मित्र बोलत राहतो.... कळू देत नाही,
मित्र ओळख नाकारतो दिवसाच्या कोलाहलात,
मित्र आठवण नाकारतो रात्री एकटं
मित्र शत्रूसारखाच होत जातो दिवसागणिक....
आणि पूर्ण विचारांती, नाही आवेगात क्षणिक.
दु:ख त्याचे खरे, नुसत्या दुराव्याचे नाही,
असूयेचे गाणे म्हणे असेच जन्म घेई
अशा मित्रास तहान लागेल सहवासाची, तो दाबेल,
अशा मित्रास जायचे असेल पुढे पुढे, तो जिंकेल,
अशा मित्रास तुम्हीं द्याल हिरवा चारा, तो फसणार नाही,
मित्रासाठी व्हाल तुम्हीच निवारा, तो थांबणार नाही
तो चालत सुटेल अशा वेगात,
की तुम्ही ऐलतीराशी तर तो क्षितिजापार,
जाताना नेईल तुमचे असे एकच गाणे,
की तुम्ही निराधार.... तर तो निर्विकार
मित्र जसजसा होत जाईल शत्रू, तसे तुम्ही काय कराल?
मित्र ओळख नाकारेल.... दुखावले जाल, पण मग घ्याल समजुतीने.
मित्र आठवण नाकारेल एकांतातही... हराल तुम्ही समग्रतेने.
मित्र जाऊ लागेल क्षितिजापार, तुम्ही हसाल नुसते
आणि क्षितिजापार असलेल्या लाटेवर, मित्रावर
उतरेल दिवस-रात्रीच्या पलीकडची सायंकाळ,
आणि मग जेह्वा मित्र हलेल, हरेल,
बोलावेल तुम्हालां पुन्हा एकदा,
कवळेल तुम्हांला पुन्हा एकदा,
अशा बोलीत, की जणू हीच तुमची पहिली भेट!
.... तेह्वां काय कराल?
सांगा! तेव्हां काय कराल?
( ही कविता मी २००७ च्या साधना दिवाळी अंकात वाचली आहे. डॉ. आशुतोष जावडेकर यांची कविता आहे.)
1 comment:
खरच छान कविता! :-) मित्र म्हणजे इथे सूर्य असा सोयीस्कर अर्थ मी घेतला:-)
Post a Comment