December 26, 2007

शब्द पसारा

कधी कधी काय होत ते समजत नाही खर तर. इतका कंटाळा दाटून येतो आतून, काही स्पष्टीकरण नसत त्यासाठी. जणू काही अंतर्मनावर कसल तरी मळभ दाटून आलेल असत. काहीच नकोस वाटत, लेखन वाचन, शब्द... सार काही परक वाटत अगदी. अस वाटत की मी कुठेतरी उभी आहे अन एक विशिष्ट परिघावर हे सार आहे. म्हणजे हेच, लेखन, वाचन, शब्द, ह्या सगळ्या गोष्टी. इतर वेळी मी यांच्यापासून स्वत:ला वेगळ काढूच शकत नाही, श्वास घेण्याइतकच ते ही सहजच आहे, पण कधी कधी हे ही परकच वाटाव?

अस वाटत की आहोत तिथूनच हात लांब केला तर येईलही आवाक्यात, पण जस, ज्या प्रमाणात हवय, ज्या कसदारपणे हवय, तस नाही आल तर? जरा वेळाने, हे अप्राप्य प्राप्त करण्याची खरच इच्छा आहे का इथपासून सुरुवात होते! काय आहे हे? मला स्वत:लाच कळत नाही कधी कधी. काय चाललय? कुठे जायचय, मकाम कुठे आहे, आहे का? का नुसतच जिप्सी होऊन भटकायच आहे? नक्की काय करायच आहे, ह्याचाच गोंधळ उडल्यासारखा होतो माझा. लक्ष्याचा शोध म्हणावा का?? स्वत:चा शोध? उगाच मोठे शब्द पण नाही वापरायचे मला.

ही तक्रार नाही आहे, किंवा मी रडगाणही गात नाही आहे, असच थोडस स्वत:शीच संवाद साधायचा हा एक प्रयत्न आहे. स्वत:ला शोधायचा म्हणूया हव तर.

आणि ही सगळी तगमग उराशी जपत, परत ते सगळे व्यवहारातले मुखवटे घालून जगातही यशस्वीपणे वावरायच, वावरतेही. तेही आवश्यकच ना? अजिबात तक्रारीचा सूर नाही त्याबद्दल, एक निरीक्षण नोंदवल, इतकच. जगाबद्दल वगैरे माझी मुळीच तक्रार नाही, किंवा जग विरुद्ध मी, किंवा जगाने माझ्यावर अन्याय केलाय असले हास्यास्पद दावे मी मुळीच करत नाही. मला वाटत, कधी कधी आपला स्वत:चाच दावा असतो स्वत:शीच. स्वत:लाच समजावयाचे, काय समजावयाचे पण?

अन कधीतरी शब्द पण पोकळ वाटतात! पाण्यावरचे बुडबुडे जणू. काय अन कस? काही काही अवस्था अश्या असतात ना, की त्या स्वत:च अनुभवायच्या, स्वत:च जळायच अन स्वत:च ती तगमग पण अनुभवायची! त्या कोणापाशी बोलून दाखवता येत नाहीत, बोलावस वाटत नाही असही नाही, पण एक तर योग्य शब्द सापडत नाहीत किंवा ते शब्दांच्या पलिकडे पोचलेल असत. मग बोलायची गरज पण संपून जाते.

विचित्र झाल आहे! स्वत:च्याच मनाशी असलेली बांधिलकी तुटतेय का? काहीतरी स्वत:शीच एक नाळ तुटल्यासारखा अनुभव, होता होता, एक राहून गेलेला संवाद जणू, की नुसताच जड झालेला शब्द पसारा?

कधीतरी एकदा असच,
अवती भवती फेर धरत,
सभोवताली हसत नाचत,
शब्द म्हणाले खेळ खेळत.....

म्हणाले, चल ना, जाऊ,
उंच शब्दभरार्‍या घेऊ,
जाणीवा, नेणीवांच्या जगात
एक चक्कर टाकू अन,
असच जरा भटकून येऊ....

हातात हात गुंफत,
आणि मनात गाणी जागवत,
एकमेकांना सोबत करत,
निघालो असच वाटचाल करत.
भिंगरीसारखे भिरभिरत,
पाण्यासारखे झुळझुळत,
उन्हांसारखे तळपत,
आणि सावलीसारखे शांतवत.

मधेच वाटत, खेळ संपला......
हात कधीचाच हातातून सुटला,
शब्दांच जणू कुरुक्षेत्र होता,
वावर नशिबी असेल का इथे,
अश्वत्थाम्याच्या जखमेच दु:ख सोसत?

3 comments:

Abhijit Dharmadhikari said...

apratim lihilay. agadi aatoon alelyaa bhavana vyakt kelyaa aahet!

Kamini Phadnis Kembhavi said...

सुरेख... मनापासुन आलेलं.

आयुश्याच न सुटणा-या कोड्यात सगळेच अडकलेलो असतो आणि अश्याच भावना असतात सगळ्यांच्याच.माझ्याच गज़लेतला एक शेर आठवला सहजच

तशी मी कधी काय तक्रार केली
तुझ्याही कुठे काय हातात होते

यशोधरा said...

अभिजित धन्यवाद.
श्यामली, तू तर जाणतेसच सगळं. शेर सही.