September 7, 2008

विराणी

कशास मन हे जाते गुंतून,
जर केवळ दो घडीचे रंजन;

क्षणैक भासे, सरले मीपण,
अंतरी परी स्वत्वाचे गुंजन;

कशास होतो जीव घाबरा,
भवताली भरला ना मेळा?

भासे मृगजळ,कधी भासे रण
निसटे ऐसे जीवन क्षण क्षण;

रात दाटते, दिन गुदमरतो,
आर्त श्वासही परका होतो;

जिवाशिवाची भेट नसे अन्,
सखी सावलीही देई अंतर;

मौनामध्ये दु:ख लपेटूनी,
खुळा जीव शोधे सांगाती;

कुणी ऐकावी, कुणी सांगावी,
विकल मनाची विद्ध विराणी....

3 comments:

विशाखा said...

aprateem! khoop avadli kavita.
agadi pratyek kadavyatla pratyek shabd avadla.

khoop haluvarpane vikalata shabdat pakadli ahes.

Yogi... Yo Rocks.. !! said...

आयटे.. कसली मस्त कविता लिहिली आहेस.. खुपच आवडली.. :)

यशोधरा said...

विशाखा, थँक्यू :)
योग्या, धन्यवाद :) पोचलस हयसर तर!