February 11, 2009

पळभर म्हणतील...

आज बर्‍याच दिवसांनी एक सहकारी भेटली. सद्ध्या तिची अन् माझी हापिसची वेळ एकच नाही, मग भेटी होत नाहीत. काही महिन्यांपूर्वी हापिसची एकच वेळ असल्याने आणि एकाच गाडीमध्ये असल्याने आम्ही भेटत असू. हळू हळू ओळख झाली, मूळ दिल्लीची, पंजाबी. बोलकी, गप्पिष्ट. सूत जुळायला कितीसा उशीर? खूप गप्पा व्हायच्या. मग, असंच एकदा बोलता बोलता तिने वडिलांविषयी सांगितलं होतं.

पंजाबी माणूस मुळातच हिंमतीचा, कष्टाला मागे न सरणारा, हे तिच्या वडिलांच्या आठवणी ऐकताना परत एकदा मला जाणवलं. स्वतःचे लहानपणातले पंजाबमधले दिवस, तिथे केलेली मौजमस्ती, वडिलांच्या आठवणी सांगताना ती आणि ऐकताना मी, अश्या दोघीही हरवून गेलो होतो. मला तर, पंजाब की मिट्टी, उसकी सुहानी खूशबू, मक्की दी रोटी और सरसोंका साग, लस्सी, हरेभरे खेत, आणि त्या खेतांमध्ये भांगडा करणारे लोकही दिसायला लागले होते!! करण जौहर, सुभाष घई आणि तत्समांचा जयजयकार!! मग हे कुटुंब दिल्लीला आलं, आणि तिथेही हिच्या वडिलांनी अफाट कष्ट करुन बस्तान बसवलं आणि अल्पावधीत बर्‍यापैकी नावही कमावलं. एकूणच आपल्या वडिलांविषयी बोलताना ती अतिशय आत्मीयतेने बोलायची. पंजाबी उच्चारांच्या लहेज्यातलं तिचं हिंदी ऐकायलाही गोड वाटायचं कानांना. दर दोन वाक्यांनंतर खळखळून हसणं! खोटं, खोटं नव्हे, मनापासून! खूप छान सोबतीण मिळाली होती मला.

मग एकदा एके दिवशी खूपच विमनस्क वाटली... विचारल्यावर समजलं की वडिलांना कर्करोगाचं निदान झालं आहे, अन् ते उशीरा समजलंय. बर्‍यापैकी उशीरा. तेह्वा आता फक्त वाट पाहणे, जितकं काही सुसह्य म्हणून करता येईल, तेवढं आणि तितकं करणे, एवढंच हातात राहिलेलं तिच्या अन् तिच्या बहिणींच्या. ते तर सुरुच होतं.... पण कुठेतरी एक आशा असतेच ना आपल्या व्यक्तीसाठी? कधी कधी वडिलांची प्रकृती व्यवस्थित असली की खुष असायची अन् कधी कधी गप्प गप्प.. पापा कधीतरी नसतील, ही शक्यता पचवता येत नाहीये म्हणायची.

मग आमच्या वेळा बदलल्या, अन् संपर्क राहिला नाही. ती तिच्या आयुष्यात गर्क अन् मी माझ्या. आज बर्‍याच दिवसांनी भेटली, आणि मी वडिलांविषयी चौकशी केली, तेह्वा कळालं की ते आता या जगात राहिले नाहीत. २० जानेवारीला त्यांचं निधन झालं. एकदम ऐकल्यावर दोनेक मिनिटं काय बोलावं हेच सुचेना! दोघी एकमेकींकडे पहातच राहिलो, नि:शब्द! काय बोलायचं अश्या वेळी? तिच्या खांद्यांभोवती हात टाकून तिला थोपटलं... दोनेक मिनिटांनी तीच म्हणाली, बीस को गये वोह, फिर मैं चार तारीख को निकल आयी.. रुककर क्या करना? अब तो कोई नहीं बचा उधर... निकल आयी| बस्, आखिरी वक्तमें साथमें रह पायें...

पुन्हा इथे येऊन परत एकदा इथल्या तिच्या आयुष्यात रुळली आहे. खूप बरं वाटलं. तिला दु:खी बघायचं नाहीच आहे मला. अर्थात, मन दुखावलं असणारच आहे तिचं, पण तिचं स्वतःचंही कुटुंब आहे, आणि त्यांच्यासाठी, त्यांच्या आधाराने ती पुन्हा एकदा सावरेल, सावरतेय.

पण त्याचवेळी परत एकदा जाणवलंय की काळ कोणासाठीच थांबत नाही हेच खरं! एखाद्या व्यक्तीशिवाय जगणं हे कितीही अशक्यप्राय वाटत असलं, तरी काळ सारं काही शक्यतेत बदलतो.... वडील कधी नसू शकतील ह्या शक्यतेला पचवता येत नाही असं जेह्वा तिला वाटत होतं, तेह्वाच तिच्या मनाने, हळूहळू कायमच्या ताटातूटीची तयारी करायला सुरुवात केली होती का?आठवणींची तीव्रताही कमी होत जाईल ना?

माझी आज्जी आठवली एकदम! मला लहानपणापासून तिनेच जास्त वाढवलं अन् तिची आणि माझी एकदम गट्टी होती! जशी ह्या पंजाबी मैत्रीणीची आपल्या वडिलांशी. मी नाही माझ्या आज्जीपाशी राहू शकले तिच्या शेवटच्या दिवसांत आणि शेवटच्या दिवशीही.. मी घरापासून दूर होते, आणि घरी पोहोचणंही शक्य नव्हतं.... तिने मला कळवायचं नाही काही, हे निक्षून सांगितलं होतं. तिला माहित होतं, मला यायला जमण्याजोगं नव्हतं. शेवटी तिने माझी आठवण मात्र काढली होती अन् मी मात्र नव्हते तिथे! आज्जी नसलेल्या घरात पाऊल टाकलं तेह्वा किती भकास वाटलं होतं.. कसं जगायचं असच झालं होतं मला काही दिवस. पदोपदी तिची आठवण! काही सांगायला पटकन् तिला हाक मारली जायची. सगळ्या गोष्टी प्रथम आज्जीला सांगायची सवय होती मला, नव्हे, ती माझी मानसिक गरजच होती, पण मग हळूहळू सावरलेच. आज्जी नाही, हे ही स्वीकारलंच. आयुष्य थांबेल असं वाटताना, थांबलं नाहीच, पुढे जातच राहिलय. आज्जीलाही असंच झालेलं आवडणार हे माहिती आहेच मला. तिच्या वडिलांनाही त्यांच्या मुलींच्या बाबतीत असंच, हेच आवडेल ना?

अजूनही मात्र मी, मनातल्या मनात का होईना ,सगळं काही आधी आज्जीलाच सांगते. अगदी दुखलं खुपलेलं, आवडलेलं आणि छोट्यात छोटं, काहीही असलं तरीही!

8 comments:

Unknown said...

maajhyahi ajjichi athvan ali.. ti geli teva mi jara nakaLatya vayat ch hote. ajoba atta 4 varshanpurvi gele. far bhakas vatla hota ! :(

ekdam khup athvan ali tyanchi, tujha lekh vachun....

कोहम said...

mare ek tyacha duja shok vahe, akasmat tohi pudhe jaat aahe

Monsieur K said...

:(

HAREKRISHNAJI said...

.

यशोधरा said...

bhaagyashree, ketan, krishnakaka... dhnyavad sahavedanet sahabhagijhaalyabaddal.

koham, thauk aahe re te.. pan tareehee kadhe kadhe manaavar taba rahat nahi na?

shabdabandha, dhanyvaad. mee jarur vichaar karate. aamantranaabaddal dhanyvaad.

Sonal said...

मला माझी आज्जी आठवली.. तिला पॅरॅलिसिस झालेला. ती गेली तेंव्हा मी ही घरापासून दूर होते. आम्ही ज्या खोलीत एकत्र राहिलो, काकांकडच्या त्या खोलीत मी दाराच्या पुढे जाऊ शकले नाही... i miss her

chilmibaba said...

छान लेख आहे, अगदी सुटसुटीत, पण परिणाम साधणारा.. एक उगाचच शंका, तुला एवढं मराठी टाईप करायचा कंटाळा नाही येत का गं :)

यशोधरा said...

chilmibaba, देवनागरी टायपाचा नाही कंटाळा येत, पण मेंदीच्या पानावर.. असे गळे काढायचा नक्कीच येतो ;)

हलके घेशीलच :)