July 5, 2010

पुस्तक परिचय: युगांत

रामायण आणि महाभारत. भारतवर्षाची स्वतःची, आपली अशी २ महाकाव्ये. मात्र दोन्हीं काव्यांमधे खूप फरक आहे. आदर्शवाद हे रामायणाचे बलस्थान. इतके, की आदर्श जपताना व्यक्तींची फरफट झाली तरी, आदर्शाची जपणूक काही सुटत नाही. ह्याउलट महाभारत.

महाभारतात काय नाही? आकांक्षा, वैर, भक्ती, मैत्री, तत्वनिष्ठता.... मानवी मनात उमटणार्‍या प्रत्येक भावनांचे आंदोलन महाभारतात तितक्याच समरसतेने टिपले आहे, आणि त्याचबरोबर ह्या सर्वांचा फोलपणाही. अगम्य आणि मनाला चटका लावणारी अशी नात्यांमधली गुंतागुंत महाभारतात जशी टिपली आहे, तशी अजून कुठेही टिपली गेली नसेल बहुधा. महाभारतातील प्रत्येक व्यक्तीच्या असण्याला, वागण्याला काही कारण आहे, आणि तरीही शेवटी नियतीच्या हातातल्या ह्या सार्‍या बाहुल्याच आहेत! त्यांचा रस्ता ठरलेला आहे आणि त्यावरील वाटचाल केवळ अटळ आहे... महाभारतातील पांडवांना शेवटच्या युद्धानंतर मिळालेल्या जयाचे स्वरुप पराजयापेक्षाही भीषण आहे.

अश्या ह्या गुंतागुंतीच्या महाभारतातील तितक्याच गुंतागुंतीच्या व्यक्तीरेखा इरावती कर्वे ह्यांनी "युगांत" ह्या त्यांच्या पुस्तकात मोठ्या समर्थरीत्या उलगडून दाखवलेल्या आहेत. त्या अनुषंगाने महाभारतकालीन समाज, धर्म, तत्कालीन जीवन वगैरेवर अतिशय चपखल निरिक्षणे नोंदवली आहेत.

पुस्तकाची प्रस्तावना मुळातून वाचण्यासारखी आहे, म्हणजे हे लेखन करण्यासाठी इरावतीबाईंनी उपसलेले कष्ट आणि त्यांच्या अभ्यासाचा आवाका लक्षात येईल. महाभारत अधिक उत्तम रीत्या समजावून घ्यायचे असेल तर, माझ्या मते "युगांत" चे वाचन आवश्यक. पुस्तकाची सतरावी आवृत्ती सद्ध्या मिळते, त्यावरुन त्याचे महत्व लक्षात यावे.

नावः युगांत
एकूण पाने :२४५
लेखकः इरावती कर्वे
प्रकाशनः देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि.
किंमतः रुपये २५०/- (सतरावी आवृत्ती)

No comments: