December 2, 2007

सुमल्याची आश्रम वारी!!...(१)

"रे बाऽऽऽबल, खयं चललय मेल्या सकाळच्या पारी इतक्या घाईत?? कोणच्या म्हशीक रेडकू झाला काय मेल्या?? तुका काय बारशाचा आवताण आसा रेऽऽऽ??" सकाळच्या चायच्या भांड्याक भायेरसून राख फासता फासता, सुमतीन बाबलाक साद घातली!

बाबलो थयच थबकलो. सुमल्याचो आवाज तेह्वाच वळाखलो त्येनी, नायतर इतक्या प्रेमळ भाषेत त्येचो उद्धार करणारा दुसरा कोण असताला!! "गो सुमल्या, अगो आयलय तरी कधी परतान? माका काय खबरच नाय!! कोण काय बोलूक पण नाय ता..."

"तर रे मेल्या!! तू येकदम मामलेदारच मां, तुका सगळे बातम्ये पोचवूक!! लोकांकनी काय काम धंधे नाय आसत काय मेल्या?? तुझे पाठसून बातमी पुरवत धावतले ते!!" इति सुमल्या.

बाबलो थक्कच झालो!! काय बायल माणूस तरी!! त्वांड आसा काय तोफखानो!! सतत आपला चलतासा, काळ नाय, येळ नाय! धन्य माऊली आसा अगदी!! काय त्या तोंडाळपणाक धरबंध असात तर!! तशी हातान सढळ आसा, पण, तोंडान सगळा घालवतली! आणि आता सुमल्यान अडवल्यावर, त्येच्या प्रश्नांच्या सरबत्तीक तोंड दिल्यशिवाय थयसून जाणा पण जमण्यासारखी बाब नव्हती!! कठीणच काम होता! शिकला नाय म्हणानच ह्या, नाय तर बालिश्टर होऊक काय हरकत नव्हती हेका!! मनातल्या मनात काय बाय कुरकुरत, बाबल्यान थयच एक बर्‍याश्या दगडार बसकण घेतल्यान.

" बोल, काय म्हणतय सुमल्या?? आणि आता हयसर हाकारलयसय, तर वायच चाय दी बघया इल्ली, सकाळच्यान घसो नुसतो कोरडो पडलो माझो!" बाबल्यान चायची फ़रमाईश करूनच टाकली!

सुमल्याकडे चायवांगडा अगदीच काय नाय तर बटर तरी मिळात ह्या ठाऊकच होता बाबल्याक. थोड्या वेळातच सुमतीने बाबल्यासमोर चाय आणि बटर ठेवल्यान. पितळी कपबशीतून फ़ुर्र करून चाय पिता पिता बाबल्यान येकदम मान्य करून टाकला की सुमल्यासारखी चाय कोणाकच बनवूक येणा नाय!!

"बाकी कायेक म्हण तू सुमल्या, तुझ्या हाताक चवच बरी हां!! मेल्या, सगळ्यांचा सगळा करतय, पण तोंडान घालवतय मगो!! आणि आयलय कधी परतून येवढा शहराकडे गेलेलय ता??" गरम चाय पोटात गेल्यावर, बाबल्याचा नरडा मोकळा झाला गजाली करूक। " जरा ती पानाची डबी घे गो हयसर... वायच पान खतय, मगे आसतच कामा, जरा सुदीक वेळ मिळूचो नाय माका... हसतय काय मेल्या, खराच सांगतय!" बाबल करवादलो!

"रे बाबल, तू माका सांगतय मेल्या कामाचा कवतुक?? तुका काय आज बघतसय काय रे मी?? मेल्या लंगोट लावून आवशी पाठल्यान शेंबडा नाक ओढत जाय तू, तेव्हांच्यान बघतसय, समाजलय?? कोणाक रे सांगतय कामाची कवतिका?? आणि कसला मेल्या काम काढलय इतक्या?? तुझ्या व्होकलेच्या लग्नाचो माटव घालूचो आसा काय रे??" आता बाबल काय बोलतलो कप्पाळ!!

तसा बाबल आणि सुमल्यात जास्त अंतर नाय होता, सुमल्या म्हणजे सुमन, बाबल पेक्षा पाच- सात वर्षांनीच मोठा होता, आणि तोच मोठे पणाचो अधिकार ता गाजवी, पण कसो? तर होडल्या बहिणीच्या मायेन, आणि ह्या माहित होता, म्हणान, बाबल ही आपलो गप रवी.

"हं, तर सांग मरे खयच्या कामासाठी धावत होतय??"

"गो सुमल्या, आता काय सांगतलय तुका, आपल्या गावाक येक एकदम पावरबाज स्वामी येवचे आसत! समाजलय?? त्येंची सगळी तजवीज करूक व्हयी, काय समाजलय?? सगळे बापये येतले आता महादेवाच्या देवळात, विचार विनिमय करुक, थय जाइ होतय मी. आता देवाचो माणूस येतलो, त्येची जरा सेवा करीन तर पुण्य मिळात मां??"

"गे बाये माझ्या, सांगतस तरी काय?? रे थय काय सांगतत, ठरवतत, ता येऊन सांगशीत मां माका?? मी पण जोडीन रे थोडा पुण्य, संत माणसाची सेवा करूची, माझी आवशी नेहमी म्हणा रे!" सुमल्यान विचारला। त्यावर होय, होय करत, बाबलान थयसून काढतो पाय घेतलो! कारण येकदा का सुमल्याचा आवशी पुराण सुरु झाला की तास दोन तासांची निश्चिंती, ह्या आता सरावान बाबलाक ठाऊक झाला होता!

बाबल बैठकीक गेलो, अन नंतर प्रत्येक बैठकीक गेलो. गावात जोरदार बैठकी घडले, महा नगर पालिकेच्या निवडणूकीत होवचे नाय इतके संवाद परिसंवाद घडले आणि कसा काय करुक व्हया, अन स्वामी महाराजांची कशी बददास्त ठेवूक व्हयी, याची जोरदार रूपरेखा ठरली येकदाची! द्येवाचा काम ता, तेका कोण नको म्हणात!

आणि, शेवटी एकदा, गावात स्वामी महाराज अवतरले!! त्येंची ती लांबलचक दाढी, पायघोळ रेशमी वस्त्र प्रावरणां बघून मंडळीही जरा सुखावली. आणि महाराजांवांगडा शहरी, सुशिक्षीत गर्दी बघून तर त्येंची खात्रीच पटली, की ह्या काय असा तसा कुडमुडा काम नाय आसा!! जोरदार काम आसा! हळू हळू या स्वामीच्या पाया पडाक कायच धोको नाय असा सगळ्यांचा मत होवूक लागला, एकूणच स्वामींचा आणि त्येच्या भवतीच्यांचा वागणा बघून । देवाचो माणूस असलो तरी तेका पारखूक व्हया ना, आजकालच्या जमान्यात? मगे?

स्वामी महाराज गावात आयले, रवले, एकदम गोड, मिठ्ठास आवाजात काय काय बोलले आणि सरते शेवटी त्येंनी जाहीर केला की, ह्या गाव इतक्या सुंदर आसा, की प्रत्यक्ष देवाकडून तेंका आदेश आसा, की हय एक आश्रम बांधच!! आता साक्षात देवाचोच आदेश तो, नाय तरी कसा म्हणतला कोणी?? पण जागेचा काय?? आता कोकणी माणूस भावूक आसा, पण अगदीच हे पण नाय मां.... पण स्वामी महाराजच ते, तेंका नाय भक्त मंडळींची काळजी तर कोणाक असतली?? आणि ते काय अशे तशे भक्त मंडळीक फसवणारे स्वामी होते काय?? ते तर प्रत्यक्ष श्री कृष्णाक भगवान मानून चालत बोलत, अगदी त्येच्या सारखेच गोऽऽड़ हासत, वागत!! ते काय अशे फसवतीत?? काय तरीच काय?? साक्षात श्रीकृष्ण प्रसन्न त्येंका!!! उगाच काय तरी इपरीत शंका घेवचे म्हणजे काय?? कलियुगाचो प्रताप म्हणतत, ता ह्या असा, समाजल्यात?? कलीच तो, मनात नाय ते इपरीत इपरीत कल्पना घालीत रवता.... काय खरा नाय बाबा माणसाचा आजकाल!!

तर, स्वामी महाराजांन सांगितल्यान, की घाई करुचा काय काम नाय, व्हया तर गावातले चार शहाणे सुरते लोक, दोन एक बायल माणसा, अशे करून जा आणि त्येंचो मूळ आश्रम बघून घ्या, काय मनात शंका असतीत ते फेडून घ्या. बघा आता, असा कोण सांगात आधी?? ज़ावची येवची वेवस्था पण स्वामी महाराजांचे सुशिक्षित भक्त गण करुक तयार होते, गावकर्‍यांन नुसती हो म्हणूचीच खोटी होती!! आता सुशिक्षित लोक पण महाराज्यांच्या शब्दाखातर हो म्हणतत, म्हणज़े हो बाबा अगदीच कंडम नसात असो विचार करून परत येकदा महादेवाच्या पारार बैठक बसली!! ग़जाली, चवितचर्वण सुरु झाला!!

"नाय, पण मी काय म्हणा होतय, जावन बघूक काय झाला?? आपणांक काय खर्च पडणा नाय, काय नाय, आणि आपलो आश्रम बघूक गावता… काय बिघडला, सांगा बघया??"

"ता खराच रे, पण उगाच ह्या म्हणजे कसा, उपकार घेतल्यासारखे, नाय?? आता म्हणतले, या, बसा, खा, प्या…"

"मेल्या, प्या?? प्या??? तुका काय सुचता तरी रे पिण्याशिवाय?? खयही जातय ता आपला पिण्याचाच डोचक्यात मेल्या तुझ्या!! आश्रमात पितत रे?? कधी ऐकलेलय असा?? काय मेल्याचा लक्षण तरी!! रे, उगीच नाय तुझो बापूस गाळी करणा तो तुका, समाजलय मां?? काय तरी अकलेचे तारे तोडता मेलो!! रे, जनाची नाय तर मनाची तरी!"

"आत बघा ह्या उलटा काम कसा ता! मी म्हणी होतय, पाणी, दूध, ताक असा पिवूक दितले, श्रीकृष्णाचे भक्त मां ते...... मगे कृष्ण ह्या सगळा खाय, म्हायत आसा मां?? आपल्याच मनात चोर, आणि सगळयां जगाक नावा ठेवची, ह्या खयचा शास्त्र??"

"रे, हयसर माणसां जमली कशाक आणि तुमचा मेल्यांनो चललासा काय?? रे अशान कसा काय होयत रे?? खयही बघा, ता असाच!! मेल्यांचा अगदी देशाच्या राजकारणांत पण ह्याच! मूळ मुद्दो बाजूक आणि ह्ये तंडतत भलत्याच कारणांन!! म्हणान या देशाचा काय्येक कल्याण होणा नाय!! समाजलय मां?? कधी सुधरतले जाणा कोण!! सगळ्यांका नेवन समुद्रात बुडवूक व्हये!!"

अपूर्ण...

1 comment:

Nandan said...

वा! खूप दिवसांनी मालवणीत कायतरी वाचूक गावला. गार वाटला जीवाक. बाबल-सुमतीचे गजाली एकदम मस्त उतरले आसत. आता पुढच्या भागात काय होतंला त्याची वाट बघतंय.