडे कवितांचे एक पुस्तक होते, ते एकदा तरी मी ट्रेक संपण्याआधी वाचायला घेईन तिच्याकडून, असे स्वतःला बजावले. अपूर्व हा सहसा बॅकबेंचर आणि एकटासा. बोलताना मृदुभाषिक अगदी. ह्या मुलाची फोटोग्राफी स्कील्स अफलातून. सुरेख फोटो काढतो. एकदम देखणे. दोघी बहिणी होत्या, संगीता आणि ललिता. गुजराथेतून आलेल्या. ललिता जराशी त्रासलेली असायची, आणि संगीता तिला सांभाळून घेत, आमच्याशीही जुळवून घ्यायची. तिचं खूप कौतुक वाटायचं, ललिताच्या स्वभावावर जराशी खसखस पिकायचीच. त्याला इलाजच नव्हता. राजश्री ही सगळ्यात सिनियर मेंबर आमच्या ग्रूपची. रोमिला खालोखाल हिचा फिटनेस. ह्या दोघींनी फिटनेसच्या बाबतीत एक लीडरसायब आणि गाईड्स सोडले आम्हां सगळ्यांनाच लाजवले म्हणायला हरकत नाही.

बरोबरचे गाईड्सही स्वभावाने लाख होते अगदी. आणि आमच्या बशीचा डायवर? त्याचे बारसे 'कैलाश खेर' असे केले होते. त्याचा रेडिओ - म्हंजे बशीतला - सतत सुरुच असायचा आणि इतक्या बेदरकारपणे पण गाडीवर पूर्ण नियंत्रण ठेवून सुसाट गाडी सोडायचा की काय सांगू. पुढे पुढे तो गाडी चालवताना समोरच्या रस्त्याकडे पाहणे सोडून दिले. उगाच डोक्याला ताप कशाला करुन घ्या? त्यापेक्षा गाणी गाणे आणि बाहेरचे नजारे पाहणे सोपे होते, अधिक आनंददायी होते. संपूर्ण प्रवासात बाजूने गंगेचा प्रवाह दिसत राहिलेला. सोबतीला उंच निंच, हिरवे, निळे, करडे, आकाशापरेंत पोहोचणारे, अंगाखांद्यांवर ढग बाळगून असलेले पहाड. मला ठाऊक आहे की, आत्तापरेंत मी हे बर्‍याचदा लिहिले आहे, पण पुन्हा पुन्हा हे ह्या सार्‍या प्रवासात जाणवले, ह्याच सदाबहार दृश्यांनी सतत मोहिनी घातली, वेड्यासारखे वेड लावले आणि थकवलेही. गंगा आणि हिमालय, हाच हिमाचलाचा आत्मा.

बसने रस्ता कापताना प्रथम देवप्रयागपाशी पोहोचलो. भागिरथी आणि अलकनंदेच्या संगमाचे ठिकाण. तिथे थांबलो. कमालीचे उन होते. कातडी करपवणारे उन. सहन होत नव्हते इतके तीव्र, पण त्या प्रयागापुढे सारे काही विसरायला झाले.... वर ढणाढणा उन आणि खाली भागिरथी आणि अलकनंदा आपापल्या मार्गाने पुढे येऊन एकत्र होऊन, गंगा म्हणून मार्गक्रमण करत होत्या. दोन्ही तीरांवर दाटीवाटीने पिवळ्या, निळ्या रंगांची घरे. काय अफलातून सुरेख दिसत होते सारे. पहाडांवर घरे बांधून लोक राहतात. तिथे जाऊन २-३ दिवस का होईना, रहावे, अशी फार फार इच्छा झाली. दिवसभर नदीचा नाद कानांवर पडला की कसे वाटत असेल, हे जाणून घ्यायचे होते. तिथल्या रहिवाशांचा हेवाच हेवा वाटला. रोज त्या नद्या वाहताना अनुभवायच्या, त्यांचा नाद ऐकायचा..

इथे पाऊस कसा पडत असेल? त्यावेळी ह्या नद्या कशा भासत असतील? कशा वाहत असतील? रोरांवत असतील? फुफाटत असतील? रौद्र निसर्गाचे ते एक रुपडे पहायचे फार मनात आहे. आणि चांदण्या रात्री कशा दिसत असतील? नुसती कल्पना करुन माझ्या अंगावर काटा येतो! भारावून जायला होते. रात्रीच्या चंद्रप्रकाशात ते दुधाळ पाणी किती मोह घालत असेल पाहणार्‍याला... तेही पहायचे आहे मला. पहाटवेळी? संध्याकाळी? अमावास्येला? किती, किती पहायचे राहून जाते आणि चाकोरीबद्ध आयुष्य मात्र गळ्यात पडते... कधी योग आहे, पाहू.

तिथे तापणार्‍या उन्हात उभे राहून, घसे सुकवल्यावर, तिथेच गाडी लावून उभ्या असलेल्या एका सरबतवाल्याकडे आम्ही सुमधुर लिंबूसरबत प्यायलो. पाणी कुठले होते? कोणास ठाऊक. जाणून घेणे तितके महत्त्वाचे वाटलेही नाही. कायच फरक पडला नाही. नाही, म्हणजे आता आम्ही शहरातले फिल्टर्ड पाणी पिणारे जीव झालोय ना, म्हणून. ऑफिसमध्येही आणि घरी उकळून आणि काय काय. लहानपणी आजोळी पणजोळी जायचे, तेह्वा कसे जिवंत झर्‍याचे, विहीरीचे पाणी प्यायलेले चालायचे? काही होत नसे तब्येतीला. मनामध्ये इच्छा केली, की नद्यांचे पाणी आणलेले असूदेत ह्या महाभागाने सरबत बनवायला, पण बनवले होते सुरेख.

तिथे एक पाडी होती, तिच्याशी लग्गेच मैत्री झाली. तिलाही थोडे सरबत, एक लाडू, एक सफरचंद, बाटलीमधले पाणी असे काय काय मी खाऊ पिऊ घातले, पुढे तिचे पोट बिघडले असले तर मीच जबाबदार, पण ती मजेत चरत होती. तिची पोळी खाजवली. कानामागे खाजवले. गळ्याला मिठी मारली. पूर्वी पणजोळी एक गाय होती, तांबू नावाची, ही अगदी तशीच आणि त्याच रंगाची होती. तांबू मागील दारी असे, पण पुढील दारी पणजोळी पाय ठेवला, की तिला समजत असे, मग तिला जाऊन भेटेपरेंत हंबरत राही. ते सगळे आठवले. पाडी पण गुणी, मायाळू होती. सरबतवाल्याला वाटले, मला तिची भीती वाटतेय. म्हटले, नाही हो, भारी गुणी आहे बाळी. घाबरेन कशाला. मला सवय आहे, आणि पुढे मनात म्हटले, खूप खूप वर्षांपूर्वीची... तांबूची आठवण खूप घट्ट आहे.

देवप्रयागापासून हलावेसे वाटेना. भागिरथीची कहाणी तर ठाऊकच असते सगळ्यांना सहसा. अलकनंदेची काय आहे बरं? शोधायचे ठरवले.

क्रमश:

October 20, 2011

चरैवेति, चरैवेति..१





पुढच्या प्रवासाची कहाणी सांगायच्या आधी आमच्या आदल्या रात्रीच्या ऑर्डरींची आणि वेटरसायबांच्या कष्टांची दर्दभरी कहाणी सांगते. मूऽऽड आला आहे!

तरं झालेलं काय, की दिवसभरातल्या प्रवासानं अगदी दमायला झालेलं. खेळ नाही हो, खरंच. आठवा बरं,- एका ट्रेनीत - दुरांतोत - बसायचं, रात्रभर प्रवास करुन दिल्ली गाठायची. रात्री गाडीत नीट झोपायचं नाही. येतच नाही झोप. मध्ये मध्ये ह्या कुशीवरुन, त्या कुशीवर. कारणं? अनेक असतात हो. कारणांना तोटा नस्से. हवीत? ही घ्या.

झोपेची जागा बदलली, घरच्यांची आठवण. नेहमी बिल्डिंगी आणि शहरी वातावरणातले सिमेंटचे ब्लॉक्स, जीव घुसमटवणारी रहदारी आणि रखरखीत गर्दी पाहून आणि जगून कंटाळलेल्या जिवाला एकदम हिरव्या रंगाची उधळण, न संपणारं निळं, काळं, सावळं करडं आकाश, अफाट पाणी - आठवा, वैतरणेचं इथपासून ते तिथपरेंत असलेलं पात्र - दिसल्याने त्याची आनंदाने झालेली तगमग आणि घुसमट - घेता किती घेशील, असं झालं की होते तशी. झोप उडते. इतकं, असं सुख पेलवत नाही. अनुभवांची मनात जपणूक करण्यासाठी, मन, मिळालेली शांत वेळ वापरुन घ्यायला पाहते आणि झोपेला नाट लागते. त्याच वेळी एक कळही येऊन जाते मनात. का? ह्यासाठी, की हे असं सगळं पुन्हा कधी पहायला मिळेल, हेच आणि असंच.. ही बोच लावून जाते. न जाणो, कदाचित, पुढल्या वेळचा नजारा अधिक सुंदर असेलही. कोणास ठाऊक.

पण, पुन्हा दुसरी एक जाणीव डोके उंचावून उभी राहते. आत्ता जसे ते भिडते आहे, त्याच जाणिवेने आणि असोशीने पुढल्या वेळेला भिडेल का, हे अजून एक न भिरकावता येणारे ओझे माझ्यासाठी आंदण म्हणून घेऊन. कदाचित अधिक तरल जाणिवेने भिडेल का? परत कधी असा प्रवास करायला ह्यापुढे जमले नाहीच तर? - बाबा, निगेटीव्ह विचार तो हाच, हो ना? तुझा मुद्दा परत एकदा प्रूव्ह्ड.- पण खरेच, सगळेच जमून यायला हवे. तेच महाकठीण. सगळ्या बाबतींत असेच तर असते. कोणाला जाणवते, त्रास देते, कोणाला नाही. त्रास न होणारे सुखी, की त्रास होऊ शकणारे? की त्रास होणारे व त्याविषयी काही करु शकणारे? अपनी सोच का अपना दायरा. अपने, अपने खयालात. सब कुछ जायज, कदाचित. कोणी कोणाला बरोबर किंवा चूक ठरवावे? प्रत्येकाचे विचार, लिमिट्स वेगळी. आवाका वेगळा. नै का? असो.

तरी हे असं सगळं अनुभवायला लागलं, आणि ते आत आत भिडायला लागलं, की झोप आस्तालाविस्ता म्हणते. की कराँ? नाविलाजको विलाज नै होता. एऽऽऽ, कोण रे ते हसतेय मला? आँ?

पुन्हा मळवलीच्या आणि एकूणातच तिथल्या भागांतल्या होर्डींग्जने सृष्टीसौंदर्य कसं बिघडलं आहे ह्याची हळहळ पोखरतेच. वांझोटी असते, पण जीव कुरतडल्याशिवाय रहात नाही. हे आणि असले अजून काही विषय. झाडांना ठोकतात हो पाट्या वगैरे. तुमच्या शरीरांवर ठोका ना रे. सहप्रवाशांशी झालेल्या गप्पांविषयी मनात येणारं काहीबाही. कुणी काही मनातले सल बोलून दाखवले तर त्याविषयी वाटणारी हळहळ आणि वाटणार्‍या काळज्या. पूर्ण मनापासून. जोडीला पुढे ट्रेक कसा होणारे, हे एक सतत मनात ठाण मांडून, दडून बसलेले आणि मध्येच कधीतरी डोके वर काढून एकदम जोररात भॉंऽऽऽक्क करणारे लोभस भूत! एक ना दोन कारणे! एवढी पुरेत ना?

शरीराबरोबरीनं, किंबहुना त्याहून अधिक वेगाने मनही प्रवास करतं. तसं पाहिलं तर, आपल्याला आकाशाला गवसणी घालायची थोडीच असते? पण, मनाला मुद्दा समजेल तर ना?! असो, लईच भरकटले. तर प्रवासाकडे वळूयात? चलो! नॉर्मल गप्पा करुयात फॉर अ चेंज.

तर, दिल्लीला पोहोचल्यावर, तिथे पुन्हा दुपारच्याला दुसरी हरिद्वारवाली ट्रेन गाठून पाऽऽर हरिद्वारला पोहोचायचं. तिथनं पुन्हा बशीत बसून जाताना, पदरात पडलेल्या गंगेच्या दर्शनानं इतकं वेडं व्हायचं की उरली सुरली शक्ती वापरुन मनही पार दमून, थकून एकदम येडं व्हायच्याही पलिकडे. त्यात पुन्हा तो चौसोपी चौक. असं ते सगळं काय, काय. तेह्वा असं आमचं पाऽऽर गठुडं वळल्यालं. तेह्वाच कधीतरी भूक नावाची संवेदना पोटाला जाणवलेली असावी बहुधा, पण ती मेंदूपरेंत पोचत नसावी. नक्की तसंच असायला हवं, कारण नंतर पाहता आम्ही तर बकासुराला पण शरमेने मान खाली घालायला लावली असती!

हॉटेलात पोहोचून आपापल्या खोल्यांमधून सामान वगैरे टाकून थोडं स्थिरस्थावर होऊन, चौसोपी मोकळ्या जागावाल्या चौकाकडे मी आणि रैनाने आसूसून पाहून, यथावकाश सगळे खाली जेवायला म्हणून येऊन बसलो आणि डायनिंग हॉलमध्ये आल्या आल्या सगळ्यांनी भूकच नसल्याची रेकॉर्ड वाजवली. सगळे फक्त १-२ चपात्या (पोळी नव्हे, पोळी म्हणजे फक्त पुरणाची, साध्या चपातीला पोळी वगैरे म्हणायचं म्हणजे.... असोच, असो हं काय!) आणि थोडीच भाजी वगैरे खाणार होते, उगा आपलं नावाला हो. झोपेच्या आधी काहीतरी खायला हवं ना. सवय, सवय. बाकी काही नाही. तर, सुरुवातीची ऑर्डर समोर येईतोवर ओळखीपाळखी करुन घ्यायला सुरुवात झाली. सगळ्यात शेवटी मी होते आणि नेमके तेह्वा छोट्या छोट्या फुलक्यावजा चपात्या आणि रोट्या आल्या आणि पनीर पालक, आणि अशीच आलूची भाजी. मग ओळख राहिली बाजूला. सगळ्यांच्या हातांची आपापल्या पोटांशी गाठ पडली होती. एक राउंड झाली आणि जठराग्नी भडकल्याचं सगळ्यांच्या मेंदूंच्या एकदमच लक्षात आलं असावं. मग काय? ओघाने अजून रोट्यांच्या ऑर्डरी गेल्या, ते घेऊन वेटर सायब आले, त्यांची वाटच पहात होतो. लग्गेच भाताची ऑर्डर, मग डाळीची ऑर्डर, मग परत भाजी.. दही पण मागवले, मला वाटते. शेवटी, शेवटी काही जिन्नस घेऊन आले की वेटर सायबच विचारायचे, और कुछ "खायेंगे" क्या? बघा, म्हंजे! शेवटी एकदाचे थांबलो खादडायचे. खादडायच्या भरात गप्पांचा भरही कमी झाला होता. नंतर पोटोबा भरल्यावर डोळेही मिटायला सुरुवात झाली आणि दुसर्‍या दिवशी लवकर उठायचे होते म्हणून झोपलो. माझी ओळख करुन द्यायची राहिलीच. ते ठीक झाले. फार काही नाहीच आहे तसेही सांगायला. अशी ती सगळी कहाणी.

हे लिहिलेले मजेशीर नाही वाटणार कदाचित, पण तो माहौल आठवला तरी अजूनही हसू फुटते. पनीर काय सुरेख होते. दहीही. दोन्ही माझे आवडते खाद्यप्रकार, पण ह्या हिमाचलातल्या पनीर आणि दह्याच्या तर मी प्रेमात आहे. किती तो मुलायमपणा, किती उत्तम चव. मस्त. दुसर्‍या दिवशीची कॉफीही सुरेख जमली होती. सकाळी सकाळी अशी कॉफी मिळणे हा शुभशकून असतो.

ठीक सहा वाजता आम्ही निघायला तयार होतो. बाहेर जाताना हॉटेलच्या दरवाज्यापाशी पाहिले, तर एका मातीच्या मोठ्या भांड्यात ही इतकी गावठी गुलाबाची फुलं पाण्यात घालून ठेवली होती! पाहूनच अख्खा दिवस सुगंधित झाला! गर्द गुलाबी रंगाची गुलाबफुलं सुरेख, टवटवीत दिसत होती. जोडीला त्यांचा मंद, मन प्रसन्न करणारा सुगंध. वाकून, वाकून भरभरुन सुवास घेतल्याशिवाय राहवले नाही. एखादे फूल परवानगीने सोबत घ्यावेसे वाटले, मग म्हटले, असूदेत. कोमेजून जायचे. नाही घेतले. मी लहान असताना अंगणात होते ते गावठी गुलाबाचे झाड आठवले. नऊवारी नेसून आपल्या भरगच्च आंबाड्यात एखादे फूल खोचणारी, मोत्यांच्या कुड्या घालणारी आणि ओह, कित्ती देखणी आणि मऊ मऊ असणारी आणि वागणारी आज्जी आठवली. संध्याकाळच्या वेळी ती बाकावर बसलेली असताना, अंगणात फिरणारा, शतपावली घालणारा आजोबाही आठवला - हो, त्याला मी एकेरीच हाक मारत असे - त्याला, बाबाला, काकाला. हमारेमें ऐसाच चलता था. आठवणीच आठवणी. मनाने जसे इंप्रिंटस घेतलेले असतात. ही प्रिंट हवीय, घ्या, ही नको? ती हवीय, वांदो नथी. आहे, घ्या. अजब आहे.

सकाळच्या वेळात थोडीफार फोटोग्राफी केली आणि निघालो. हृषिकेशवरुन पुढे पिपलकोटीला. लक्ष्मण झूल्याबद्दल खूप ऐकले होते. वाटेत दिसणार होता. साहेबांना हजारदा सांगितले होते की झूला आला की सांगा, दोन मिनिटे तरी गाडी थांबवायची का? हो, हो असे उत्तर मिळाले होते, म्हणून तशी निवांत होते. बराच वेळ झाला, मधल्या गावातल्या गल्ल्याही पार केल्या, चिंचोळ्या रस्त्यांमधून गाडीवान त्याच्या मते कौशल्याने आणि म्हणजेच आम्हांला भीतीदायक वाटेल अशा प्रकारे गाडी हाकत होता, आणि तो रस्ताही मागे पडला, कोणतासा घाटही पार केला. गर्दीही विरळ झाली आणि थोडीशी शंका आली, म्हणून विचारले की झूला कुठे? गेला की मागेच, असे उत्तर मिळाले. आई ग्गं! काय हे.. इतक्यांदा सांगूनही.. वाईट वाटले थोडेसे. तरी प्रवासाची गणिते मला कुठे सांभाळायची आणि सोडवायची होती? त्यांची गणिते आणि उत्तरे त्यांनाच ठाऊक, म्हणून हळहळ मनातच दडपली आणि गप्प बसले. तरीही वाईट वाटलेच. आता फक्त हरिद्वार आणि हृषीकेश करायला हवे ह्यासाठी. मनसोक्त घाटांकाठी बसायचे. झूल्यावरुन फेर्‍या मारायच्या. नक्कीच. स्वतःलाच प्रॉमिस केले.

जसे जसे पुढेपुढे जात होतो, नजारे उलगडत होते. कोणत्या नजार्‍याला म्हणावे की नजारा हो तो ऐसा हो? डावे उजवे ठरवणे फार कठीण झाले होते, आणि तेवढ्यात एक फार, फार सुरेख जागा आली. निव्वळ अप्रतिम म्हणावी, अशी. एक मोठा लांबलचक पूल गंगेच्या पात्रावर बांधला होता,दोन्ही काठांना जोडत होता. लोखंडी असावा बहुधा. त्या पूलावर जाऊन उभे रहावे असे फार वाटले. जमले नाही. पुलाच्या दोनही बाजूंना, नव्हे सभोवताली, नजर जाईल तिथे गंगेचे शुभ्र पाणी आणि नजर पाण्यावर ठरत नाही म्हणताना, ती तोलून धरायला पहाडांचे उंचच उंच कडे. पहाड कशाला म्हणायचे हे हिमालयात आल्यावाचून उमजायचे नाही, आणि हे म्हणे हिमकडे नव्हेत. खरंच? मग अजून उंच असतील हिमकडे? अजूनही कल्पना करता येत नव्हती खरं तर. आत्ताच छाती दडपत होती. भव्य, दिव्य म्हणजे काय, हे जाणून घ्यायचे तर असेच काही पहायला हवे. खरं सांगायचं तर असे काही पहिले की त्या नजार्‍याचे वर्णन हे शब्दांनी होतच नसते, अ श क्य. शब्द बापुडे, केवळ वारा..

हिमालयाच्या रांगांमधून गंगा मनमुराद वाहत होती. आमची वाट एका काठाने जात होती आणि वाटेची दुसरी बाजू हिमालयाच्या पहाडांनी तोलून धरली होती. रस्त्यावर आमच्याशिवाय कोणी, कोणी नव्हते. सकाळच्या उन्हांत गंगेचे पात्र किती लोभस दिसावे, त्याला काही सीमा? अवर्णनीय, अप्रतिम वगैरे शब्दही पोकळ वाटावेत. काही घटना, अनुभव नुसते जगायचे आणि जपायचे. गंगेच्या पाण्यावरची त्या सकाळच्या वेळची आभा तर मी जन्मात विसरणार नाही. काहीतरी फार पवित्र आणि मनाच्या आत काही शुभ्र, काही जीवघेणेसे उलगडणारे असे समोर वाहत होते. किती जवळून. पुन्हा एकदा वाटले, झोकावे का स्वतःला? मन कधीच झोकून दिले. जवळच असलेल्या खडकावर, उंचच उंच निळ्या, हिरव्या पहाडांच्या साक्षीने आणि वाहणार्‍या पाण्याच्या सोबतीने जगाच्या अंतापरेंत तिथेच बसून रहावेसे वाटले. काही काही क्षण, काळाचा काही भाग आपल्याला किती निर्मळ भावना देऊन जातात. दुर्मिळ असतात. त्यापैकी हा नक्कीच एक. अजून ते सारे तसेच्या तसे डोळ्यांपुढे येते. वेड लागते.

अतिशय अनिच्छेने गाडीत बसून मार्गाला लागलो. एके ठिकाणी खायला म्हणून थांबलो. तिथेही गंगा अशीच वाहत होती. भरभरुन. पहाडांच्या सोबतीने. पडाड तरी कसे. उंचनिंच. एकाच वेळी मनात भरणारे आणि धडकीही भरवणारे. गंगेचा प्रवाहही तसाच आहे. जरी मनात धडकी भरली तरीही कसले अनाकलनीय आकर्षण वाटत राहते? पुन्हा पुन्हा ओढ वाटते? सारेच गूढ. तिथूनही पुढे निघालो. गाडीमध्ये आता गाण्याच्या भेंड्या, गप्पा, गाणी, टीपीवाले विनोद, हसणे खिदळणे सारेच सुरु झाले होते. समां बंध रहा था...


क्रमश:

October 1, 2011

हर हर गंगे..२




मनातल्या मनात माईला हाका मारल्या. तिने ऐकल्या का?

तितक्यात बसच्या दुसर्‍या बाजूच्या खिडक्यांबाहेर लक्ष गेले. ओह्हो! दिसली, माई दिसली.. आणि कशी? अवाक् व्हायला झाले! छाती दडपली एकदम. आपल्या सर्व सौंदर्यानिशी, सामर्थ्यानिशी, सौष्ठवानिशी आणि ऐश्वर्यानिशी माई वाहत होती. तिच्या लाटा सातत्यपूर्ण नाद करत इतक्या वेगाने पुढे पुढे सरकत होत्या! जणू काळाच्या वेगाला मागे टाकतील. छे! शब्दांत ते दृश्य पकडणे मला केवळ अशक्य आहे! कसे दिसत होते ते? जणू काही आताच कात टाकलेल्या नागिणी सुसाटत धावत होत्या! मनात आले, माईने खरेच तर सांगितले होते भगिरथाला. तिचा वेग सहन होणे अशक्य. हा तर अंगावर येऊ पाहणारा वेग होता. जराशा दुरूनच पाहत होतो, तरीसुद्धा तसे बर्‍यापैकी ओझरते पाहतानाही तो वेग असह्य झाला होता, विलक्षण ओढ लावत होता, भुरळ पाडत होता... तर प्रत्यक्ष तिच्या सन्मुख असणार्‍यांची काय स्थिती होत असेल? जीव इतक्या काकुळतीने अस्वस्थ होऊ लागला होता, एक प्रकारची उलघाल आणि एक विलक्षण उर्मी दाटू लागली होती आणि वाटले, बस्स! बेभानपणे ह्या लाटांवर स्वतःला तनामनाने झोकून द्यावे, माई नेईल कुठे ते. सखी आहे, सांभाळूनच नेईल, आणि एकदा झोकून दिल्यावर पुढची पर्वा कोणाला? कशाला? खरंच. विल़क्षण मोहाचा क्षण. नुसते वाटले. कुडी झोकायला धीरही खरोखरच झाला असता की नाही, कल्पना नाही. उर्मी दाटणे वेगळे आणि कृती करणे त्याहून वेगळे. निरनिराळ्या जबाबदार्‍यांनी पाय मागे ओढले. जबाबदार्‍या नसत्या तर झोकून दिली असती का कुडी? जमले असते? काय, कोणास ठाऊक.. छंद म्हणून विचार पुरला आहे मात्र सद्ध्या. असो.

किती किती ओढ लावते गंगामाई! पंडित जगन्नाथांनी कोणत्या भावविभोर अवस्थेत तिचे वर्णन, स्तुती आणि शब्दाने पूजा बांधली असेल, ह्याची पुसट, पुसट जाणीव झाली, न झाली. किती प्रकर्षाने स्वतःला तिच्या लाटांवर झोकून, फेकून द्यावेसे वाटले आणि पुढे तिचे निरनिराळे प्रवाह पाहताना, अनुभवताना वाटतच राहिले. जमेल तितके ते दृश्य पहायला प्रयत्न केला. बस थांबली नाही, फार फार दु:ख होत होते बस न थांबत असल्याचे.

ऐलतटापासून काही अंतरावर असलेल्या पुलावर आमची बस धावत होती आणि आत बसलेले आम्ही काही जीव, गंगेला होता होई तेवढे मनात साठवत होतो. पैलतट भाविकांनी थोडाफार गजबजलेला होता, काठांवरच्या देवळांतून दिवे लागले होते. माईची आरती सुरु होती. मोठमोठी निरांजने, आरत्या तेवत होत्या, झांजा, मृदंग, ढोल वाजवणारेही डोळ्यांनी टिपले, मोठा नाद करणार्‍या घंटा घेऊन लोक उभे होते. मोठ्या मोठ्या ज्योतींचा उजेड पाण्यावरुन परावर्तीत होत होता. आरतीचा आवाज आणि वाद्यांचे नाद एकमेकांत मिसळले होते. माई आरतीचे सोपस्कार करुन घेत मार्गक्रमण करतच होती. एका कोणत्या तरी क्षणी मनावर अगदी गारुड झाले. घशात हुंदका दाटू झाला आणि डोळे चुरचुरायला लागले. हिला सोडून पुढे जायचे? पुन्हा दर्शन? सगळे मोह, माया, बंधनं पाश सोडून लोकांना हिचा आश्रय का करावासा वाटतो, कशी प्रेरणा मिळते, का इच्छा होते, ह्याचा थोडा थोडा उलगडा झालासे वाटले.. पण आता वाटते, खरेच का झाला उलगडा?

हे जे काही सौंदर्य समोर उन्मुक्तपणे वाहते, ते मृदुमुलायम नक्कीच नसते. आपल्याच मस्तीत वाहते माई. आपल्याच धुंदीत. आखीव रेखीव वगैरे असे काही नाही माईपाशी. बस्स, एक आवेग आहे, मत्त उन्मत्तपणा आहे आणि ते केवळ तिलाच शोभून दिसते. किती बोलावे तिच्याबद्दल? न बोलवे काही. सिर्फ एहसास हैं ये, रुहसे महसूस करो. गंगामाई ही केवळ अनुभवण्यासाठी आहे. शब्द, विचार सारे काही थिटे पडते तिच्यापुढे. तिला म्हणावेसे वाटले, नव्हे, पुन्हा, पुन्हा मनात प्रवासात तिच्याशी बोलताना म्हटले, त्वं साक्षादात्मासि नित्यम्| ऋतं वच्मि| सत्यम् वच्मि|

आता पुन्हा कधी दिसेल? साहेब म्हणाले, आता अख्खा रस्ता दिसणार आहेत गंगेचे प्रवाह, गोविंदघाटीपरेंत अगदी. खरंच? खरंच का? किती आश्वस्त वाटले तेह्वा. माई बरोबरीने येणार होती, साथ सोबत करणार होती. उगीच का ती सखी आहे? तिच्याशी मनातल्या गोष्टी बोलत प्रवास होणार तर. कोणत्या जन्मीचे पुण्य फळाला आले होते! काय सांगू हिला? विदध्या: समुचितम्! अजून काय मागायचे गं? कधीतरी तुझ्या काठाकाठाने फिरायची इच्छा आहे. पार गंगोत्रीपरेंत जायचे आहे बघ. तुझ्या संगतीने तुझ्या काठावर फुललेले, वसलेले जीवन पहायचे आहे, शिकायचे आहे. एकदा तरी तुझ्या किनार्‍यावर तुझ्या लाटांचा नाद ऐकत आणि आकाशातले चांदणे बघत निवांत पहुडायचे आहे. तुझ्या संदर्भातल्या कथा कहाण्या आठवायच्या आहेत आणि बस्स, शांत, शांत व्हायचे आहे. कधी बोलावशील पुन्हा?

माई तात्पुरती दृष्टीआड झाली. तिचा नाद मात्र मनामध्ये अव्याहत ठाण मांडून राहिला. अजूनही आहे. म्हटले ना मी, भूलना नामुमकीन.

हृषिकेशच्या रस्त्याने जाताना मध्येच एका ठिकाणी चांगलाच ट्रॅफिक जाम होता. लष्कराची वाहने, प्रवासी वाहने, तिथल्याच रिक्षा आणि त्यात कोंबलेली माणसे, ट्रक.. सारे काही एकाच लहानशा रस्त्याने ये जा करतील, तर अजून काय होईल? पण कोणी तक्रार करताना दिसत नव्हते. कदाचित सवय झाली असावी , कदाचित हेच अंगवळणी पडले असावे. कदाचित आतून मन शांत होण्याचे वरदान माईच्या प्रदेशात लाभून जात असावे. कोणास ठाऊक? जायचा रस्ता राजाजी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतून जात होता, हत्तींच्या कळपापासून सावध रहा, असे फलक पाहिले. कुठे हत्ती दिसतात का ह्याचा उगीच नजर शोध घेत राहिली. कोणी दिसले नाही. मिट्ट काळोखात एखादा कळप एकदम समोर ठाकला असता तर काय झाले असते, कोणास ठाऊक. बाकी काही कल्पना करु शकत नसले, तरी काही फोटो मात्र नक्कीच काढले असते.

यथावकाश हृशिकेशला पोहोचलो.

ज्या हॉटेलात रहायचे होते, तिथली ऐसपैस जागा एकदम आवडली. खालचा चौकच किती मोठा होता. केवढीतरी जागा. मोकळीच. गार्‍या गार्‍या भिंगोर्‍या करत खेळावेसे वाटले. चौसोपी जागेला फरसबंदी होती. एक झूलाही हवा होता, सावन के झुले करायला. पाऊस पडेल तेह्वा त्या चौकात उभे राहून तो पाऊस अनुभवायचे काय सुख असेल. नुसते उभे रहायचे शांत आणि तो पाऊस अनुभवायचा, हळूहळू चेहर्‍यावर आणि मग अंगावर घ्यायचा. कधीतरी नकळत तो मनातही पोहोचतो. सुखच मग. नुसती स्वप्ने आणि इच्छा. रोजच्या धबडग्यात अशा निवांतपणीच्या इच्छा स्फुरतात हीच एक मेहेरबानी समजायची अन् काय. आपापल्या खोल्या ताब्यात घेऊन, फ्रेश होऊन खाली जेवायला आलो. सुरुवातीला सगळे बसलो होतो, आणि मला भूक नाही, तुला भूक नाही वगैरे सुरु होते, कोणालाच फारसे काही नको होते. असे निदान सगळे म्हणत तरी होतो. मात्र नंतर मात्र ऑर्डरी संपेचनात! सोबतीला गप्पा. आम्हांला मजा आली, पण वेटरसायब वैतागले. त्यांनी मनातल्या मनात किती खाताय, किती खाताय म्हटलेले ऐकू आले अगदी. पुन्हा एकदा मस्त ग्रूप आहे, ह्याची मनातल्या मनात खात्री पटली. सगळेच भरपूर खातात आणि त्याहून दुप्पट गप्पा हाणतात. अजून काय हवे?

खरं तर ह्या ऑर्डरी कशा एकामागोमाग गेल्या आणि वेटरसायबांना शेवटी कसा वैताग आला हे लिहायला हवे आहे, पण कंटाळा केला आहे लिहिण्याचा. कधीमधी मूड आलाच तर लिहीन नक्की.

दुसर्‍या दिवशी सकाळी ६ ला निघायचे होते. साडेचार-पाचला उठावे लागणार. तिघींचेही आवरायचे होते. रात्री सगळी विद्युत उपकरणे चार्ज केली. दुसर्‍या दिवशी पहाटे चारला मला जाग आली. इतके निळसर भुरकट आकाश पहिल्यांदा पाहिले. स्वप्नातल्यासारखे वाटत आणि दिसत होते. साधारण पावणेपाचच्या सुमारास तेजोनिधी प्रकटले. स्वतः दिसले नाहीत, पण आकाशाचा रंग इतका गडद केशरी झाला आणि फाकलेले किरण फक्त दृष्टीस पडले. जादू जशी. नळातून येणार्‍या गरम पाण्याने आंघोळीपांघोळी करुन घेतल्या. हे नळातले असे गरम पाणी इथे शेवटचे. यापुढे पाण्याची चैन नस्से. चैन संपली.

चहा, कॉफी ब्रेकफास्ट संपवून ६ च्या सुमारास हृषिकेशवरुन पुढे जायला निघालो.. पुढे जाणार होतो पीपलकोटीला.

क्रमश:

September 27, 2011

हर हर गंगे.. १





स्टेशनातून वळण घेऊन डायवर सायबांनी बस बाहेर काढली.

रस्त्यावरुन एका जुन्या रथातून बसून कोणी साधूबाबा, कोण्यातरी बिनमहत्वाच्या पिठाचे स्वामी मिरवणूकीने चालले होते. बिनमहत्त्वाचे आणि मुख्य म्हणजे गाठीशी पैसा नसलेले असावे. गर्दी नव्हती त्यावरुन अंदाज. समोर आणि मागे मिळून चार शिष्य. सगळ्यांनी भगवी, लाल धोतरे नेसलेली. गंधाचे, भस्माचे पट्टे. शेंड्या. समोर एक सनईवाला, एक ताशेवाला. इतकेच लोक. हसूही आले आणि अचंबामिश्रित कौतुकही वाटले. बरोबर गर्दी नव्हती, मग कसं काय मी असं बसू रथात? लोक हसतील का? वगैरे स्वामीजींना काही वाटले नव्हते बहुतेक. शिष्यही चामरे ढाळत होते, त्याच भक्तीभावाने. निदान कर्तव्यभावनेने. प्रत्येकजण आपले कर्तव्य, धर्म पाळत होते का? हीच का निष्ठा असते? अशीच? हे उगाच लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेणार्‍यांपैकी होते की खरेच भगवंतापाशी, वा जिथे कुठे स्वतःच्या श्रद्धा वाहिलेल्या होत्या, तिथे मनापासून विश्वास टाकून आपले कर्तव्य पार पाडणारे सत्शील जीव होते? कोणास ठाऊक. जो जे वांछिल, तो ते लाहो, हेच एक अंतिम सत्य असेल असे वाटू लागले... माऊलीने सगळे, सगळे खूप, खूप आधी सांगून ठेवले आहे..

मला मात्र ह्यापैकी काहीच जमले नसते, जमणारही नाही बहुधा.. कितीतरी वेळा, कितीतरी कारणांनी लाज वाटली असती, ऑकवर्ड झाले असते. अशी निष्ठा अंगी बाणवू शकेन तो सुदिन. कधीतरी जमावे, ही इच्छा. आता इथून गंगामाई आणि तिचे हरिद्वार, पुढे हृषिकेश, कधीतरी भेटणार आहे तो हिमालय, एकूणातच एकामागून एक धडे द्यायला सुरुवात करणार आहेत, ही खूणगाठ मनाशी बांधायला सुरुवात केली. घेता, किती घेशील दो करांनी.. सनईचे सूर फार फार मोहवून गेले. शांत, गंभीर असे सूर. कधीतरी मरहूम उस्ताद बिस्मिल्लां खाँ, त्यांची सनई आणि त्यांची अलाहाबादची गंगामैय्या ह्यांच्यावरची एक डॉक्युमेंटरी पाहिली होती, त्याची फार फार आठवण झाली. उगाच भरुन यायला लागले. आत्ताशी अजून दर्शन होणार आहे, तर ही गत? एवढ्यातच दिल गिरा वहींपे दफ्फतन होऊन कसे चालेल?

अजून एक वळण आले आणि सोबत पाण्यावरुनच वाहत येतो, असा गार वारा.

नेहमीच्या गार वार्‍यात आणि पाण्यावरुन वाहत येणार्‍या गार वार्‍यात एक फरक असतो नेहमी, म्हणजे असं आपलं माझं मत. ठाम वगैरे कॅटेगरीतलं.नेहमीचा गार वारा जरासा कोरडासा. म्हणजे तुमचा जीव सुखावून देईल, पण एका अलिप्तपणे. तुमच्याभोवती रेंगाळणार नाही, तुमच्यात स्वतःला गुंतवून घेणार नाही. तुमच्या अंगावरुन म्हणता म्हणता पुढे निघून जाईल. एखाद्या बैराग्यासारखा. अडकणार नाही, आठवणी ठेवणार नाही. त्याउलट पाण्यावरुन वाहत येणारा वारा. त्याची जातकुळीच वेगळी आहे लोकहो. हा केवळ सुखावणारा वारा नसतो, हा शांतवणारा वारा. तुमच्याभोवती मायेने रेंगाळणारा, एखाद्या खर्‍याखुर्‍या दोस्ताप्रमाणे हलके हलके तुमच्या मनात शिरणारा. तुमच्याही नकळत तुमच्या मनातली खळबळ म्हणा, चिंता म्हणा, तत्समच जे काही असते, ते सारे, सारे दूर करणारा. जिवाला विसावा देणारा वारा. कोरडेपणाचा मागमूस नसलेला. असा वारा अनुभवल्याबरोब्बर पाणी कुठे आहे, हे नजरेने शोधायला सुरुवात केली. एक फार मोठाही नाही पण अगदीच नगण्यही नाही, असा कालवा सामोरा आला. मनात आले, ही गंगा? अशी कालव्यातून काढली आहे की काय शहरातून? अविश्वास, अविश्वास! ही कशी असेल? नक्कीच नाही. ती तर जगन्नाथ पंडितांची गंगामाई आहे. त्यांनी भोगलेल्या सार्‍या तापत्रयातून त्यांना सोडवणारी. आपल्या अमर्याद मायेची फुंकर त्यांच्या श्रांत, क्लांत मनावर हळूवारपणे घालणारी.. भोळ्या सांबाने पार्वतीचा प्रसंगी कोप सहन करत मस्तकी धारण केलेली गंगा. कोण्या भगिरथाच्या पूर्वजांना उद्धरणारी गंगा. आजही जनमानसाच्या श्रद्धेचे स्थान असलेली गंगामैय्या. ह्या सर्वात मला व्यक्तिश: सगळ्यात भावलेली आहे ती तिची स्वतःच्या सामर्थ्याची असणारी पूर्ण जाण. ती लेचीपेची नाही. तिला स्वतःचे अस्तित्व आहे, त्याची बूज राखणारी. इतरांनीही ती राखावी ह्यासाठी ती सजगही आहे. तिच्यापाशी जे आहे त्यात जराही हिणकस नाही, तर तिने इतरांकडून तरी हिणकस का स्वीकारावे? पुराणे लाख म्हणतात की तिचा गर्व शंकराने हरण केला वगैरे, पण तसे नसावे ते. त्याने तिला जाणले आणि तिचे योग्य स्थान दिले असावे, यथोचित सन्मान केला असावा. तीही तिच्या शब्दाला जागून युगानुयुगे अव्याहत वाहते आहे... पण अजून दर्शन दिले नाही माईने.

मला वाटते, कोणीतरी अत्यंत अविश्वासाच्या आणि धक्का बसल्याच्या सुरात म्हणाले पण! ही गंगा? की माझ्याच डोक्यात माझ्याच मनातले शब्द ऐकू आले होते? कोणास ठाऊक. पण ही गंगा नाहीये, असेही कळाले. हुश्श.. गंगेला बघायला डोळे अणि मन आसुसल्यासारखे झाले होते. कधी दिसेल माई? आत्ता? आत्ता? की अजून थोडे पुढे गेल्यावर? डोळे भरुन बघता येईल का? किती वाचले आहे आणि किती ऐकले होते आजवर तिच्याबद्दल! खूप अपेक्षा, दडपण, आशा वगैरे अशांसारख्या आणि नेमक्या कसल्या ते अजूनही न उमगलेल्या भावना मनात बाळगून मी गंगेची वाट पहात होते आणि एक पूल लागला भला मोठा. गंगेवरचा पूल. मिट्ट काळोखाचा रंग मैय्याने पांघरुन घेतला होता. काहीच दिसत नव्हते, फक्त आवाज येत होता, संथसा. चुबळुक, चुबळूक.. किंवा पलक्, पलक् असा. की लपक्, लपक्? पलक् की लपक् हेच ठरवता येईना. राम की मरा - तसा गोंधळ. शेवटी लक्षात आले की पलक् असो की लपक्, फरक नै पेंदा. पलक लपकतेही सबके मनमें घर बसा लेती हैं माई. उसके बाद भूलना नामुमकीन. आयुष्यभरासाठीची ओढ. तीच मैया, तीच सखी, तिचाच आधार.

अंधारामध्ये नदीला घाट बांधला आहे, हे जाणवले, दगडी सुबकसा, विस्तीर्ण घाट. मनात आले, तिथेच पथारी पसरावी. माईच्या सोबतीने तिथेच शांतपणे झोपून जावे. कोणाची भीती? माई काळजी घेईल. नक्कीच.


क्रमश:

September 20, 2011

प्रवासाच्या सुरस कथा- २





दिल्लीवाल्या कलीगने सांगितलेलं की ठेशनावर उतरुन बावळटासारखी इथे तिथे बघू नकोस. चेहर्‍यावर एक माज, बेदरकारपणा आणून वावर. जमेल का? थोडी इथेच प्रॅक्टीस कर, वगैरे. थोडक्यात त्याला म्हणायचं होतं की इतरांकडे तुच्छ कटाक्ष टाकत वावरायचं. काय कॉन्फिडन्स! कलीगचा हो, माझ्याविषयी! म्हंजे मला झेपणार नाही, हा. अधिक स्पष्ट बोलायचे तर, मी बावळट(च) वाटेन, हा. पण इतकी काय मी अगदीच हे नाहीय्ये हां. त्याला काय बोलायला! अल्पनानेही प्रीपेड टॅक्सी किंवा रिक्षा करायचा सल्ला दिला होताच. कलीगनेही. तर ह्या सर्वांचा सल्ला शिरोधार्य मानून सरळ बाहेर पडले तुच्छ कटाक्ष वगैरे टाकत, तिथलीच असल्यासारखी, स्वातीला सोबत घेऊन. तरी आमचा नवखेपणा रिक्षावाल्यांना आणि टॅक्सीवाल्यांना कसा काय उमजला त्यांनाच ठाऊक, आणि प्रत्येक गावा, शहरात असं कसं घडतं, हेही मला आजतागायत समजलेलं नाही, म्हणजे माझ्याच असं नाही, तर प्रत्येकाच्या बाबतीत. अशा बर्‍याच कथा कहाण्या ऐकल्या आहेत. तुच्छ कटाक्ष पुरेश्या तुच्छपणे टाकायचे राहिले असावेत.

मधमाशांचा थवा यावा तसे सगळे आपले भेनजी, किदर जाना हय वगैरे करत आले. स्वाती सगळ्यांना काय काय उत्तरं देत होती. मी थक्क! अगं चल, म्हणत तिलाही प्रीपेड बूथवर घेऊन आले. तिथेही टॅक्सी आणि रि़क्षावाल्यांचा इतका माज, वैताग होता, खरंच. इतक्या मोठ्या थव्याने सभोवताली गर्दी केली की मला बूथपरेंतही जाता येईना! आत काउंटरवर बसलेला माणूस बाहेर येऊन सक्काळी सक्काळी सगळ्यांना खास दिल्लीवाल्या शिव्या घालून पुन्हा आत बसायला गेला. दोन गोष्टी घडल्या, एक, ह्या लोकांना काहीही फरक पडला नाही. दोन, माझी शब्दसंपदा वाढलेली आहे. आता मात्र जरा डोक्यावरुन पाणी चाललं होतं, मग मात्र व्यवस्थित झापलंच जरासं आणि लगेच काम झालं. निदान बूथपाशी जाऊन रिक्षा बुक करता आली, रस्ता दिला सगळ्यांनी. मर्‍हाठी पाणी हो शेवटी. असो, असो.

रिक्षा घेऊन अल्पनाकडे निघालो. तिला आणि तिच्या कुटुंबियांना प्रथमच भेटणार होतो. उत्सुकता होती.

दिल्लीचा दर्शनी भाग, जिथे राजकीय कार्यालयं आहेत, तो देखणा आहे, ह्याची जाणीव झाली. मोठे, सरळ, सुरेख रस्ते, बिनखड्ड्याचे रस्ते. झाडी. चालणारे ट्रॅफिक सिग्नल्स, सहसा ते पाळणारे लोक. क्वचित एखादा गाडीचालक बेदरकारपणे नियम धुडकावून जात होता. जाता जाता रिक्षा एका वळणावर आली आणि समोर एकदम अमर ज्योतीचं दर्शन झालं.

रिक्षातच होतो, आणि रिक्षा बघता बघता पुढेही गेली खरी, पण त्या एका क्षणामध्ये ती ज्योती, ती बंदूक आणि हेल्मेट पाहून जे काय वाटलं ते शब्दातीत आहे! बघता बघता डोळ्यांत पाणी आणि घशात हुंदका कधी दाटला हे समजलं नाही. रिक्षावाल्याला रिक्षा थांबव सांगून मी ज्योतीचं दर्शन घ्यायला अणि फोटो काढायला जाणार होते, पण शब्दच फुटेना तोंडातून. हे सगळं घडलं काही दोन पाच क्षणातच, रिक्षा खूप लांब गेली, पण सकाळच्या धुक्यातली तेजाळ अमर ज्योती कधी विसरेन असं वाटत नाही. आपल्याच शहीद सैनिकांची आठवण देणारी ती ज्योती आहे, खरं तर मशाल आहे, सतत धगधगणारी. कोण कुठले सामान्य लोक, जिगर बाळगतात, कठीणातलं कठीण प्रशिक्षण पूर्ण करुन सैन्यात शिरतात, अख्ख्या देशाची सरहद सांभाळतात. प्रसंगी जीवाचं मोल देतात. आपल्या घरच्यांपासून महिनोंमहिने दूर राहतात, सगळ्या काळज्या, चिंता, त्यापायी होणारा त्रास, आठवणी, कदाचित कधी पूर्ण न होणारी स्वप्न, साध्या साध्या इच्छा, बहुधा घरच्यांना वेळ देता येत नाही ह्याबद्द्लची खंत, हे असं सगळं आणि अजूनही बरचंस काही मनातल्या मनात कुठेतरी लपवून जराही कुचराई न करता आणि पुन्हा कोणत्याही क्षणी आपला जीव जाऊ शकतो ही शक्यता माहीत असतानाही, जीवावर उदार होऊन आपलं काम चोख करायचं ही मला तरी साधीसुधी गोष्ट वाटत नाही, मग भले कोणी सेंटीमेंटल वगैरे म्हणालात तर म्हणा. मेरी बलासे. त्यांच्या जीवावर मी स्वतंत्र भारतात जगते. ज्या गोळीवर त्यांचं नाव लिहिलेलं असतं ती येऊन शरीरात आदळली की शेवटच्या त्या क्षणी त्यांच्या मनात काय येत असेल? येत असेल? की काही समजण्याच्या पलिकडे क्षणार्धात पोचता येत असेल? ज्या कोणाची कारकीर्द गोळी न खाता संपत असेल, त्यांच्या मनामध्ये कधीतरी गोळी खावी लागेल, हे दडपण कुठेतरी आयुष्यभरासाठी दबा धरुन बसून रहात असेल का? त्याचा एकूणच जगण्यावर कसा आणि कितपत परिणाम होत असेल? हे दडपण संपल्यावर काय वाटत असेल? रितेपणा? सुटल्याची भावना?

ही नोकरी आणि त्यापायी येणार्‍या जबाबदार्‍या, ताणही त्याबरोबर येणारच, त्यात इतकं काय इतकं, वगैरे बुद्धीवादी युक्तीवादही मी ऐकले वाचले आहेत. असं बोलणार्‍यांची, विचार करणार्‍यांची मला आता कीव येते. आधी खूप राग यायचा. नोकरी आहे वगैरे सगळं ठीके हो, पण तरीही मला कौतुक आहे आणि आदरही आहे. काही बाबतींत मी कमालीची सेंटीमेंटल आणि इमोसनल वगैरे वगैरे जे काय असतं ते सगळं आहे. असूद्यात. आपल्याकडे - म्हंजे माझ्याचकडे त्येवडंच हाये.ज्याचा त्याचा नजरिया. असो. पुढे चाललो होतो...

दिल्लीचा हा बाहेरचा दर्शनी भाग जसा बाजूला पडला तसं दिल्ली शहर एकदम दिल्ली गाँव वाटायला लागलं. ए़कदम गाँवकी मिट्टीकी याद, सौंधी सौंधी खुशबू वगैरे. एकदम घरेलू दिसायला लागली दिल्ली. बघता, बघता अल्पनाचं घर आलं, अल्पना बाहेरच उभी होती आमच्यासाठी. तिच्या कुटुंबियांनीही फार अगत्याने आगत स्वागत केलं. आम्ही तिच्या घरात घुसून हक्काने सॅक्स तिथेच बैठकीच्या खोलीतच आपटल्या. पसारा झालाच, पण परक्या ठिकाणी नव्हतोच. पुढच्या प्रवासात आंघोळीच्या पाण्याची चैन वगैरे परवडणारी नव्हती, तेह्वा अल्पनाकडे अगदी चैन करुन घेतली! अल्पनाच्या सौजन्याने प्राठे वगैरे खाल्ले. खूप अगत्याने आणि निगुतीने तिने आमची खतिरदारी केली. खूप खूप कौतुक वाटलं. आयामचा थोडक्या वेळात खूप लळा लागला. तितक्यात रैनाही येऊन पोचली होती आणि रिक्षावाल्याने तिला व्यवस्थित गंडवलेलं होतं. जाऊंद्यात झालं, असा विचार केला. कुठे कुठे डोक्याला त्रास द्यायचा हो? चलताय. दुपारी एक वाजता ट्रेकवाला ग्रूप ठेशनजवळच्या हाटेलात पोचणार होता. गप्पा मारता मारता आणि प्राठे खाता खाता तिथे पोहोचायची वेळ झाली आणि आमची सवारी पुन्हा एकदा दिल्ली ठेशनाजवळच्या हाटेलात जाण्यासाठी निघाली. तिथे सगळे जमणार होतो आणि पुढचा प्रवास एकत्र करणार होतो.

तिथे पोहोचून मग रीतसर ग्रूपशी ओळख वगैरे सोपस्कार पार पडले. सगळ्यांनी ओळख करुन दिली खरी, पण त्यावेळी मला बरीच नावं लक्षातच राहिली नाहीत. तुमचं होतं का असं कधी? कळतील पुन्हा हळूहळू, म्हणून मी गप्प बसले, पण मंडळी ट्रेक्स केलेली, अनुभवी दिसत होती, आणि त्याचं मात्र दडपण आलं होतं. भय इथले संपत नाही.. सामान उचललं आणि हरिद्वारला जायच्या ट्रेनीचा पत्ता काढत योग्य प्लॅटफॉर्मवर पोहोचून गाडी आल्यावर आपापल्या जागा पकडून जरा स्थिरावलो. एकूणातच ग्रूपशी जमेल असं वाटायला लागलं, कारण गप्पा आणि टवाळक्या सुरु झाल्याच. दिल खुस हुवी गया! आगाज ये है, तो अंजाम होगा हॅंसी..

हरिद्वारला जायच्या ट्रेनमध्ये बसलो होतो. त्याआधी ठेसनावरुन दरभंगा गेलेली पाहिली. इतकी ठासलेली माणसं. प्रत्येक डब्यामध्ये अजून एक तरी माणूस अजून चढला तर रेल्वेचा डबा फुटेल अशी परिस्थिती. कठीण आहे! गाडी सुटली आणि हळूहळू शहरी भाग मागे टाकून शेती दिसायला सुरुवात झाली. लालसर काळी माती. लांबच लांब, आडवी उभी शेती पसरलेली. पाणथळीच्या जागा. वेगळे वेगळे पक्षी दिसत होते. आणि कसे स्वैर उडत होते, सूर मारत होते... खुशहाल जिंदगी. हेवा, हेवा. माणसाच्या जगातल्या कोणत्याच चिंता नाहीत. सुखी जीव. साहेबांना सगळ्यांची नावे ठाऊक. तेच ते अचंबा प्रकरण पुन्हा एकदा वाटून गेले. आता सगळ्यांच्या गप्पा सुरु. सोबतीला चहा, खाणे वगैरे. मिल बैठे थे सब यार. मध्येच मला उगाच झापड आली. मग, मला गप्पा ऐकायच्यात पण डोळे मिटताहेत, तेह्वा डोळे मिटून ऐकते, सांगून डुलकी वगैरे काढली असावी, कारण मधले फारसे काही आठवत नाहीये. खायच्या वेळी बरोब्बर जाग येत होती मात्र!

हरिद्वारला जायच्या ट्रेनीत बसले होते, तेह्वा एका मैत्रिणीचा फोन आला. स्मिताचा. आम्ही दोघी एकाच शहारात राहून, भेटणं बर्‍याचदा दुरापास्त. तीच ती शहरी घिसीपिटी कारणं. खरीखुरी असली तरी तितकीच वैतागवाणी. आलिया भोगासी टायपाची. तर, तिने फोन केला आणि नेहमीप्रमाणे कुठे आहेस, हा प्रश्न टाकल्यावर हरिद्वारला चाललेय, असं उत्तर ऐकून ती तीही खरोखरची उडाल्याचं मला इथे ट्रेनीत समजलं. मज्जेत हसलोच मग दोघी. मग तिला सगळं सांगितलं ह्या ट्रेकविषयी. गप्पा मारल्या. मी हा ट्रेक करतेय हे ऐकून तिलाच ग्रेट वाटलं होतं, आणि तिचा हा आपलेपणा पाहून, मला.

गाडी हरिद्वारला पोहोचेपरेंत संध्याकाळ झाली होती. हवेत उष्मा होता. हरिद्वारचं स्टेशन मला आवडलं. बाहेरुन स्टेशनलाही एखाद्या मंदिरासारखा आकार दिलेला, मध्यभागी लायटिंग केलेला चमकणारा ॐ. गंम्मत वाटली, कारण नाही, उगाच आपली वाटली. आवडलं. सामान सुमान घेऊन स्टेशनच्या बाहेर पडलो. भरपूर गर्दी. माणसे पुढल्या गाड्यांची वाट बघत बसली होती, पहुडली होती. बायका साड्या वाळवत होत्या. लोकांचे खाणे वगैरे सुरु होते. माहौल निवांत होता. सगळे गंगामैय्याच्या चरणी आपली पापं, चिंता वगैरे वाहून निवांत असणार. माईच्या कुशीत चिंता कसली? तीही सगळं काही स्वीकारुन वाहतेच आहे युगानुयुगे... तिचा तोच धर्म आहे. ठेसनाबाहेरच सामोसे, जिलब्या बनवण्याचे ठेले होते. अजूनही काय काय मिठाया होत्या. काहीच घेतलं नाही पण, एकतर हृषिकेशला पोहोचायचं होतं वेळेत. पुन्हा हरिद्वारला होतो, काहीच नाही तर निदान इतका मोह तरी आवरतो का बघावं, म्हणलं. जमलं तेवढ्यापुरतं तरी. लई झालं, इतकं जमलं तरी खूप आहे.

ठेसनाबाहेर बस घेऊन डायवरबाबा तयार होते. सामान टाकलं आणि हृषिकेशच्या दिशेने निघालो..

क्रमश:

September 14, 2011

प्रवासाच्या सुरस कथा! -१




तर, असच गप्पा करत, रेल्वेच्या कृपेने खाऊ पिऊ करत, वाचत, गप्पा मारत प्रवास चालला होता - दुरांतोमध्ये उत्तम खाणं मिळतं - आणि अवचित बाहेर लक्ष गेलं. मळवली आली होती. काय देखणी दिसत होती! सगळीकडे भरुन राहिलेला ओला हिरवाकंच रंग आणि निळेसावळे, खाली उतरलेले ढग पाहता पाहता, हलके हलके मन शांत होत गेलं. जिथे पाहत होते, तिथे हिरव्या निळ्या रंगाची छटा. पावसाळी सर्द ओलसर हवा.. सावळे ढग तर इतके खाली आलेले की, पटकन उडी मारुन त्यांना हात लावावा आणि त्या धक्क्याने त्यांच्यातून पावसाचे थेंब ओघळतील की काय अशी परिस्थिती. हे कमी की काय म्हणून, उथळ पाणथळी आणि त्यात डोलणारी कमळं (वॉटर लिली), शेतांमधून चाललेली पावसाळी कामं.. माहौल बनत चालला होता.. गुंगत चाललेच होते, इतक्यात एका लयीत चाललेल्या मैफिलीमध्ये करकचून रसभंग व्हावा आणि मैफिल अवचित थांबावी असं झालं! समोरच्या सुंदर दृष्याला दृष्ट लागावी, तसं एक होर्डींग बेंगरुळपणे समोर आलं आणि मग अशी होर्डींगज येतच राहिली अधेमधे. कधीतरी कंटाळून आतमध्ये नजर वळवली. पुन्हा गप्पा, वाचन आणि असंच पडून राहिले मग.

स्वातीने तितक्यात ट्रेक लीडरला फोन केला होता. साहेब आमच्याच ट्रेनीत होते म्हणे, अजून कुठेतरी दुसरीकडे बसले होते. हिला अशी सगळी माहिती असायची. मलाच काही माहीत नसायचं. एकीला दोघी होतो ते बरंच होतं. पुढल्या कोणत्यातरी स्टेशनला गाडी थांबली की दर्शन देणार होते, मनात म्हटलं, याच. अभ्भी आपको मालूम नै की कैसे कैसे मेंबर हय इस ट्रेकमें, आव तो खरं, फिर मालूमच हो जायेगा! - अर्थात हे स्वतःविषयी, म्हंजे माझं स्वगत वगैरे. काळजीच वाटली खरं तर, की आपण नापास होऊ वगैरे. इथे कोणी कधी ट्रेक केलेत? पर्वतीही नाही चढलेय, अजूनही. चतु:शृंगी चढले आहे फक्त. ही माझी ट्रेकबद्द्लची जाण! पाप त्या बिचार्‍या ट्रेक लीडरचं, खरंच. रैनाचे मधे मधे एक दोन वेळा फोन आले, मला वाटतं. आता आठवत नाही नक्की, पण एकदा तरी आलाच. उधरमेंभी सब ठीक चल रहा था.

प्रवासात कधीतरी पुन्हा एकदा बाहेर नजर गेली, आणि काय सांगू! दिल थम गया! वैतरणा चमकत होती. इथून तिथपरेंत! सोनेरी, सावळी, मातकट, मधून मधून चंदेरी. अफाट जलाशय. नजर जाईल तिथे पाणी, पाणी आणि पाणी. आणि एकाच पाण्याला इतक्या छटा? इतक्या देखण्या? जिवंत? काठाकाठाला होडकी होती. जुन्या लहान मोठ्या होड्या. निळ्या, लाल रंगाच्या, त्यांची वल्ही. त्यांचा लाकडी पोत. गाडी थांबली असती आणि दाराकडे जागा असती तर एक फोटो काढणे हा धर्म होता, पण फोटो फोटोपर लिखा हय.. ना गाडी थांबली, ना दरवाज्याकडे जागा होती आणि ना फोटो काढता आला, पण मनामध्ये ठशासारखे ते दृष्य जमून राहिले आहे. कधीतरी तिथवर केवळ फोटोंसाठी जावे, मध्येच कुठेतरी उतरुन फोटो काढावे, असे ठरवले तरी आहे. कुठे तेहतीस कोटींच्या गर्दीत एखादा फोटोदेव किंवा देवी असेल आणि त्यांची कृपा झाली तर, जमेलही, कोणी सांगावे?

गुजराथमध्ये शिरलो होतो. कोणत्यातरी स्टेशनला गाडी थांबून स्वाती आणि साहेब भेटले आणि मग स्वातीबरोबर आमच्या डब्यात आले. मला उगीच धडकी भरली होती की आता काय काय प्रश्न विचारुन हैराण वगैरे करतात काय, अशी. उगीच दडपण वगैरे फुकट, पण चक्क नाही, मस्त गप्पा झाल्या. गप्पांचे विषय अनुक्रमे, आधीचा गेल्याच २ एक दिवसांपूर्वी संपलेला साहेबांचा ट्रेक - आणि लगेच दुसर्‍या ट्रेकवर? मनात प्रश्न घणघणला, मनातल्या मनात आ वासला, नमस्कार घालायच्या तयारीत होतेच - तितक्यात हेही समजले की फुलपाखरं आणि त्यांचा अभ्यास - साहेब करतात -, कुत्रे आणि एकूणातच प्राण्यांचे प्रेम,पर्यावरणाबद्दल जागरुकता - गंगेचं पाणी प्यायचं, कशाला हवं प्लॅस्टीक, असं म्हटलेलं ऐकलं आणि माझिया जातीचे मज... असे वाटून समाधान झाले. ट्रेकची चिंता राहिली नाही. फोटोग्राफी, पक्ष्यांचा अभ्यास, पुस्तकं, हिमालय, ट्रेक जमेल का, अद्ध्यात्म, देवाबाप्पा खरंच आहेत का, साहेब वाद्यं वाजवतात, खास करुन बासरी - आता आहे का! खलासच.. काय बोलावे बासरीबद्दल? सर्व वाद्यांमध्ये मला सर्वात जास्त प्रिय असणारे हे वाद्य. मनाचा एक फार हळवा कोपरा आहे तो. बासरी, तिचे सूर आणि बासरी वाजवू शकणार्‍या व्यक्ती.. जाऊद्यात- आणि असे अनेक विषय. स्वाती आणि साहेब आणि मी ह्यात मी बहुधा अधिक ऐकायचेच काम केले. सार्‍या गप्पा ऐकताना, मग आता राहिलं तरी काय असं वाटून घातलाच, घातलाच नमस्कार. मनातच. खरं सांगू तर कौतुक वाटले, अचंबाही. स्वत:विषयी पुन्हा एकदा वाटलेली इथपासून तिथपरेंत लाज आणि वैषम्य. असं भन्नाट काहीही येत नाही मला. असो. काय काय करतात लोक आणि किती सहजरीत्या. गुणी लोक असतात, खरंच. नायतर आम्ही. जौद्यात.

गप्पा टप्पा करता करता बाहेर हळूहळू अंधार पसरत गेला आणि रात्रीचं आलेलं जेवण आटोपून साहेब स्वस्थानी गेले. जाताना नक्कीच थक्क झाले असावेत. तोवर अज्ञानाची परमावधी म्हणजे काय हे त्यांना लक्षात आलेलं असणार. प्रत्येक लहान मोठ्या व्यवसायामध्ये काही च्यायलेंज नको का? तो हम थे वो च्यायलेंज, बीकॉज ऑफ माय अज्ञान, दॅट वॉज जस्ट देअर! घ्या म्हणावं. मज्जाच होती न् काय!

डोळ्यावर कधी झापड आली, समजलंच नाही. PS वाचायचा प्लॅन होता, तो बारगळलेलाच राहिला.

आणि सक्काळी जाग आली! गुऽऽड मॉर्निग दिल्लीऽऽऽ म्हणत उठलो आणि दुरांतोचा नाश्ता वगैरे संपवून दिल्लीमध्ये उतरून तिथल्या माजखोर - तेह्वाची ऐकीव माहिती, थॅंक्स टू घाबरवणारे कलीग्ज हो, अ़जून काय! -रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांशी पंगा घ्यायला तय्यार झालो. बाहेर पडायचीच खोटी होती...

क्रमश:

September 6, 2011

हिमालयाला पाहण्यासाठी..




आणि, उजाडली, उजाडली! ५ तारीख उजाडली.

सकाळी उठून तयारी वगैरे आटोपली. प्रवासाबद्दल बरीचशी उत्सुकता, थोडंफार दडपण, जराशी भीती, कुतूहल.. कितीतरी वेगवेगळ्या भावना मनामध्ये उमटत होत्या. ते कॅलिडोस्कोपसारखं. एकामागून एक काय, काय विचार. धावताहेत नुसते. दम खा रे मना, म्हणेतोवर, मधेच डोक्यात काय आलं, आणि घरातल्या माझ्या लोकांना उगाच घट्ट मिठ्या मारल्या. न जाणो, तिकडेच कुठे माझा कडेलोट झाला तर काय घ्या! पुन्हा पहायला तरी मिळतील का हे प्रेमळ चेहरे? माझ्यामागे कसे राहतील? माझी आठवण येईल का? मग काय होईल? सैरभैर होतील? कसे सावरतील? तशात आम्ही सारखं, सारखं सांगतही नाही एकमेकांना घरात की I love you वगैरे. कोकणातल्या लोकांच्या तोंडी असली वाक्यं शोभत नाहीत हो - हे असं आमचं आम्हीच ठरवलंय बाकी. जमतच नाही बघा बोलायचं, खरंच. वेळ आली तर जीवही देऊ, पण बोलायचं? ज-म-त नाही. मग समजा, असं काय झालं तर, सिनेमात दाखवतात, तसं मला येता येईल का त्यांना धीर द्यायला भूत वगैरे होऊन? पांढरे कपडे आणि चोप्रास्टाईल वाद्यं आणि बॅकग्राऊंड स्कोअर्स नाही वाजले तरी चालतील. फक्त I should be able to reach out, that's all. अ-ग-दी का-ही-ही विचार येत होते मनामध्ये. माझा बाबा म्हणायचा, की मला उस्फूर्त निगेटीव्ह विचार करता येतात, तेच खरं असावं की काय? Baba knew me so well. I miss you रे. तुला खूप आवडलं असतं मी असा ट्रेक केलेला. तू आसामात भटकला आहेस मला माहिते. I really miss you. आणि शप्पथ, माझ्या डोक्यात हे विचार आले.

ट्रेक कसा होईल? कशी दृश्यं दिसतील, व्हॅलीमध्ये कसली फुलं असतील, हिमालय कसा दिसेल? हिमाचलात शॉपिंग वगैरे जमेल का? अगदीच काही नाही तर, गेला बाजार प्रवास कसा होईल, वगैरे विचार यावेत की नाही डोक्यात? पण नाही, काय तर, हे! अर्थात, ही एक शक्यता होतीच की, पण शुभ शुभ सोचो म्हणे. प्रयत्न जारी आहेत. अचपळ मन माझे, नावरे आवरीता.. हेच शेवटी. विचारांची रेंज अफाट असू शकते हो. लॅंडस्लाईड्सविषयी आधीच वाचलेलं. नेटवर, आणलेल्या पुस्तकात. दिल्लीवाल्या आणि काश्मिरवाल्या कलीग्जनी सांगून ठेवलेलं. तिसर्‍या एका कलीगने, तिकडेच उलथलीस तर लवकर स्वर्गात जाशील, नै का? हा प्रश्न रोज विचारलेला. नियतीचा संकेत वगैरे?? छ्या! असूद्यात. आपला मंत्र विसरनेका नै - जो भी होगा...

घरी लॅंड्स्लाईड्सविषयी सांगितलं नाही तर कमी काळजी वाटेल, हा अजून एक वेडगळ विचार. तितक्यात एक प्रश्न आलाच, "समजा कुठे दरडी वगैरे कोसळल्या तर गं? काय कराल?"

"तर आम्ही थांबू गं. उगाच काळजी काय करत्ये? इतके जण आहोत."

"बरं, फोन करत रहा रोज. नायतर आपलं हिमालय बघाल आणि घरच्यांना विसराल!"

"अर्रे, काय बोलते! नक्की करेन. जिथवर शक्य असेल, तिथवर करेन. पुढे रेंज नसते, काळजी करु नकोस. ट्रेकींग ऑफिसमध्ये नंबर वगैरे दिलेत, काही प्रॉब्लेम असला तर तेच करतील तुम्हांला. जोवर असं काही होत नाही, तोवर सगळं आलबेल असणार. तू काय काळजी करते? वो है ना.. "

वगैरे वगैरे बोलून वातावरण हलकं करायचा प्रयत्न करत, बाहेर पडताना परत एकदा मिठ्या मारुन निरोप घेऊन निघालेच. उगाच गलबलतं की हो लांब निघालं कुठे की.. तेच ते, अचपळ मन माझे..

वेळेवारी रिक्षा वगैरे मिळाली, रिक्षावाल्याकडे सुट्टे पैसे होते आणि त्याने काहीही खळखळ न करता ते मला दिले. भलताच शुभशकून! पुन्हा दुरांतोही पहिल्याच प्लॅटफॉर्मला लागलेली. जिने वगैरे चढून पुढच्या प्लॅटफॉर्मवर जायची बात नस्से. वा, वा वा. शुभशकून नंबर दोन. गर्दी गजबजली होती. बसायला जागा नव्हती. सॅका घेऊन कुठे ठिय्या जमवावा ह्या विचारात असताना, एक डेहराडूनवालं दांपत्य पुण्यातल्या आपल्या मुलांना भेटून परत चाललं होतं, त्या माऊलीने हाक मारली, जागा दिली. तिसरा शुभशकून. प्रवास उत्तमच होणार ह्याबद्दल आता मला शंका नव्हती. हसतमुखानं गप्पा मारल्या, सुखदु:खांची देवाणघेवाण थोडीफार. त्यांच्या वागण्यातला सरळपणा, मोकळेपणे बोलायची पद्धत फार आश्वस्त करुन गेली.

अकरा वाजता ट्रेन निघणार होती. साडेदाहापरेंत स्वाती पोहोचणार होती, म्हणून मी निवांत होते. तितक्यात घरी फोन करुन नेटावरुन आमचे बर्थ नंबर वगैरे डीटेल्स घेतले. आता स्वाती आली की झालंच. मध्ये एकदा तिला फोन लावला आणि आलेच, इथ्थेच आहे,असं ऐकून निवांत झाले. वाटेत वाचायला पुस्तक घेतलं होतंच. आता जागेवर बसलं की वाचनेका, गप्पा मारनेका वगैरे. पण ठहरो! अजून स्वाती नै आली! आता जरा टेन्शन आलं. पावणेअकरा झाले होते. रैनाला मध्ये एकदा फोन केलेलाच होता, पण आता परत एकदा एकदम टेन्शनमध्ये फोन केला की समजा, स्वाती नाही आली, तर मी तरी चढणार आहे हां ट्रेनमध्ये. मनामध्ये, कुठे अडकली ही आता? फटके द्यायला हवेत! वेळेत यायला काय होतं? साडेदहाला इथे भेटायचं ठरलेलं ना! इ. इ. इ! समजून घ्यालच, पण तितक्यातच ती शांतपणे आली. कुठे ट्रॅफिकमध्ये अडकली होती. आम्ही थांबलो होतो, तिथेच जवळ आमचा डबा होता. बसलो. दोघींनाही खालचे बर्थ, खिडक्या. और क्या चाहिये एक खुशनुमा सफर के लिये?

गाडी सुरु झाली. स्थिरस्थावर होऊन गप्पा मारत, पुस्तकं वाचत, मासिकं चाळत प्रवास सुरु झाला. इथे PS - I love you हे पुस्तक विकत घेतलंच. काहीतरी लाईट वाचायचं होतं. ह्या पुस्तकाची गंम्मत सांगेन मग.


क्रमश:

September 1, 2011

देवभूमीला जाण्याआधी...२




स्वाती माझ्याबरोबर पुण्याहून प्रवासात सोबत असणार होती. म्हणता म्हणता ५ तारीख उजाडणार होती. पण कितीतरी कामं अजून बाकीच होती! खरेदी व्हायची होती, इतिकिटांच्या प्रती प्रिंटायच्या होत्या, रैना आणि स्वातीशी पुन्हा थोडं व्हॅलीबद्दल, होणार्‍या प्रवासाबद्दल बोलायचं होतं, हे कमी म्हणून बरीच लक्षात न येणारी, कदाचित अ‍ॅक्च्युअलमध्ये नसलेली पण व्हर्च्युअलमध्ये विनाकारण मला भेडसावणारी, करायची राहिलेली खूऽऽऽपशी कामं आ वासून माथ्यात आणि माथ्यावर थयथयाट करत होती! दिवसभराचं ऑफिस आणि इतर कामं सांभाळताना आणि प्रवासाची तयारी करताना तारांबळ मात्र भरपूर उडाली. शेवटी प्रवासाच्या आदल्या वीकांताला इंच इंच लढवूच्या थाटात मी सगळ्या आवश्यक खरेदीचा फडशा पाडला. हुश्श! आता आमचं आरक्षण नक्की झालं का पहायचं होतं आणि जर ते झालं नाही तर काय, हा एक प्रश्न भेडसावत होता, वाकुल्या दाखवत होता आणि जे काय तत्सम करुन डोक्यावरचे केस पिकवता येतील ते सगळं करत होता! स्वातीही मला मध्ये मध्ये फोन करुन हाच प्रश्न विचारुन घाबरवत होती. तिच्या प्रश्नांना उत्तरंच नसायची माझ्याकडे कधीकधी. जपा, जपा तोच मंत्र जपा, जो भी होगा, देखा जायेगा... ठीके? ओक्के. ते राजधानीचं सांगायचं राहिलंच आहे, नैका? सांगत्ये तेही ओघाने..

तशात, मध्येच स्वातीला आपण येताना राजधानीने यायच्या ऐवजी फ्लाईट घेऊयात, असं वाटायला लागलं आणि योग्य फ्लाईटची शोधाशोध सुरु झाली! पण एकूणातच ते त्रासदायक ठरणार आहे अशा निर्णयाप्रत मी आले आणि त्याला कारण म्हणजे, दिल्लीमधे आयुष्य घालवून आता पुण्यात येऊन नोकरी करणार्‍या आणि पुन्हा कधीही दिल्लीला जायची स्वप्नं न पाहणार्‍या कलीगकडून ऐकलेल्या दिल्ली रेल्वे ठेसन ते दिल्ली एअरपोर्ट ह्या प्रवासाच्या सुरस कथा -ट्रॅफिक इन्क्लूडेड, माइंड प्लीजच. तेह्वा स्वातीचा बेत, आपलं सामान आपणच वहायचं आहे, ह्या बागुलबुवाच्या मागे लपून हाणूनच पाडला. बाईसाहेबांना दिल्लीत शॉपिंग करायचं होतं! किती उत्साह आहे ह्या मुलीला! भारी कौतुक वाटलं. ट्रेकनंतर शॉपिंग करायची शक्ती उरलेली असेल का, हा प्रश्नही तिच्या मनात आला नव्हता. काय म्हणायच? हा उत्साह असाच राहूदेत इतकंच म्हणते.

सॅक्स भरायचं अजून एक मुख्य काम बाकी होतं.. सामान वगैरे भरायला मला जाम कंटाळा येतो. पहिल्या फटक्यात मनाला येईल अश्या प्रकारे मी कधीच बॅग व सॅक भरु शकलेले नाहीये. आजवर तसा बर्‍यापैकी प्रवास झालेला आहे, तरी दर वेळी नवीन च्यायलेंज असतं हे एक! ह्यात काहीच फरक नाही. कधीकधी मी इतका कंटाळा केला आहे, की प्रवासाच्या काही तास आधी नाईलाजाने बॅग भरलेली आहे. असो. तर काय म्हणत होते, की प्रवासाचा कंटाळा नाही येत, पण सामान भरायचा मात्र येतो, तेह्वा ते सॅका भरायचं सतत उद्यावर ढकलत होते, पण सामान एकत्र करुन ठेवलं होतं मात्र. जणू काय ते आपण होऊनच सॅकमध्ये जाऊन बसणार होते, आपसूक. आता असं होत नाही, पण तरीही आशावादी राहून चांगल्या इच्छा मनात धरायला काय हरकत आहे? नै का?

घरुन फिदफिदत आहेर मिळालाच, "सामान जाईल सॅकेत | आधी भरलेचि पाहिजे ||" असूद्यात, असूद्यात. एवढं काय नै, आणि सामान एकत्र ठेवणं ही तितकंच महत्वाचं आहे. पटपट मिळतं भरायच्या वेळी. घेतलं ना भरायला एकदा, की धा मिनटांत आटपून टाकीन, हाय काय अन् नाय काय! असं म्हणत, आणि त्यावर घे तरी एकदाचं मग. बाई येतात त्यांना केर काढायला त्रास होतो.. असा आहेर मिळाला. बघा आता! २ दिवस एका कोपर्‍यात सामान काय ठेवलं इतकूस्सं तर लगेच अडचण व्हावी का हो? काय काय करावं माणसानं? नोकरी, खरेदी, हिमालयात ट्रेकींग, पुस्तकवाचन, तिकिटं बुक करणं, व्हॅलीत जायच्या आधी व्हॅलीची माहिती देणारी काही पुस्तकं आहेत का शोधणं.. एक जान भला क्या क्या करेगी? चार तारखेच्या रात्री, दहाच्या पुढे एकदाच्या सॅक्सही भरल्या. ऑफिसमधून घरी येऊन भरल्या हो! त्याचं काय कौतुकच नव्हतं आणि कोणाला! तुलाच जायचं आहे ना हिमालयात, मग हे करायलाच पाहिजे ना हे सगळं, असं सडेतोड आणि मुद्देसूद उत्तर ऐकून गप्प बसले. काय करणार? खरंच की ते. सगळ्यांचा कोकणी पिंड आणि त्यातून पुण्यात स्थायिक. तस्मात् सडेतोड उत्तरं, खरी उत्तरं वगैरेंना आमच्या घरात तोटा नाही. मुबलक प्रमाण आहे. फालतू लाड आणि खरोखरचं कारण नसेल तर समोरच्याला काय वाटेल वगैरे भानगड नस्से. त्यामुळे विचार करुनच बोलावे लागत अस्से. फालतूपणा चालत नस्से हा मुद्दा.

तेह्वा गपगुमान सॅक्स भरायला सुरुवात केली आणि काय सांगू चिमित्कार म्हाराजा! एकदम फिट्ट आणि मस्त बसलं की सगळं सामान, पैल्या फटक्यात. जय हो! स्वतःचं सामान स्वतःच वाहून न्यायचं असल्याने मोजकंच सामान घेतलं होतं, त्याचाही फायदा सॅक भरताना झाला असणार. नक्कीच. काही का असेना, मनाजोगतं पॅकींग झालं होतं. ४ तारीख संपली. झोप. थकल्यामुळे २ मिनिटांत ठार.

एक सांगायचं राहूनच गेलं. व्हॅलीची माहिती देणारं एक तरी पुस्तक मिळावं म्हणून हाताशी असलेल्या तुटपुंज्या वेळामध्ये दुकानं पालथी घातली होती. मिळालं का? तर हो, मिळालं. जसं हवं तसंच मिळालं. पुस्तक मिळाल्याचा मात्र मनापासून आनंद झाला.

दुसरं म्हंजे येताना दुरांतोची आणि आमची वेळ जुळत नव्हती, तेह्वा मुंबैपरेंत राजधानीने येऊन तिथून पुढे बस, टॅक्सी, रेल्वे जे काही मिळेल ते रामभरोसे घ्यावे असा विचार केला होता. जिंदगीमें थोडा डेरिंग जरुरी हय. तर राजधानी मुंबई सेंट्रलपरेंत आहे, पण सेंट्रल हे वेगळे ठेसन आणि शिवाजी टर्मिनस हे वेगळे हे ज्ञान मला वेळेवारी नसल्याने - आता नाय म्हायती! काय करायचं? - मी त्याला शिवाजी टर्मिनस समजून तिथूनच येताना आपल्याला पुण्याची गाडी पकडायला कित्ती सोपं असे समजून सुखात होते. यथावकाश सगळ्यांनी मिळून ज्ञानदान करुन शहाणे करुन टाकिले आणि अजून एका धडकीने मनात घरटे केले. एव्हांना अशा अनेक धडक्यांची घरटी बाळगून मनाची घरटी-चाळ झाली होती!

रैना, मी आणि स्वाती निघण्यापूर्वी एकदा कॉन्फरन्स कॉल करुन बोललो. बोललो कमी आणि एकूणातल्याच अज्ञात प्रवासाच्या थोडयाफार टेन्शनमुळे येड्यासारख्या हसलो जास्ती. तिघींनाही तिघीही मनातून बर्‍यापैकी टरकलो आहोत हे समजले. तरीही एकमेकींच्या सोबतीमुळे आश्वस्त होतो. स्वतःची चिंता नव्हती. हे किती मह्त्त्वाचे काम किती सहजगत्या झाले होते!

आता प्रत्यक्ष प्रवासाची सुरुवात करुन अनुभव घ्यायचे मात्र राहिले होते. बाकीचा फापटपसारा मागे पडला होता. आम्हीही आता तयार होतो.

क्रमश:

August 30, 2011

देवभूमीला जाण्याआधी..१



हिमालयात कधीतरी एकदा जायचंच होतं. असा अचानक योग येईल, अशी मात्र सुतराम कल्पना नव्हती. रस्ते रस्तेपर लिख्खा हैं भटकनेवालेका नाम, हेच आणि असंच असावं बहुधा. तरीही इतकं सोप़ंही नव्हतं. घरातल्या अडचणी, ऑफिसच्या नेहमीच्या डेडलाईन्स अणि रिसोर्स क्रंचच्या नावाखाली आपल्यावर आलेल्या, खास करुन स्वांत सुखाय सुट्टीचे बेत आखताना नकोशा वाटणार्‍या पण पार पाडायलाच लागणार्‍या जबाबदार्‍यांच्या अडचणी. (नाही म्हणून सांगत्येय कोणाला! आणि सांगितलं तरी ऐकून कोण घेतंय! - हा मुख्य कळीचा मुद्दा. असोच असो.) नेहमीची रडगाणी खरी, पण व्यवस्थित पाय ओढणारी आणि सुट्टीचे बेत धाब्यावर बसवणारी, पण ह्या वेळी ठरवूनच टाकलं होतं की एक तो ब्रेक बनता हय म्हंजे हयच!

तेह्वा बॉसला सांगितलं की मी ट्रेकला जाणार आहे, मला सुट्टी हवी आहे. तर म्हणाला, कुठे? म्हटलं, व्हॅलीत. तर म्हणे, तुला झेपणारे का? कुजकट्ट!! म्हटलं, होऽऽ न झेपायला काय झालंय? मला सवय आहे ट्रेक्सची. दडपलं होतं धादांत. काय करु? मजबूरी. तरीही जणू स्वतःच्याच सुट्ट्या मला वापरायला देणार असल्याच्या थाटात, त्याने निर्णय न देता आणि सुट्टी देणं किती कठीण आहे हे सांगत, शेवटी, धड होही नाही आणि नाहीही नाही, अशी मान हलवली आणि कामात गढून गेला. उत्तरं द्यायची नसली की नेहमी असाच कामात गढतो. मनात म्हटलं, ऐसा क्या? ओक्के. तरी माझ्या अनुपस्थितीतल्या कामाची काळजी घेतलेली आहे हे सांगितलं होतं हां मी त्याला, तरीही... मग आता ही सरासर नाइन्साफी का ऐकून घ्यावी? का? का? का? दुसरी क्लुप्ती वापरायला लागणार होती. प्लॅन नंबर दोन. गनिमी कावा.

भारताबाहेरच्या देशांत माझे दोन मॅनेजर्स आहेत आणि त्या त्या देशांतले आहेत, हे फार पथ्यावर पडलं. त्यांनाही ट्रेकींगची आवड आहे, हे अजूनच. त्यांना सुट्टीचं विचारलं, कारण सांगितलं, आणि कामाची सोय लागली आहे ना इतकं पाहून कसलीही खळखळ न करता सुट्टी मिळाली. है शाबास! आता इथल्या मॅनेजरला नाही म्हणायला काही कारण उरलं नाही. ठेंगा! मैं तो चली!

हे सगळं होत असतानाच दुसरीकडे आधी काही दिवस मायबोलीवरच्या मैत्रिणींबरोबर बोलताना, व्हॅलीला जावं की न जावं, ह्याच वर्षी जावं की पंचवार्षिक योजना आखावी ह्या आणि तत्सम विषयांवर सतत पोस्टींच्या रुपाने परिसंवाद घडले. रैना आणि स्वाती तर सोबत येणारच होत्या. तेच, तेच आणि परत तेच, तेच बोलत होतो -किंवा लिहित होतो, का कोणास ठाऊक. कदाचित, एकमेकींना धीर द्यायचा प्रयत्न करत होतो. न येणार्‍या मायबोलीकर मैत्रिणीही जायला उत्तेजन देत होत्या, धीरही देत होत्या आणि उत्साह वाढवत होत्या. . . हळूहळू वातावरण निर्मिती होत होती.. या सगळ्या गोंधळातच कधीतरी थोडीफार मानसिक तयारी झाली असणार. घरीही सूतोवाच केलं. घरी नाही म्हटलं नसतंच आणि नाहीही. अगदी आनंदाने जा आणि मजा करुन ये असंच सांगितलं. खूप बरं वाटलं ऐकूनही. नाही म्हणायला, एकदम हिमालयात कुठे चालली फिरायला आणि सगळं व्यवस्थित जमेल ना, अशी काळजी मात्र बोलून दाखवली, कारण मी सहसा ट्रेक्स करत नाही आणि केलेही नाहीयेत, पण ठीके, जा असं म्हटल्यावर आता जाऊन फक्त पैसे भरायचेच बाकी होते. तेही एक दिवस केलं.

ट्रेकींग ऑफिसमध्ये जाऊन फार वेड्यासारखे येडपट प्रश्न विचारले आणि त्यांची तितकीच शांतपणे दिली गेलेली उत्तरंही ऐकून घेतली. उत्तर देणारे गृहस्थ नक्कीच आपल्या मनामध्ये हसून माझी कीव करत होते, तेही ऐकू आलं आणि अंतर्दृष्टीला दिसलंही. हे गृहस्थ स्वतः ट्रेक करतात. अगदी बिनधास्त. फिटनेस आहेच. जगात मी सोडून सगळे फिट असावेत बहुधा. ये सिच्युएशन बदलनाईच पडेंगा. . मनातल्या मनातच त्यांना दंडवत घातला!

स्वतःची अगदी लाज, लाज वाटली, आणि ते चेहर्‍यावरही उमटल असलंच पाहिजे, कारण त्यांनी अगदीच मवाळ सुरात ट्रेकींग कसं सोपं असतं आणि घाबरायचं काहीच कारण नाही, हे सांगत आमची जवळपास समजूत काढायला सुरुवात केली. काही नाही होऽऽ, अगदी मस्त असतं तिथलं वातावरण आणि इतका सुंदर निसर्ग असतो आपल्या आसपास, ते बघत चालताना आपण कधी रस्ता पार पाडतो कळतही नाही! हे आणि वर. ह्म्म.. बऽऽरं. आमची समजूत काढायला आणि धीर देण्यापोटी ते बोलत होते, पण ऐकताना मणामणाचं दडपण येत होतं. कोणी एखादी गोष्ट सोप्पी आहे असं चारदा सांगितलं, की त्यात खूपच खाचखळगे असतात आणि सोप्पी वगैरे तर ती मुळीच नसते, हा माझा अनुभव आहे! इथेही हाच्च फॉर्म्युला लागू पडणार ह्याबद्दल आता मला तिळमात्रही शंका उरली नव्हती! पण क्या करें? मुळात कधी ट्रेक केला नसल्याने मला जर हा ट्रेक जमला नाही, तर माझ्यामुळे इतरांची गैरसोय होईल का, ही भीती आणि चिंता मला फार छळत होती. तेही त्यांना बोलून दाखवलं. नाही, नाही असं नाही होणार असं आश्वासन मिळालं, त्याचाच आधार घेतला आणि आणि मनाला बजावलं की आता मागे फिरायचं नाही म्हणजे नाही. जो भी होगा देखा जायेगा..

पण एवढ्यानेच संपलं नव्हतं, दुरांतो जलद एक्स्प्रेसने ५ तारखेला निघणार होतो, आणि अजून तिकिटं बुक व्हायची होती. ट्रेनच्या तारखा, आमच्या जायच्या तारखा, ट्रेकच्या तारखा वगैरे सगळं एकमेकांशी जुळवत एकदाचं ते काम मार्गी लावलं आणि मग रोज वेटींग लिस्ट तपासायची आणि आपल्याला तिकीट मिळतं की नाही, ह्या काळजीची भर झाली! शेवटी जायच्या २-३ दिवस आधी ते कन्फर्म झालं, तसं हुश्शं केलं अन् म्हणलं, चलो दिल्ली! अल्पना के घर..!

क्रमश:

February 18, 2011

मते द्या! :)

मी एका प्रकाशचित्रण स्पर्धेत भाग घेतला आहे, आणि ह्या स्पर्धेत मी जी प्रवेशिका पाठवलेली आहे त्यावर मतांची आवश्यकता आहे, तेह्वा मी स्पर्धेत समावेशित केलेल्या प्रकाशचित्राला मते द्याल का? मत देताना, डुप्लीकेट मते होऊ नयेत म्हणून स्वतःला रजिस्टर करणे आवश्यक आहे.

पुढील दुव्यावर जाऊन आपली मते नोंदवा.
http://photocontest.iexplore.com/images/view/2490

आभार आणि मनापासून धन्यवाद :)

January 11, 2011

वाटले होते...!

तुझे खोटे बहाणे लाघवी का भासले होते?
कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते..

जराही वाव नाही राहिलेला वादसंवादा,
दुराव्याचे धुके दोघांमधे कोंदाटले होते

नको शोधूस शब्दांतून ओलावा उगा आता,
झरे डोळ्यांतले माझ्या कधीचे आटले होते

किती होतास हट्टी प्रेषिताच्या भूमिकेसाठी
किती केलेस कांगावे! कधी हे घाटले होते?

युगांच्या सोबतीचा अंत होतां, मूक मी साक्षी,
कसे सांगू? मनामध्ये उमाळे दाटले होते...