August 31, 2008

माझं गणेशोत्सवातलं लिखाण

गणपतीच्या दिवसांत, मायबोलीवरही ई - गणेशोत्सव साजरा होतो. यावेळी, गणेशोत्सव संयोजक समितीने काही लिहिणार का विचारले आणि मीही होकार दिला. ज्या प्रकारचे लेखन करायचे होते, त्याची रुपरेखा डोक्यात तयार होती आणि आंतर जालावर खूप माहिती उपलब्ध असेल, असा मला जालावर तपासून पाहण्याआधीच आत्मविश्वास होता, अन् जालावर भक्तीही!! :D

जेह्वा शोधायला सुरुवात केली, तेह्वा मात्र मी दिवसागणिक मी जरा हिरमुसली आणि मग, मग नर्व्हस होत गेले!! मनासारखं काही मिळेना! कदाचित माझंही चुकलं असावं काही बघताना! कोणास ठाउक! असो. शेवटी, जालावरची माहिती पुरेशी नाही या निष्कर्षापर्यंत येऊन पोचले. आपली कागदवाली पुस्तकंच खरी शेवटी!! - आणि तो नवीन पुस्तकांचा वास! अहाहा! - आणि मधे एकदा पुण्यालाही जाणार होतेच, त्यामुळे एवढी चिंता नव्हती. गणपतीवर पुस्तक भांडार असेल अप्पा बळवंतांकडे, याची खात्री होती!! वाचायला, अभ्यास करायला बरच काही मिळणारच होतं, शेवटी विद्येच्या माहेरघरी नाही मिळणार तर कुठे?? पण, सुरुवात तरी निराशाजनकच झाली. म्हणजे पुस्तकं होती भरपूर, पण स्तोत्रं, पुराणं अशी, किंवा मग पुराणातल्या कथा, गणपतीची स्थळं वगैरे. आता? आणि बाकीची कामंही होतीच की इतक्या दिवसांनी घरी गेल्यावर!! त्यामुळे अमुक एका वेळातच शोधकार्य आटपतं घ्यायचं होतं.

पण, अप्पा बळ्वंतांकडे जायचा मोठ्ठा फायदा म्हणजे जुनी पुस्तकं, जी पुनर्प्रकाशित होत नाहीत - आणि हवी ती माहिती नेमकी त्यांतच असते!! - त्यांची नावंही दुकानदारांना माहित असतात!! तुम्हांला त्या पुस्तकाबद्दल खरच कळकळ आहे असं जाणवलं तर ते तुम्हांला ते पुस्तक कुठे मिळू शकतं हेपण ते सांगतात. तुम्हीं तिथे नेहमी जात असाल, पुस्तकांबद्दलच तुमचं प्रेम त्यांना माहित असेल तर तुमचं चक्क हसून स्वागतही करतात, अगदी अप्पा बळवंतवरचे असले तरीही!! :D

तर, त्या दिवशी अप्पा बळवंतवरचं प्रत्येक दुकान मी चढले आणि उतरले!! शेवटी बाप्पालाच साकडं घातलं, "म्हटलं हे रे काय बाप्पा?? एवढी पण मदत नाही का रे करणार तू??" आणि शेवटच्या दुकानात शिरले. तिथं दुकानाचं नूतनीकरण सुरु होतं मनात म्हटलं, होतय की नाही काम इथे बाप्पाच जाणे!! कारण, सगळं काही बासनात गुंडाळून वरच्या माळ्यावर टाकलेलं दिसत होतं, पण, खूप बरही वाटलं! चक्क पुस्तकाच्या दुकानाचं नूतनीकरण!! म्हणजे दुकान चांगलं चालतंय म्हणायच!! वा, वा!! :) दुकानात शिरुन मला कश्या प्रकारचं पुस्तक हवं आहे ते दुकानदार काकांना सांगितलं. त्यांनी काही पुस्तकं माझ्यासमोर टाकली. ती सगळी मी आधीच पाहिली आहेत, आणि अशी नको आहेत, म्हटल्यावर, म्हणाले, "मग १५ -२० मिनिटं थांबतेस का, आता माझा मुलगा आला बाहेरुन, की वर काही आहेत, त्यापैकी काढून द्यायला सांगतो."


मी थांबले, आणि त्या १५-२० मिनिटांत दुकानात शिरलेल्या लोकांचे प्रश्न आणि त्यांना तेवढीच मासलेवाईक उत्तरं देणारे काका यांच्या जुगलबंदीने माझी भलतीच करमणूक झाली!! त्याचं एक वेगळं पोस्ट टाकता येईल मासलेवाईक!! १५-२० मिनिटांनी त्यांचा मुलगा आला, आणि शेवटी मला हवं होतं तस एक पुस्तक मिळालं. लग्गेच घेऊन टाकलं!! दुसरं, गणेशकोष, आता मिळत नाही, पण पुणे मराठी ग्रंथालयात किंवा भांडारकरला मिळेल, हेही सांगितलं. पुणे मराठीला गणेशकोष सापडला. काय अफाट संकलन आहे त्या पुस्तकात!!


शेवटी बाप्पाला माझी दया आलीच होती तर!!


तर, दोन्ही पुस्तकांच्या आधारे, हे काही लेख लिहिले. अश्या प्रकारचं लेखन पहिल्यांदाच केलं, श्रीगणेशाच केला म्हणा ना!! तेच हे लेख इथे पुढच्या पोस्टपासून टाकणार आहे.


गोड मानून घ्या ही विनंती.

August 30, 2008

कवितांचा खो खो

संवेद आणि मंडळींचा कवितांचा खो वाचत होते. किती सुरेख कविता उतरवताहेत सगळे! वाचताना सुद्धा इतक छान वाटतं! सगळ्यांना या नेक कामाबद्दल खूप मनापासून धन्यवाद.

खरं तर आता वाचन खूपच कमी झालय - खरं तर बंदच - याची खूप खंत आहे, त्यामुळे मनातून एकीकडे स्वतःलाही खो मिळावा असं वाटत असताना तो मिळण्याची भीतीही होती मनात. मिळाल्यावर पटकन् लिहायला कविता आठवयाला हवी, लिहायला वेळ मिळायला हवा... वाचन कमी झालं की अशीही भीती वाटते दोस्तहो..... हसू नका :( आणि, आवडणार्‍या कवितांमधे डावं उजवं तरी कसं करायच? ते आणखीनच कठीण काम!!

हल्ली ब्लॉगवर येणंही कमीच झालय. कामाचा हिमालय, दुसरं काय?? :( मात्र, एक आवडतं कामही करतेय, ते लवकरच वाचायला मिळेल मायबोलीवर साजर्‍या होणार्‍या ई -गणेशोत्सवात :) असो, विषयांतर नको. तरी सुदैवाचा आणि महत्वाचा भाग असा की शब्ददेखण्या आणि अर्थगर्भी कवितांची मराठी सारस्वतात काहीच कमी नाही. आपल्याला फक्त आवडलेली कविता ब्लॉगवर उतरवण्याचं काम!! ते एक बरं आहे!! :D


तर, विशाखाने मला खो दिल्याबद्दल तिचे खूपच आभार. असं, खो वगैरे मिळाला की ब्लॉगविश्वात आपली दखल घेतली जातेय वगैरे वाटून मला एकदम सही वाटायला लागतं!! विशाखा, इथे दोन कविता पोस्ट करतेय, पण दोनच कविता पोस्ट करायच्या हा खूप अन्यायकारक आणि जाचक नियम आहे!! संवेद, प्लीज नोट! :D पण, तो का घातलायस, हे आलं थोड फार ध्यानात. 'घेता किती घेशील दो करांनी' अशी अवस्था! हा खो सुरु केल्याबद्दल आभार.

नंदन, माझं स्वतःचं पोस्ट नाहीय, पण ही नवीन पोस्ट टाकली पहा :) गोड मानून घे

तर, ह्या कविता, पटकन् आठवलेल्या.

राधा-कृष्णाच्या नात्यावर किती वेगवेगळ्या अंगांनी लिहिलं गेलंय, पण राधा आणि अनय? अनय हा राधेचा नवरा.

अनय

नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात;
मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती
हे समजलं होतं त्याला, अगदी पहिल्यापासून,
तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला घेता न येणारी
ओळखून होता तो आतून, आतून, खोल मनातून
तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना
त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे,
आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंदकळणारे
धुंदमदिर निळे तळे.

त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती
अमराचा अळता लावलेली तुझी पावले
घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता;
काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने;
तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता
पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना;
रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना;
मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना;
पिसावताना, रसावताना,
अस्तित्वाचा कण न्‌ कण
प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना.

कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची;
दु:खाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची;
कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची.
तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर
हरवली नाहीस, स्वत्व सांभाळून उरलीस तशीच, हेही कळलं
त्यानं पुढे होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला,
त्या क्षणी, राधे तुला तुझा पुरुष भेटला.
पुरुष-जो क्षमा करून नाही ऋणी करत;
पाठ फिरवून नाही उणी करत;
घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;
आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो.
राधे, पुरुष असाही असतो!

- अरुणा ढेरे, ’मौज दिवाळी’ २००४

कितीतरी
आवडणार्‍या कविता इथे लिहायचा मोह होतोय!! एक वेगळा ब्लॉग उघडावा लागेल आता त्यासाठी!! :P

ही अजून एक, इंदिरा संतांची. एखादी व्यक्ती किती अलवार लिहू शकते याला काही मर्यादा??

कुब्जा

अजून नाही राधा जागी,
अजून नाही जागे गोकुळ;
अशा अवेळी पैलतीरावर,
आज घुमे का पावा मंजुळ।

मावळतीवर चंद्र केशरी,
पहाटवारा भवती भणभण;
अर्ध्या पाण्यामधे ऊभी ती,
तिथेच टाकून अपुले तनमन.

विश्वच अवघे ओठां लावून,
कुब्जा प्याली तो मुरलीरव;
डोळ्यांमधूनी थेंब सुखाचे,
हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव...

- इंदिरा संत

आणि संवेद, तू घातलेला नियम मोडतेय, सपशेल माफी मागते, पण अगदीच राहवलं नाही रे!! ही अजून एक जीवघेणी गजल, सुरेश भट यांची.

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल,
अन्‌ माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल!
मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नांत चूर;
तिकडे पाऊल तुझे उंबऱ्यात अडखळेल!
विसरशील सर्व सर्व आपुले रोमांचपर्व,
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल!
सहज कधी तू घरात लावशील सांजवात;
माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल!
जेव्हा तू नाहशील, दर्पणात पाहशील,
माझे अस्तित्व तुझ्या आसपास दरवळेल!
जेव्हा रात्री कुशीत माझे घेशील गीत,
माझे तारुण्य तुझ्या गात्रांतुन गुणगुणेल!
मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद;
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल!

- सुरेश भट

हैं सबसे मधुर वो गीत जिन्हें हम दर्द के सुर में गातें हैं, हेच खरय! !!

माझा खो श्यामलीला, द किंगला आणि तिसरा खो अरुणला. लिहिताय ना??


कवितांचा खो खो: खेळाचे नियम -

१. कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? हरकत नाही, आठवतं तेव्हढं लिहा. कवीचं नाव मात्र अवश्य लिहा.

२. एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम? या वेळी तुम्ही तुमच्या सध्या आवडणारया टॉप २ कविता लिहु शकता आणि कवितांच्या प्रमाणात खो देखील देऊ शकता. जेव्हढ्या कविता तेव्हढे खो (जास्तीजास्त अर्थात २)

३. खो खो नीट चालवण्याची जबाबदारी अर्थात सारयांचीच. त्यामुळे तुमच्या पोस्ट मधे तुम्ही ज्या/जिला खो देताय, त्या/तीचं नाव तर लिहाच, शिवाय त्या/तिच्या ब्लॉगवर ही खो दिल्याची नोंद अवश्य करा.

४. कविता का आवडली किंवा कवितेचा अर्थ किंवा काहीच स्पष्टीकरण अपेक्षित नाही.

५.अजून नियम नाहीत :)

नियमपण पोस्ट केले, नियम माहित नव्हते,संवेदच्या ब्लॉगपर्यंत जायचा कंटाळा आला, ब्लॉग सापडला नाही, अशी कारणं नकोत द्यायला कोणी!!!! :D