July 7, 2010

ये परतीचा वारा...

नियती तुम्हां, आम्हां सर्वांना एक कोडं घालते, आयुष्य नावाचं विलक्षण कोडं. प्रत्येकासाठी वेगळं आणि वैचित्र्यपूर्ण. एकाला घातलेलं कोड पुन्हा दुसर्‍याला नाही, तेह्वा ह्याचं किंवा त्याचं पाहून मी माझंही कोडं तसच सोडवीन म्हणालात, तर फसलात हे नक्की! इथे एकासाठीचा कायदा दुसर्‍याला लागू पडत नाही. प्रत्येकासाठी वेगळे कायदेकानून, ज्याच्या त्याच्या आवाक्याप्रमाणे.

खरोखर विल़क्षण आहे! एवढ्या मोठ्या जगड्व्याळ पसार्‍यात कुठेतरी एक जीव जन्मतो, दिसामासी वाढतो, वाट्याला आलेल्या आयुष्यात निरनिराळे अनुभव गाठीशी जमा करतो, त्यातून शिकतो, कधी हसतो, कधी रडतो. वाट्याला आलेले काही क्षण मनात अक्षय जपतो, काही विसरु पाहतो. काही काही क्षणांच्या आधाराने जगण्यासाठी नव्या उमेदीने पालवतो आणि काही क्षणांपुढे पार खचतो, शरणागती पत्करुन केविलवाणा होतो. कधी सूर जुळतात, कधी बेसूर होऊन दुखरी नस बनून ठसठसतात, आणि तरीही कोड्याची भूल सुटत नाही..

मन वाहत्या पाण्याचे, पालापाचोळा ठरेना
घोर घावाचीही रेघ चार पळेही टिकेना....

दिवस येतात, जातात. कित्येक घटना घडत राहतात. लहान, मोठ्या, लक्षणीय, नगण्य. कळत नकळत आठवणींची मोहर कुठेतरी मनाच्या तळाशी अलगद उमटवून जातात. प्रश्न निर्माण करतात, कधी कधी उत्तरं घेऊन येतात. निरुत्तरही करतात, तर कधी नव्या जाणीवांना सोबतीला आणतात आणि तुम्हां आम्हांला अधिक समृद्ध बनवून जातात, उत्तरं शोधायचीच खोटी. अर्थात, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधायलाच हवं, असंही नाहीच. आणि समजा, सापडलेल्या उत्तरात नवीन प्रश्न लपलेल असेल, तर? जेति, जेति म्हणताना कधी ना कधी नेति नेति म्हणावं लागत असेल का?

लयबद्ध गतीने, तुमच्या आमच्या आयुष्यात सुख दु:खांची चक्रं फिरतात. सुखावतात, दुखावतात. आपल्या, परक्यांची जाण देतात, शहाणं करुन सोडतात. उन सावलीचा खेळ जणू. कधी मनाची उमेद बांधण्यासाठी हात देतात, आणि कधी आपल्या सावलीलाही आपल्याचसाठी परकं करुन जातात. मन मात्र प्रत्येक क्षणामध्ये गुंतून पडतं, सुखाबरोबर तृप्त होतं, आणि दु:खानं पोळून निघतं.

... आणि चक्र सुरुच राहतं.. शेवटी हातात गवसतं काय? म्हटलं तर खूप काही, म्हटलं तर काहीच नाही.

आणि असंच चक्र सुरु असताना, कधीतरी, हळूहळू थोडं फार उमगायला सुरुवात होते. ज्ञात अज्ञाताच्या पाठशिवणीच्या खेळाकडे नजर जाते, त्याच्या अफाट पसार्‍याची कळत नकळत पुसटशी जाणीव होते आणि त्याचबरोबर स्वतःच्या नगण्यतेचीही. पुन्हा एकदा प्रश्न पडतात, कशासाठी केला होता अट्टाहास? हर्ष, खेद मावळतात. सोबतीतला एकलेपणा आणि एकलेपणातली सोबत जाणवते आणि एक दिवस कळून येतं,

शीड फिटे वाट मिटे, का धरु सुकाणू
वल्हवाया का उगीच बळ बळेच आणू?
जायचे जिथे तिथेच नेईल नेणारा
ओसरली भरती, ये परतीचा वारा...

जाणीवा अधिक संवेदनाक्षम बनतात आणि आपल्या हाती तसं पाहिलं तर काही काही नाही हे जाणवून थोडंफार सुटल्यासारखंही होतं. आता कसली भिती? दिशा कधीच्याच ठरलेल्या असतात, त्यातले खाचखळगे, राजमार्ग सगळं काही आधीच रेखलेलं असतं, आपण फक्त मार्गक्रमणाचे अधिकारी. कळूनच जातं सारं काही. तोवर परतीचा मार्ग समोर येऊन ठाकलेला असतोच. पण, आता कसं, सारं काही लख्ख समोर असतं, कसलीच घाई नसते. आता कदाचित सगळंच सोपं बनून गेलेलं असतं.

नाही मज घाई, पण वेग धरी होडी
जाताना एखाद्या शब्दातच गोडी
जो दुवा दिलास त्यात शीण मिटे सारा
ओसरली भरती, ये परतीचा वारा...

राग, लोभ मावळलेले असतात. फारशा तक्रारी राहिलेल्या नसतात. एकच छोटंसं मागणं राहिलेलं असतं, मागणं कसलं, विनंती. अगदी शेवटची. हरवलेलं काहीतरी आता गवसलेलं असतं आणि आता ते पुन्हा हरवायचं नसतं. म्हणून, एवढंच सांगणं होतं,

मिळूद्या मला मुळाशी, सारी मिटून दारे
मोकाट वारियांनो थोडे मुकाट व्हा रे....


समाप्त


*कवितांच्या ओळी कवी बा. भ. बोरकर ह्यांच्या.

* हल्लीच महिन्यापूर्वी माझा बाबा गेला. त्याच्याशी माझं फार लोभस असं मैत्र होतं. त्यालाही माझ्याशी गप्पा मारायला आवडायचं. त्याच्या लहानपणीचे किस्से, नोकरीनिमित्ताने त्याने जवळ जवळ भारत पालथा घातला, ते किस्से आणि कधी कधी अशाच गप्पा. संवाद साधण्यासाठी आणि तो टिकून रहावा, वृद्धिंगत व्हावा म्हणूनही. एकंदरीतच आयुष्याबद्दल त्याने फार डोळसपणे चिंतन, मनन केलं होतं आणि त्याबद्दल खूप आत्मीयतेने तो बोलायचाही. ते ऐकतानाही खूप छान वाटायचं.

त्याच्या आयुष्याबद्द्ल, त्याच्या मृत्यूबद्दल विचार करताना हे सगळं मनात येत राहिलं. जसं जमलं तसं इथे उतरवलं.

मात्र, त्याला त्याचं कोडं कधीच उकललेलं होतं.

4 comments:

नरेंद्र गोळे said...

वा! एका सुंदर कवितेचे सुरेख रसग्रहण केलेले आहेस!

शीड फिटे वाट मिटे, का धरु सुकाणू
वल्हवाया का उगीच बळ बळेच आणू?
जायचे जिथे तिथेच नेईल नेणारा
ओसरली भरती, ये परतीचा वारा...

काय कमालीचे शब्द आहेत!
ये परतीचा वारा...

Samved said...

sorry to hear the news. you expressed emotions in a very controlled manner

यशोधरा said...

गोळेकाका, रसग्रहण म्हणून लिहिलं नाही. बा भंच्या ओळी आठवल्या, तिथे चपखल बसल्या म्हणून.

संवेद, धन्यवाद.

भानस said...

खूप उशीर झालायं तरीही... तुझ्या हृदयी बाबा अक्षय आहेतच.

अतिशय संयत भाव तितक्याच यथार्थ शब्दात मांडलेस गं... खूप भावलं हे मनाचं निरुपण.